संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याला नुकतेच अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. आंबा, काजू पिकांसह तयार झालेल्या कुळीथ, पावटा, मूग, कलिंगड, सूर्यफूल या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून याआधी सरकारने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली तुटपुंजी मदत शेतक-यांना मिळण्यापूर्वीच हे दुसरे संकट शेतक-यांसमोर उभे राहिले आहे.
मसुरे- निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी संकटात सापडला आहे. कृषी विभागाने नुकसानीचा आढावा तातडीने घेण्याबरोबरच सरकारने पीकविम्याची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे. हवामानावर आधारित पीकविम्यामध्ये सुधारणा करून निकषांमध्ये बदल करण्याची मागणी शेतक-यांमधून होत आहे.
दरम्यान, आंब्यावर फळमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याच्या शक्यतेने कामांध किंवा रक्षक सापळे आंबा बागेत लावण्याबरोबरच काजू पिकावर ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रॉपीनेब पावडरची फवारणी करण्याचा सल्ला मालवण तालुका सहाय्यक कृषीअधिकारी अभिजित मदने यांनी दिली आहे.
शनिवारी मध्यरात्रीनंतर सर्वत्र तुफानी पाऊस झाला. पावसाची कोणतीही शक्यता नसताना अचानकपणे पर्जन्यधारा बरसल्याने शेतामध्ये सुकत घातलेले कुळीथ, मूग आदी पीक पावसाने पूर्णपणे भिजून गेले आहे. त्याचप्रमाणे पक्व झालेले, परंतु काढण्यात न आलेल्या कुळीथ पिकाच्या शेंगा दोन दिवस पाऊस झाल्याने कुजणार आहेत.
शेतक-यांनी आता ही पिके काढून कडक उन्हात सुकवून नंतरच त्याची झोडणी केल्यास काही प्रमाणात तरी ही पिके हाती येणार आहेत.
काजूवर ढेकण्या तर आंब्यावर फळमाशीचा प्रादुर्भाव होणार
पावसामुळे काजू पिकावर ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव वाढणार असून मोहोरावर भुरी किंवा करपा रोग दिसून येणार आहे. प्रॉपीनेब पावडर १० लिटर पाण्यामध्ये १० ग्रॅम या प्रमाणात फवारणी केल्यास नियंत्रण मिळवता येणे शक्य होणार आहे.
आंबा, काजूबरोबरच रब्बी पिकांनाही!
अवकाळी पावसाने जमिनीतील सुप्त अवस्थेत असलेली फळमाशी कोषातून बाहेर पडून फळावर हल्ला करण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून शंभर झाडांमध्ये चार कामांध किंवा रक्षक सापळे लावावेत.
तसेच ५० ग्रॅम गूळ, ५० मिलि. क्लोरोपायरीफॉस, १५ लिटर पाणी यांच्या मिश्रणाची बागांच्या चार कोप-यांमध्ये फवारणी करावी. गोड चवीमुळे फळमाशी आकर्षित होऊन कीटकनाशक पोटात गेल्याने मृत होऊन यावर नियंत्रण मिळवता येणे शक्य होणार असल्याची माहिती मदने यांनी दिली.
कलिंगडावर भुरी रोग वाढणार
या हंगामातील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाणारे पीक म्हणजे कलिंगड होय. पावसामुळे कलिंगड पिकावर भुरी व केवडा रोगाचा प्रादुर्भाव जाणवणार असून यामुळे वेल सुकून जाण्याची शक्यता आहे. तसेच वेलींना लागलेल्या फळाखाली पाणी साचून राहिल्यास कलिंगड कुजण्याची शक्यता आहे. शेतक-यांनी फळाखाली गवत टाकल्यास नुकसानीपासून बचाव होणार आहे.
सूर्यफूलासाठी कृत्रिम परागीभवन आवश्यक
अवकाळी पावसाने सूर्यफूलामध्ये परागीभवन करणाऱ्या मधमाशांचे प्रमाण कमी होणार असल्याने शेतक-यांना परागीभवन करण्यासाठी कृत्रिम उपाययोजना करण्याची गरज आहे. फुले फुललेल्या झाडांवर शेतक-यांनी रोज सकाळी ८ पूर्वी हातावर तलम कपडा गुंडाळून सर्व फुलांवरून हात फिरवावा. कृत्रिम परागीभवन होऊन पिकामधून नुकसानी होणार नाही.
कुळीथ, पावटा निसर्गाच्या हातात
शेतात तयार झालेला कुळीथ काढून चांगल्या प्रकारे कडक उन्हात सुकवून त्याची झोडणी करावी. या कुळिथाला तांबडा रंग येण्याची शक्यता असून खूप सुकवणे एवढेच शेतक-यांच्या हाती राहिले आहे.
पावटयाच्या हिरव्या शेंगांमध्ये किडीचा प्रादुर्भाव होणार असून यावर कोणतीही उपाययोजना करणे शेतक-यांच्या हाती नसून केवळ शेतामध्ये लक्ष ठेवून अशा शेंगा सुकण्याची वाट न बघता काढून टाकणे जास्त हिताचे ठरणार आहे.
अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या आंबा बागायतदार तसेच शेतक-यांना नुसते पंचनामे, मदतीच्या घोषणा व जुजबी मदत यापलीकडे जाऊन शासनाने प्रसंगी निकषांमध्ये थोडेफार बदल करून मदतीचा हात देण्याची गरज निर्माण झाली आहे.
अच्छे दिन येणार या स्वप्नात असलेल्या शेतक-यांना शासनपातळीवरून मदतीचा हात मिळतो का ते पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.