कथाकथन हा प्रकार आता पूर्वीसारखा लोकप्रिय राहिलेला नाही. कथाकथन करताना स्वत:ची कथा, ती सांगण्याचे कौशल्य, अभिनयकौशल्य, आवाजातील चढउतार आदींची जाण असावी लागते. कथाकथन हा लोकप्रिय होण्यासारखा प्रकार असूनही, चांगले कथाकथनकार नाहीत, अशी खंत व्यक्त केली आहे, 13 एप्रिल रोजी नव्वदीत प्रवेशणारे प्रसिद्ध लेखक आणि कथाकथनकार द. मा. मिरासदार यांनी…
लहानपणापासून मी खूप मराठी वाचन केले. पण इंग्रजी साहित्य वाचायचे राहून गेले. त्यामुळे सध्या मी जास्तीत जास्त वाचन करण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद मराठीत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. लेखन बंद झाले असले, तरी अजून खूप काही वाचायचे राहिले आहे. ती इच्छा आता पूर्ण होतेय?. ?
चिं. वि. जोशी, व्यंकटेश माडगूळकर, पु. ?भा. भावे, दि. बा. मोकाशी आदी लेखकांचे लेखन निरनिराळ्या प्रकारांनी मला आवडते.
पंढरपूरसारख्या छोटय़ा गावात बालपणी मी विविध प्रकारचे साहित्य वाचले. ‘नवनाथ कथासार’, ‘हरिविजय’ अशी धार्मिक पुस्तके आणि ‘ठकसेन-राजपुत्र’, ‘गुलबकावली’, ‘सिंहासन बत्तीशी’ अशी मनोरंजक पुस्तके वाचली. त्यातून गोष्ट म्हणजे काय हे कळले. माझी प्रवृत्तीच मुळात विनोदी आहे. चिं. वि. जोशी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, आचार्य अत्रे यांच्या साहित्याचा माझ्यावर प्रभाव पडला.
आपणही लेखन करावे ही इच्छा झाली. महाविद्यालयीन काळात लेखन करायला सुरुवात केली. मी गंभीर स्वरूपाचे बरेच लेखन केले आहे. पण वाचकांनी विनोदी लेखनच आवडले आणि विनोदी लेखक अशी बिरुदावली लागली. विनोदी नाटक आणि विनोदी कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न या पातळीवरच राहिला?
आजवर जे मिळाले, त्यात मी समाधानी आहे. जे मिळाले नाही. ते यापुढे मिळण्याची शक्यता नाही. आजवर मिळालेल्या सर्व गोष्टींबाबत मी समाधानी आहे. विनोदाकडे झुकण्याची प्रवृत्ती माझ्यामध्ये नैसर्गिकरीत्या निर्माण झाली. लहानपणापासून वाचनाचे खूप वेड होते. चिं. वि. जोशी, प्र. के. अत्रे आदी लेखकांच्या लेखनाचा माझ्यावर प्रभाव पडला. आपणही अशा प्रकारचे लेखन करावे, अशी इच्छा नकळत निर्माण झाली. वाचनाची आवड शालेय जीवनापासून असली तरी महाविद्यालयीन काळात मी लिहायला लागलो.
जुन्या मराठी भाषेला इंग्रजी, उर्दूचा स्पर्श झाला नव्हता. जुन्या मराठीतील धार्मिक आणि मनोरंजनात्मक पुस्तके मी मोठय़ा प्रमाणात वाचली. या वाचनातूनच गोष्ट म्हणजे काय आणि ती कशी लिहायची, हे कळू लागले. जुन्या मराठीचा मी माझ्या लेखनातही वापर केला आहे. आजकालच्या वाचकांना जुनी मराठी भाषा फारशी माहीत नाही.
मला गंभीर तसेच रहस्यमय लेखन आवडते. त्यातही, कथात्मक लेखन मला जास्त भावते. विनोदी नाटक अथवा कादंबरी लिहिण्याची काही पाने मी लिहिली. पण ती पूर्णत्वास जाऊ दिली नाहीत.
