सत्तेत नसताना किंवा काँग्रेस पक्षात कोणत्याही पदावर नसताना श्री. नारायण राणे हे मराठवाडयाच्या दुष्काळी दौ-यावर धावून गेले. मराठवाडयातल्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना ’आपल्याकरिता कोणीतरी धावून आले’ याचे फार अप्रूप वाटले. विलासराव आता नसताना नारायण राणे यांच्या दौ-याने कार्यकर्त्यांना बळ मिळाल्याची भावना आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली.. महाराष्ट्रात पुढची चार वर्षे?सरकारविरोधात आणि सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढायचे असेल तर आक्रमक नेतृत्वाची गरज आहे त्याचे विश्लेषण..
हा लेख ‘प्रहार’चा संपादक म्हणून लिहीत नाही. गेली ५५ वर्षे महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात घडलेल्या जवळपास सर्व घटनांचा एक जवळचा साक्षीदार म्हणून हे लिहीत आहे. यात व्यक्तिगत स्तुतीचा भाग नाही; तसेच कोणावर व्यक्तिगत टीकाही नाही. सगळेच मित्र आहेत; परंतु महाराष्ट्र आज दिशाहीन झालेला असताना या महाराष्ट्राला कणखर नेतृत्वाची नितांत गरज आहे. सरकार भाजपाचे आहे. पण, सरकारात बसलेले नेते होऊ शकत नाहीत आणि लोकांचे प्रश्न समजून घेऊ शकत नाहीत.
खरे तर एवढे मोठे सरकार हातात असताना संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला आणि शेतक-याला तातडीने सावरण्यासाठी असे काय मोठे करावे लागणार होते? बाहेरील राज्यातून चारा आणणे, शासनाच्या खर्चानेच दुष्काळी जिल्ह्यात गुरांच्या छावण्या निर्माण करणे, अतिशय बिकट भागात टँकर चालू ठेवणे, त्यासाठी एक दक्षता समिती निर्माण करणे आणि जर भाजपाजवळ एवढी कार्यकर्त्यांची फौज आहे म्हणतात, तर अशा अडचणीत सापडलेल्या शेतक-याला मदत करण्याकरिता ही यांची फौज उपयोगी का येत नाही? यांना कोणी अडवले आहे?
अख्खा महाराष्ट्र संकटात सापडलेला असताना, महागाई सर्वत्र भडकलेली असताना, आज सरकार अस्तित्वात नाही अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री असून नसून सारखा आहे. त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा नाही. इतका पोरकट मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी मिळालेला नव्हता. त्यामुळे दुष्काळी मराठवाडयासाठी हे सरकार काही करेल, अशी स्थिती आता अजिबात वाटत नाही. मुख्यमंत्री औरंगाबादला जाऊन मराठवाडयात फिरकत नाहीत, शेतक-याला मदत देत नाहीत. चा-याची व्यवस्था नाही. गुरे कसाईखान्याकडे चालली.
या सगळया परिस्थितीत मुख्यमंत्र्याला झोप कशी लागते? पण आता मुख्यमंत्र्याबद्दल बोलणेच सोडून देऊ या. हे बिनकामाचे सरकार लोकांनी बसवले आणि बिनकामाचे बाहुले मोदींनी महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवले, तेव्हा हा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढेल, ही आता शक्यता नाही. त्याबद्दल बोलणे सोडून देऊ या. पण लोकांच्या मनातला असंतोष कुठेतरी व्यक्त होण्याकरिता आणि तो आवाज फुटण्याकरिता अशा कणखर आणि खंबीर नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज होती आणि आहे. सत्ता हातात नसताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे मराठवाडयात धावून गेले. त्याचे मराठवाडयातल्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य लोकांना किती अप्रूप वाटलेले आहे.
मराठवाडयाचे दोन मोठे नेते होते, एक विलासराव देशमुख आणि दुसरे गोपीनाथ मुंडे. दोघांचे पक्ष दोन, दोघांचे राजकीय मतभेद. पण मैत्री कायम ठेवून राजकारण कसे करता येते हे दोघांनी दाखवले. मुंडे यांचे दुर्दैवी मरण घातपाती. विलासरावांचे दुर्दैवी मरण आपल्या आजाराकडे लक्ष न दिल्यामुळे. पण दोघे गेल्यामुळे मराठवाडयाचे, महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले.
