सभोवतालचं वातावरण, संपर्कात येणा-या वस्तू, खाद्यपदार्थ यांच्यामुळे जशी अॅलर्जी वाढू शकते तशी अॅलर्जी आणि मानस ताणतणावाचाही जवळचा संबंध आहे. त्याविषयी मार्गदर्शन केलं आहे मनसोपचारतज्ञ्ज डॉ. क्रांती कदम यांनी.
मानशास्त्रात अॅलर्जीचं वर्णन शरीराचा चिडचिडेपणा असं केलं आहे. म्हणजे ब-याच वेळेला ताणतणाव, नैराश्य, उदासीनता तसंच नकारात्मक भावना, राग हे मनातून व्यक्त होत नाही. अशा वेळेला त्या भावना काही जण शरीरातून व्यक्त करतात. अशा वेळेला अॅलर्जीचा त्रास व्हायला सुरुवात होते. ताणतणावात असताना शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. त्याचं प्रमुख कारण म्हणजे कॉर्टिझॉन नावाचं संप्रेरक. हे संप्रेरक जेव्हा कमीप्रमाणात स्त्रवतं जेव्हा रोगप्रतिकाराक शक्ती कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की, विविध प्रकारच्या अॅलर्जी डोकं वर काढतात. मुलांमध्ये ऑटोमिक डर्मिटायटिस नावाचा आजार डोकं वर काढतो.
या आजाराचं प्रमुख कारण असतं आईवडील. जेव्हा आईवडिलांमध्ये सुसंवाद नसतो, आई-बाबांपैकी एकाचा मृत्यू झालेला असतो, आईवडिलांचे संबंध घटस्फोटापर्यंत आलेले असतात तेव्हा मुलं एकलकोंडी होतात. या एकलकोंडेपणामुळे ती खिन्न, उदासीन होतात. त्यांचं स्वत:चं खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं. मग त्यांना पित्ताचा त्रास, अंगावर खाज येणं यांसारख्या समस्या डोकं वर काढतात.
ताणतणावमुळे कधी कधी नको ते पदार्थ म्हणजे पचन न होणारे पदार्थ खाल्ले जातात किंवा काही लोक तणावाखाली जास्त पदार्थ खातात. मग या न पचलेल्या पदार्थामुळे पोट तर बिघडतंच, शिवाय त्वचेवरही त्याचे परिणाम दिसतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अॅलर्जीचं प्रमाण सर्वात जास्त आहे. पुरळ, मुरमं ही अॅलर्जीची माध्यमं आहेत. ताणतणावामुळे वाढतात. वृद्धामंध्ये जोडीदाराच्या मृत्यूमुळे किंवा मुलं नीट वागत नसल्यामुळे एकाकीपणा वाढत जातो. अशा वेळी ती एकलकोंडी बनतात. या एकलकोंडेपणामुळे खाण्याकडे तसंच शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष नसतं. त्यामुळेही अॅलर्जी वाढते. कधी कधी सोरायसीस, कोड, अंगावर पांढरे डाग येणं यांसारख्या त्वचारोगांमुळे न्यूनगंड वाढतो. न्यूनगंड वाढला की, आजार बरे होण्यापेक्षा वाढत जातात.
उपाय : योगाभ्यास, प्राणायाम, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, ग्रुप कौन्सिलिंग, पुरेशी झोप हे प्रमुख उपाय आहेत.