इंग्रजी साहित्याचा अनुवाद असलेल्या पुस्तकाचे सध्या मी वाचन करीत असल्याने त्या अर्थाने माझे मराठी साहित्याचे वाचन कमी झाले आहे. सध्याच्या मराठी लेखनामध्ये चांगला विनोद राहिलेला नाही, असे अनेकांचे मत आहे. अनेक जण असे म्हणतात त्या अर्थी त्यामध्ये तथ्य असावे. कथाकथन करण्यासाठी लेखन विनोदी हवे. त्या लेखकाकडे वक्तृत्व आणि अगदी नट नसला तरी अभिनयाचा अंश असला पाहिजे. तरच, कथाकथन उत्तम होऊ शकते?
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सदोष आहे. त्यामुळेच चांगले साहित्यिक आजवर संमेलनाध्यक्ष म्हणून निवडून आले नाहीत. चिं. वि. जोशी दोन-तीन वेळा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहिले. तरीही, त्यांना पुरेशी मते मिळाली नाहीत, हे दुर्दैव आहे. मीही निवडणुकीला उभे राहिलो, तेव्हा माझ्यापेक्षा ज्येष्ठ साहित्यिक समोर असल्याने मी माघार घेतली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये जेवढय़ा अध्यक्षांचे फोटो झळकले आहेत, त्यापैकी किती जणांचा साहित्याशी संबंध आहे. याचा विचार करावा लागेल. संमेलनाध्यक्षांचे क?र्तृत्व काय, असा प्रश्न पडतो. आजकाल, संमेलनाध्यक्ष निवडून आल्यावर हे कोण, असा प्रश्न उपस्थित केला जातो. पूर्वीपासून चांगले साहित्यिक अध्यक्षपदापासून दूर राहिले आहेत.
??कथाकथन हा प्रकार आता पूर्वीसारखा लोकप्रिय राहिलेला नाही. कथाकथन करताना स्वत:ची कथा, ती सांगण्याचे कौशल्य, अभिनयकौशल्य, आवाजातील चढउतार आदींची जाण असावी लागते. कथाकथन हा लोकप्रिय होण्यासारखा प्रकार असूनही, चांगले कथाकथनकार नाहीत. सध्याचा जमाना सोशल मीडियाचा असला तरी आमची पिढी त्यापासून दूरच राहिली. बरोबर की चूक, ते माहीत नाही.
शाब्दिक विनोदापेक्षा प्रसंगनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ विनोद ?मला ?जास्त भावतो. भाषांतर होऊ शकत असेल आणि मूळ आशय कायम राहत असेल, तर ते चांगले विनोदी लेखन ठरते. विनोदी लेखनातून पात्रांची निर्मिती करता आली पाहिजे. ती पात्रे लोकांना आपली वाटली पाहिजेत, समाजापर्यंत भिडली पाहिजेत. ज्याला पात्रे निर्माण करता येतात, त्याचेच विनोदी लेखन यशस्वी आणि लोकप्रिय झाले असे समजावे. सध्या चांगले, सकस आणि विनोदी साहित्य वाचायला मिळत नाही, अशी वाचकांची तक्रार आहे.
आपल्या लेखनातून विनोदी पात्रं निर्माण करता आली पाहिजेत. या पात्रांपैकी किमान एक तरी व्यक्तिरेखा आपल्यातील आहे असे वाटले किंवा ती जवळची आहे, असे वाटले पाहिजे. त्यामुळे व्यक्तिरेखा आपलीशी वाटणे हेच चांगल्या विनोदी लेखनाचे यश आहे. आता लेखन होत नसल्याने केवळ अनुवादित साहित्य वाचनाचा आनंद लुटत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी काम केले असले, तरी राजकारणात जाण्याचा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. कारण, तो माझा प्रांतच नाही. राजकारणासाठी व्यक्ती पोलादी, खंबीर असावी लागते. मराठी साहित्यासाठी दिलेल्या योगदानाची शासनाकडून आजवर योग्य दखल घेतली गेली. त्यामुळे अन्याय झाला, असे अजिबात वाटत नाही. नव्वदीचा टप्पा गाठलेला मी कदाचित एकमेव लेखक!? आणि या टप्प्यावर मी समाधानी आहे.