आज विलासराव असते तर त्यांनी मराठवाडा पिंजून काढला असता. मुंडे असते तर ते मुख्यमंत्रीच झाले असते आणि सगळा विषयच बदलला असता. ते नसल्यामुळे पोरकट लोकांच्या हातात सरकार गेले आणि महाराष्ट्राचा बटयाबोळ झाला.
मराठवाडयात आज काँग्रेसजवळ नेता नाही. विदर्भात काँग्रेसजवळ नेता नाही. खान्देशात नेता नाही. तसं पाहिलं तर महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत नाही. पण सत्तेत नसतानाही नेतृत्व करण्याची कुवत आणि सरकारला अंगावर घेण्याची क्षमता कुणामध्ये आहे, असा प्रश्न सार्वजनिकरीत्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना विचारा, तर ते एकमताने उत्तर देतील, ‘नारायण राणे..’ ते आज सत्तेत नाहीत.
सामान्यपणे जे सत्तेत नसतात ते घराच्या बाहेर फारसे पडत नाहीत. आज सत्तेत नसताना मराठवाडयाच्या दौ-यावर राणे धावून गेले. शेतक-यांशी बोलले. कोणीतरी आपल्यासाठी धावून येतो आहे, ही भावना ग्रामीण भागात फार मोठी मानली जाते. यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही मराठवाडयात घुसळण करून आले. या वयात आणि आजारावर मात करूनही ते फिरत आहेत. याची गरज आहे.
सरकार जेव्हा मख्ख आहे, भाजपाचा प्रदेश अध्यक्ष मराठवाडयातला आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात दानव्यांना कोणी जमेला धरले नव्हते. त्यांचा महाराष्ट्राला कधी उपयोगही झाला नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दानवे कोण हे माहीतही नाही. मुख्यमंत्री जसे बिनकामाचे आहेत, तसा भाजपाचा प्रदेश अध्यक्षही बिनकामाचा आहे. अशावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर फार मोठी जबाबदारी होती. शिवाय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मराठवाडयातले. तेही माजी मुख्यमंत्री.
काँग्रेसची सगळी ताकद पणाला लावून अशोक चव्हाण यांनी मराठवाडयात तंबू ठोकून बसायला हवे होते. कलेक्टर कार्यालयात धडकायला हवे होते. मुख्यमंत्री येवो न येवो, कलेक्टरच्या अधिकारात अनेक गोष्टी करता येतात हे नारायण राणे यांनी कलेक्टरची भेट लातूरमध्ये घेऊन त्यांना तपशिलात समजावून सांगितले. काही निर्णय करण्याकरिता वाट पाहण्याची गरज नाही.
अशोक चव्हाण यांना हे करता आले असते. त्यांच्याकडेही महसूल खाते होते. या खात्याचे जिल्हाधिका-यांचे अधिकार त्यांना माहीत आहेत. पण मराठवाडयात काँग्रेसने जिल्हाधिका-यांच्या दारावर धडक दिली, असे घडले नाही आणि दुष्काळात सापडलेल्या मराठवाडयातल्या शेतक-याला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनाही त्यांचे मनोबल वाढेल असा कार्यक्रम काँग्रेसने दिला नाही. मुंबईमध्ये षण्मुखानंद सभागृहात मेळावा घेऊन होणारे हे काम नाही. भाषणाचा उपयोग नाही.
शेतक-याच्या मागे नेता उभा आहे, हा विश्वास देण्याची गरज आहे. त्यात महाराष्ट्रातली काँग्रेस कमी पडली हे स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे. सत्ता नसल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते अगोदरच नैराश्यात आहेत. या नैराश्याची गरज नाही. सत्ता असेल किंवा नसेल. काँग्रेस या शब्दाचा अर्थच लोकांच्या बरोबर राहणारा पक्ष. हा समजून घेतला पाहिजे.
भाजपाला कितीही दूषणे दिली तरी पंधरा वर्षे ते सत्तेबाहेरच होते. चिकाटी ठेवली. भलेबुरे मार्ग पत्करले. मोदींची हवा कामाला आली आणि नशिबाने सत्ता मिळाली. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले शहाणपणाने वागले असते, आघाडी तोडली नसती तर मोदी लाटेचा महाराष्ट्रात प्रभाव दिसला नसता.
