राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये होणार सत्तांतर?, विधानसभांत काँग्रेसला अच्छे दिन
मुंबई – सर्व राजकीय पक्ष सध्या २०१९च्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळवही सुरू झाली आहे. कार्वी इनसाईट्स आणि इंडिया टुडेच्या सव्र्हेनुसार आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीए सत्ता राखत आहे, मात्र भाजपला स्वबळावर सत्ता आणता येणार नाही.
वन नेशन, वन इलेक्शन शक्य झाले नाही, तर मुदतीनुसार या वर्षअखेरीस राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभांच्या निवडणुका होतील. या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात सत्तांतर होण्याची शक्यता असून एका पाहणीत तीनही ठिकाणी काँग्रेसला अच्छे दिन, तर भाजपला बुरे दिन येण्याची शक्यता सी व्होटर्सने केलेल्या पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. अर्थात भाजपवर कोणतेही वाईट आरोप अथवा खराब कामगिरीमुळे मतदार नाराज नाहीत, तर दीर्घकाळ त्यांच्याकडे सत्ता असल्याने मतदारांना बदल हवा आहे, असे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशात पंधरा वर्षापासून भाजपची सत्ता आहे, तर राजस्थानात गेली दहा र्वष भाजप सत्तेत आहे. त्यामुळे मतदारांना बदल हवा असल्याने ही राज्य भाजपच्या हातून जाण्याची शक्यता आहे, मात्र लोकसभेसाठी भाजपला पसंती असून पंतप्रधान म्हणून मोठय़ा संख्येने नरेंद्र मोदी यांच्या नावावरच अनेकांनी शिक्कामोर्तब केले आहे. मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांपैकी काँग्रेसला ४२ टक्के मतदान होऊन ११७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर ४० टक्के मतांच्या जोरावर भाजपला १०६ जागांवर विजय मिळवता येईल. अन्य पक्षांना ७ जागांवर समाधान मानावे लागेल. स्पष्ट बहुमतासह काँग्रेस सत्तेवर येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. मध्य प्रदेशच्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून ४२ टक्के मतांसह शिवराजसिंह चौहान यांच्या नावालाच पसंती दिलेली आहे, तर ज्योतिरादित्य शिंदे यांना ३० टक्के मतांसह दुस-या क्रमांकावर टाकले आहे. कमलनाथ यांना अवघी ७ टक्के लोकांची पसंती आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला चौहान यांच्या लोकप्रियतेचा करिष्मा वापरावा लागेल. राजस्थानात मात्र काँग्रेसला भरघोस यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभेच्या २०० जागांपैकी तब्बल १३० जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपच्या बहुतेक जागा या निसटत्या फरकाने जाण्याची शक्यता असून भाजपला फक्त ५७ जागा मिळण्याची शक्यता आहे. अन्य पक्षांना १३ जागा मिळण्याची शक्यता पाहणीत वर्तवण्यात आली आहे. इथे मतांच्या टक्केवारीत भाजप पुढे असले तरी घसरलेला टक्का काँग्रेसच्या परडय़ात झुकते माप टाकताना दिसतोहे. भाजपला ४० टक्के काँग्रेसला ३९ टक्के तर अन्य पक्षांना २१ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. राजस्थानात वसुंधराराजेंवर मतदारांची नाराजी दिसून येत असून मुख्यमंत्री पदासाठी अशोक गेहलोत यांना ४१ टक्के मतदारांची पसंती आहे, तर वसुंधरा राजे यांना २४ टक्के मतदारांची पसंती आहे. सचिन पायलट यांच्या नावाला १८ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे.
या पाहणीत छत्तीसगडमध्येही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असे म्हटले आहे. विधानसभेच्या ९० जागांपैकी ५४ जागांवर विजय मिळवत काँग्रेस सत्ता स्थापन करेल. भारतीय जनता पक्षाला ३३ जागा मिळतील तर अन्य पक्षांना ३ जागा मिळतील असा अंदाज आहे. मुख्यमंत्रीपदासाठी मात्र रमणसिंग यांनाच सर्वाधीक पसंती आहे. त्यांना ३४ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे, तर अजीत जोगी यांना दुस-या क्रमांकाची पसंती आहे. त्यांना १७ टक्के लोकांची पसंती आहे.
या तिनही राज्यांत सत्तांतराच अंदाज असला तरी पंतप्रधान म्हणून तिनही राज्यांमधून नरेंद्र मोदी यांनाच पसंती दिली आहे. मध्यप्रदेशातून नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी ५४ टक्के जनतेची पसंती आहे तर राहुल गांधी यांना २५ टक्के पसंती आहे. राजस्थानात मोदींना ५५ टक्के जनतेची पसंती आहे, तर राहुल गांधी यांना २२ टक्के लोकांची पसंती आहे. छत्तीसगडमध्ये मोदींना ५६ टक्के जनतेची अनुकूलता आहे तर राहुल गांधींना २१ टक्के जनतेची पसंती आहे. त्यावरुन हे स्पष्ट होते की इथल्या मतदारांना राज्यात बदल व्हावा असे वाटले तरी केंद्रात तो अपेक्षित नाही.