वैतरणा धरणातून पाणी देण्यास मागील तीन वर्षापासून टाळाटाळ करणा-या टेंभा ग्रामस्थांनी अखेर सोमवारी मुंबई महापालिकेच्या मोडकसागर कार्यालयावर मोर्चा काढला.
शहापूर – वैतरणा धरणातून पाणी देण्यास मागील तीन वर्षापासून टाळाटाळ करणा-या टेंभा ग्रामस्थांनी अखेर सोमवारी मुंबई महापालिकेच्या मोडकसागर कार्यालयावर मोर्चा काढला.पाणी द्या, अन्यथा या धरणातच जलसमाधी घेऊ, असा इशारा मोर्चेक-यांनी दिल्यानंतर येत्या १० दिवसांत पाणी देण्यासंबंधी मुंबई पालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांसमवेत बैठकीचे आयोजन केल्याचे पालिकेचे उप जलअभियंता तळकर यांनी जाहीर केले.
मुंबई महापालिकेच्या मालकीच्या वैतरणा-मोडकसागर धरणातून मुंबईकरांना मागील ५० वर्षापासून दररोज सुमारे ४५५ दशलक्षलीटर पाणीपुरवठा होतो. मात्र या धरणाचा समावेश असलेल्या टेंभा ग्रामपंचायतीतील टेंभा, भोसपाडा, थालकर पाडा, माडेपाडा, बलवंडी व इतर आदिवासी पाडय़ांतील सुमारे ५ हजार नागरिक मागील ५० वर्षापासून घोटभरं पाण्यासाठी वणवण करत आहेत.
या धरणातून पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी टेंभा पाणीहक्क संघर्ष समितीतर्फे गेल्या तीन वर्षापासून पत्रव्यवहार, निवेदने, मोर्चे काढून आपली मागणी लावून धरली आहे. याप्रश्नी उप जलअभियंता, कार्यकारी अभियंता, शहापूरचे तहसीलदार सुनील भूताळे, कार्यकारी अभियंता मेटकर, वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रविण वडके यांनी येत्या २२ नोव्हेंबर रोजी तातडीची बैठक बोलावली आहे. या वेळी थेट धरणाचे पाणीसाठा करण्यासाठी मुंबई महापालिकेने यंत्रणा राबवावी, वितरण व्यवस्था ठाणे जिल्हा परिषद करणार असल्याच्या मागण्यांवर बैठकीत मंजुरी मिळणार आहे.
आंदोलनकर्त्यांचा रोष पाहून वैतरणा धरणावर राज्य राखीव पोलिस दालाच्या तुकडय़ा, दंगल नियंत्रण पथक, पडघा, कसारा, टिटवाळा आणि शहापूर पोलिसांच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या होत्या.