उद्या सोमवार १२ जानेवारी २०१५ स्वामी विवेकानंद यांची जयंती. नवीन वर्ष सुरू होऊन आज अकरा दिवस झाले. नवीन संकल्पांचे, नवी आशा-आकांक्षाचे बी पेरले गेले असेल.
उद्या सोमवार १२ जानेवारी २०१५ स्वामी विवेकानंद यांची जयंती. नवीन वर्ष सुरू होऊन आज अकरा दिवस झाले. नवीन संकल्पांचे, नवी आशा-आकांक्षाचे बी पेरले गेले असेल. आता ते रूजून कोवळे अंकुर वर येऊन त्यातून उद्या फुला-फळांनी बहरलेल्या वृक्षाची निर्मिती होण्यासाठी, साकार होण्यासाठी मनात उत्साहाची कारंजी उसळणार आहेत. रंगीबेरंगी फुलपाखरं रूंजी घालणार आहेत. स्वप्नांचे काजवे चमकणार आहेत. पण यासाठी मागच्या वर्षाचा परामर्श घेणं, सिंहावलोकन करणं याचं भान असणं आवश्यक आहे.
कारण भूतकाळाच्या खांद्यावर वर्तमानकाळ उभा असतो आणि भविष्यकाळ उज्ज्वल घडवण्यासाठी आधारभूत होतो. म्हणूनच गेल्यावर्षी आपण काय करायचे ठरवले होते, त्यात कितपत प्रगती झाली, ते करताना किती अडचणी आल्या, कुठल्या समस्यांशी सामना करावा लागला, त्यासाठी कुणी मन:पूर्वक मदत केली, कुणी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला याचा शांतपणे शोध घेऊन यापुढे कशी पावलं टाकायची, कसे धोरण ठरवायचे याचाही सर्व बाजूंनी स्थिर मनात विचार करायला हवा. यासाठी जुने ते सर्व टाकाऊ न ठरवता त्यातले योग्य ते निवडून सकारात्मक दिशेने वाटचाल करायला हवी.
आयुष्यात भविष्यात यशस्वी होण्यासाठी एक संकल्पना निवडा. त्या संकल्पनेलाच तुमचे जीवन बनवा. तिचाच विचार करा. तिचेच स्वप्न बघा. ती संकल्पनाच जगा. मेंदू, स्नायू, मज्जातंतू तुमच्या शरीरातील प्रत्येक भाग त्या संकल्पनेनेच भारून जाऊ द्या. बाकीच्या सर्व संकल्पना दूर सारा. हाच यशाचा मार्ग आहे, असे स्वामीजी म्हणतात. आपल्या कार्यात तल्लीनता हवी. तल्लीनता केवळ ईश्वरभक्तीतच असते, असं नाही; तर सामान्य माणसालादेखील रोजच्या व्यवहारात एकाग्र होता येतं आणि ही एकाग्रता निर्माण झाली की, आत्मविश्वास आणि कौशल्य यांच्या संयोगाने आपोआपच ती कार्यपूर्ती होते. एखादी अडचण किंवा समस्या निर्माण झाली की, स्वत:ला त्या समस्येपेक्षा मोठं करायचं म्हणजे ती समस्या छोटी वाटू लागते आणि ती सोडवणं सोपं जावं. राम-रावण युद्धात लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध झाला. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी संजीवनी वनस्पतीची गरज होती. ही जबाबदारी मारूतीने घेतली आणि द्रोणागिरी पर्वतावर गेला, पण तिथे गेल्यावर संजीवनी नावाची वनस्पती कोणती आहे, हे त्याला कळेना म्हणून सर्व द्रोणागिरी पर्वतच त्याने उचलून आणला.
सुख पाहता जवापाडे दु:ख पर्वताएवढे, असं तुकोबांनी म्हटलं आहे. तेव्हा सुख मिळणं न मिळणं हे जरी आपल्या हातात नसलं तरी सुखी व्हायचं मात्र आपल्याच हातात असतं. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून आजच्या वर्तमानात जगायला हवं आणि आनंद मिळवायला हवा. तो आनंद मिळवण्याची दृष्टी हवी आणि ही दृष्टी आपल्याला अनेक माध्यमातून मिळवता येते, हीच भावना आनंद या कवितेतून मी व्यक्त केली आहे.
क्षितिजावर उमटणा-या
संधीप्रकाशात
आनंद न्याहाळायला हवा
मोकळ्या आकाशात उडणा-या
पक्ष्यांच्या भरारीत
आनंद कळायला हवा
फुलांच्या उमलत जाणा-या
सुगंधी पाकळ्यात
आनंद हुंगायला हवा
स्वच्छंदपणे बागडणा-या
रंगीबेरंगी फुलपाखरात
आनंद जाणवायला हवा
अवखळपणे झुळझुळणा-या
झ-याच्या संगतीत
आनंद भिजायला हवा
थुईथुई नाचणा-या
मोराच्या पिसा-यात
आनंद दिसायला हवा
आकाशात चमचमणा-या
ता-यांच्या प्रकाशात
आनंद शोधायला हवा
सुरेल झंकारणा-या
स्वरांच्या संगतीत
आनंद झिरपायला हवा
पदन्यासावर थिरकणा-या
डौलदार पावलात
आनंद रंगायला हवा
रंगछटा चितारणा-या
प्रसन्न चित्रात
आनंद बहरायला हवा
विविध शैलीदार
शिल्पकलेत
आनंद विरघळायला हवा
बालकाच्या हसणा-या
निरागस हास्यात
आनंद खुलायला हवा
समाजसेवेत रमून जाणा-या
सेवकाच्या सेवेत
आनंद भिडायला हवा
अक्षर वाङ्मयातून निर्माण होणा-या
भावसमाधीत
आनंद बुडायला हवा
या सा-यात एकरूप होणा-या
अस्तित्वात
आनंद अनुभवायला हवा
आनंद अनुभवायला हवा