काँग्रेसचे २७ उमेदवार असे आहेत की जे ५०० ते १८०० मतांच्या फरकाने पडले आहेत आणि राष्ट्रवादीचे २९ उमेदवार असे आहेत की, जे पाच हजार मतांच्या फरकाने पडले आहेत. भाजपाला १२३ जागा मिळाल्या. पण त्यांचे सत्तावीस विजयी उमेदवार असे आहेत की जे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार होते, ते भाजपामध्ये जाऊन निवडून आले. अजूनही शहाणपणाने वागले तर हे सरकार उलटवता येईल. काँग्रेस श्रेष्ठींनी गंभीरपणे काही गोष्टींचा विचार केला पाहिजे की, महाराष्ट्रात काँग्रेस उभी करण्यात काय अडचणी आहेत? विधानसभेतला विरोधी पक्षनेता कमी पडत आहे का? काही वेळा स्पष्ट बोलण्याच्या भूमिका घ्याव्या लागतात.
आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल मत आजमावून पाहा. काँग्रेस कार्यकर्ते समाधानी नाहीत, जिल्हा अध्यक्ष समाधानी नाहीत. पुन्हा या विषयावर सर्वाचे मत याच ठिकाणी येऊन थांबते, ‘आज नारायण राणे विधानसभेत हवे होते..’ सरकारबद्दल लोकांच्या मनात असंतोष संघटित होतो आहे, महागाईमुळे लोक हैराण आहेत.
मोदींनी आपली फसवणूक केली, हेही लोक आता उघडपणे बोलतात. महाराष्ट्राच्या सरकारबद्दलही लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे. ही मंडळी भ्रष्टाचारी आहेतच. पण नैतिकतेचे सोवळे नेसून भ्रष्टाचार करतात. चारित्र्याचा आव आणतात, त्यामुळे जास्त संताप आहे. बोगस पदवीवाल्या शिक्षणमंत्र्याला आपल्या पदवीचा अभिमान वाटतो. ही अशी टोळी जमलेली आहे आणि आमचा विरोधी पक्षनेता कमी पडत आहे.
विधानसभेच्या अधिवेशनात पायंडय़ांवर बसून वेळ फुकट घालवणारा विरोधी पक्ष पायंडय़ांवर बसण्याकरिता लोकांनी निवडून दिलेला नाही. विरोधी पक्ष बाहेर आणि सभागृह चालू. भाजपाने अठरा महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेतली. त्यात सहकारी बँकांच्या निवडणुकीला स्थगिती देणारा अध्यादेशही मंजूर झाला.
विरोधी पक्षनेत्याचे हे चुकलेच. तेही एका सहकारी संस्थेचे प्रमुख आहेत. पण विरोधी पक्षाने जे दणाणून टाकायला हवे होते आणि सरकारचे कपडे फाडायला हवे होते, ते विरोधी पक्षनेत्याला जमले नाही. राज्याच्या प्रदेश काँग्रेस अध्यक्षालाही ते जमत नाही. शिवाय दोन्ही जण एकाच ताटातल्या वाटया आहेत. पक्षश्रेष्ठींना आता कोणीतरी जाऊन हे सांगायला हवे की महाराष्ट्रात जी जोडी तुम्ही ठेवली आहे ती जोडी पुढचे चार वर्षे महाराष्ट्रात काँग्रेस उभी करेल, एवढया क्षमतेची नाही. तडजोडवादी आहे.
आज महाराष्ट्र काँग्रेसला आक्रमक नेतृत्वाची गरज आहे. सत्ता असो किंवा नसो, महाराष्ट्रातल्या संकटाच्या ठिकाणी धावून जाणा-या नेत्यांची गरज आहे. नारायण राणे यांनी या दुष्काळाच्या निमित्ताने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जागे केलेले आहे. आता त्यांच्याशिवाय महाराष्ट्र काँग्रेसजवळ तेवढा आक्रमक नेता नाही.
यात व्यक्तिगत आवड-निवडीचा प्रश्न नसून पुढची चार वर्षे सरकारशी लढायचे आहे, हे भान ठेवून महाराष्ट्रात काँग्रेसला कोण उभे करू शकतो, याचे उत्तर सुद्धा नारायण राणे हेच आहेत. लातूरमध्ये कार्यकर्त्यांनी ही भावना जाहीरपणे व्यक्त केली. पक्षश्रेष्ठींच्या कानावर आता ती भावना सामुदायिकपणे घातली पाहिजे.