आधारकार्डाच्या नोंदणीसाठी धडाक्यात सुरुवात झाल्यावर नंतर मात्र, या कार्यक्रमाचा वेग मंदावला आहे.
आधारकार्डाच्या नोंदणीसाठी धडाक्यात सुरुवात झाल्यावर नंतर मात्र, या कार्यक्रमाचा वेग मंदावला आहे. विशेषत: चेंबूर, कुर्ला आणि तशाच प्रकारच्या झोपडवस्ती असलेल्या भागात आधारकार्डाच्या काही नोंदणी केंद्रांवर प्रक्रिया थांबली आहे. तर जिथे सुरू आहे तिथे आधार नोंदणी यंत्रांची मर्यादित क्षमता आणि अपुरं मनुष्यबळ यामुळे या भागातल्या नागरिकांना ‘आधार’च्या नोंदणीसाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे.
‘ओ ताई कुठं निघालात एवढय़ा रातीला?’ ‘दादा आधारकार्ड हवं ना, म्हणून लाइन लावण्यासाठी चाललीया’, असे संवाद झोपडी, चाळी व आता ‘एसआरए’ योजनेमुळे इमारतबहुल होत असलेल्या चेंबूर भागात ठिकठिकाणी कानी पडत आहेत. कधीकाळी महिन्याच्या पहिल्या तारखेला रॉकेलचा डबा घेऊन रेशनकार्डासाठी धावणारा झोपडीवासी आता रात्रीचा दिवस करून आधारकार्डासाठी रांगा लावत आहे. एक दिवस अर्ज घेण्यासाठी, दुसरा दिवस तारीख घेण्यासाठी आणि तारीख मिळाली की मग त्या दिवशी आधारकार्डाच्या रांगेत तासन्तास उभं राहून, अधिका-यांना सगळी कागदपत्रं दाखवून, ती सगळी बरोबर आहेत म्हटल्यावर मग हाताचे ठसे, बुबुळं यांची तपासणी करा आणि मग बघा वाट, आधार कधी येईल याची. हाच अनुभव चेंबूर लाल डोंगर, सुमननगर, सिद्धार्थ कॉलनी, वाशीनाका, कुर्ला, ठक्करबाप्पा कॉलनी आणि चेंबूर घाटला गाव आदी परिसरात राहणा-यांकडून ऐकायला मिळत आहे.
जणू लाट आल्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वी आधारकार्ड वाटप व नोंदणी काम चेंबूरमध्ये धडाक्यात सुरू झाले. पण मागील काही दिवसांपासून ब-याच ठिकाणी ‘आधार’ची मोहीम थंडावली असून, ‘आधारकार्ड’ नेमके कुठे काढून मिळते, याचा शोध घेण्यातच अनेकांचा वेळ खर्ची जात आहे. चेंबूर स्टेशन परिसरात वैशाली हॉटेलसमोर असलेल्या एका चिंचोळय़ा गल्लीतील आधार केंद्रावर तर रात्रं-दिवस झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. अगदी रात्री एक वाजल्यापासून या केंद्रावर भलीमोठी रांग लागत असून, डुलक्या खात का होईना पण ‘आधार’ मिळवायचेच, असा निश्चय करूनच अनेक जण घराबाहेर पडत आहेत. हे केंद्र सकाळी दहाच्या ठोक्याला उघडत असले तरी आधार मिळेल एवढय़ाच आशेवर काही जण भल्या पहाटे झोपमोड करून किंवा अगदी रात्रीच या केंद्रावर तंबू गाडून बसत आहेत. अगदी महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तरुण व हाफ डे घेऊन नोकरीवर जाणारे नोकरदार ‘रांगेचा फायदा सर्वाना’, असेच चित्र ठिकठिकाणी आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची मोठय़ा प्रमाणावर कामे सुरू असलेल्या वाशीनाका, म्हाडा वसाहत, प्रबुद्धनगर (टाटा कॉलनी), वाशी गाव, माहुल गाव आदी भागातही पुरेशी आधारकार्ड केंद्रे उपलब्ध नसल्याने निम्म्याहून अधिक लोक आधारपासून वंचित आहेत. ‘आधार’ची धडक मोहीम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला मरवली चर्च, चेंबूरनाका, घाटला गाव येथील महापालिका शाळांत सकाळपासूनच आधारसाठी भल्यामोठय़ा रांगा लागत होत्या. मात्र, सध्या या केंद्रांवर ‘येथे आधारकार्डाची चौकशी करू नये’, असा फलक झळकावण्यात आल्याने आधार कुठे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी आधार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ते सर्वाना मिळेल अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करणारी सरकारी जाहिरात चिकटवण्यात आली आहे. मात्र एका दिवशी केवळ ३० किंवा ५० कार्डे काढण्याची क्षमता असलेलं आधार यंत्र हजारोंची लोकवस्ती असलेल्या झोपडवस्ती असलेल्या भागात किती जणांना आणि किती काळात आधारकार्ड पुरवेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गर्भवती महिलांची निराशा
गर्भवती महिलांना रांगेत उभे न ठेवता, यापुढे प्राधान्याने आधारकार्ड देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, अनेक महापालिका रुग्णालयात गर्भवती महिलांना आधारकार्ड काढून मिळते, या समजुतीनं सकाळपासूनच धावपळ करणाऱ्या महिलांच्या पदरी निराशा येत आहे. चेंबूरनाका येथील माता रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृहात सकाळपासून आधारकार्ड काढण्यासाठी कागदोपत्रांसह दाखल होणा-या महिलांना अगदी दुपारी बारा वाजेपर्यंत ताटकळत राहूनही ‘आधार’ मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विद्याविहार येथील राजावाडी रुग्णालय, माँ हॉस्पिटल आदी महापालिका रुग्णालयात आधारकार्ड काढून दिले जात असल्याचे महापालिकेच्या रुग्णालयातील कर्मचारी सांगतात. मात्र, हे काम करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळच नसल्याने तारांबळ उडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.