राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी अन्न सुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी केली.
नवी दिल्ली- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी अन्न सुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी केली. यामुळे अन्न सुरक्षा कायदा देशभरात लागू झाला आहे. युपीए सरकारचे महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयकाला २७ ऑगस्ट रोजी लोकसभेने आणि तीन सप्टेंबर रोजी राज्यसभेने मंजूरी दिली होती.
या विधेयकामुळे देशातील ८० कोटी जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य मिळण्याची हमी मिळणार आहे. या विधेयकाअंतर्गत नागरिकांना तांदूळ तीन रूपये प्रतिकिलो, गहू दोन रूपये प्रतिकिलो आणि बाजरी एक रूपया प्रतिकिलो मिळणार आहे. शहरातील ५० टक्के नागरिकांना तर गावांमधील ७५ टक्के नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी १.२५ लाख कोटी रूपये खर्च होणार असून ६.१२ कोटी टन धान्याची आवश्यकता आहे.