आज मतदान म्हणजे मतदान कक्षाकडे सगळ्यांचीच रेलचेल दिसेल. त्यात काही नवखे तरुण मतदारसुद्धा असतील. जे पहिल्यांदा मत करणार असतील, त्यांना मतदानाचा हक्क मिळाला असला तरी नवख्या मतदाराला राजकारणातलं ज्ञान असेलच असं नाही. पण आधीपेक्षा आजची तरुणाई जागरुक आहे. ही तरुणाई प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे बघते. त्यामुळे त्यांचा या मतदानाबद्दल नक्की काय दृष्टीकोन आहे आणि पहिल्यांदा मतदान करणा-यांच्या नक्की भावना काय आहेत हे त्यांच्याशी बोलल्यावरच कळतं.
सगळीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. इतके दिवस चाललेला प्रचार थांबला असून आज खरा तो कसोटीचा म्हणजे मतदानाचा क्षण आला आहे. आज मतदानाचा दिवस. सामान्य नागरिक कोणाला मत देणार याची उत्सुकता प्रत्येक राजकीय नेत्याला आहे. कोणाला यश मिळेल आणि कोणाला नाही या विचारात प्रत्येक राजकीय नेत्याचा जीव टांगणीला लागलेला आहे. मतदान हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. कारण एक मतदेखील एखाद्या पक्षाचं भवितव्य ठरवत असतो. आपल्या पक्षात अधिकाधिक तरुणांना सामावून घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. कित्येक तरुण हिरीरीने सहभागीदेखील होतो. म्हणूनच जे पहिल्यांदा आपलं बहुमूल्य मत देणार आहेत त्यांना या आपल्या हक्काविषयी नेमकं काय वाटतं? मतदान करताना ते कशा प्रकारे विचार करतात? त्यांना राजकारणातलं काही कळतं की नुसतं टाइमपास म्हणून केवळ मत देतात, त्यामागे त्यांची काय भावना असते? पहिल्यांदाच मतदान करणा-या या तरुणाईंना नक्की काय वाटतं त्यांची नेमकी काय भावना असते, आपल्या राज्याच्या भवितव्यासाठी नेत्याला निवडून देण्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आजचा तरुण काय निकष लावतो, हे विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. कारण आजची तरुण पिढी ही सुशिक्षित आहे, विचार करणारी आहे, स्वत:च्या जबाबदा-यांची त्यांना जाणीव आहे, समाजाप्रती भान आहे, म्हणून ते मतदान करताना नेमका काय विचार करतात ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज मोठय़ा संख्येने काही तरुण मंडळी प्रथमच मतदान करणार आहेत. या पहिल्या-वहिल्या अनुभवाविषयी त्यांचे काय विचार आहेत, एक सुजाण नागरिक म्हणून ते याबाबत किती जागरूक आहेत हे त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न
ही जाणीवच छान आहे
मतदान करण्याची ही माझी पहिलीच वेळ असल्यामुळे थोडा आनंद झाला आहे. जगातल्या सर्वात मोठय़ा लोकशाहीचा आपण एक भाग आहोत याची जाणीव आज पहिल्यांदाच होत आहे. आपला लोकप्रतिनिधी निवडण्यात आपलाही काहीतरी वाटा आहे ही जाणीवच खूप छान आहे. तसंच हा मतदानाचा अधिकार बजावत असताना आपण या समाजाचे जबाबदार नागरिक आहोत याचीसुद्धा जाणीव होते. या निवडणुकीच्या रणधुमाळीत जरी सर्वत्र आश्वासने, प्रलोभने आणि जाहिरातींचा पाऊस पडत असला तरी आजचा तरुण हा प्रलोभनांना आणि जाहिरातींना भुलणारा नाही. आजची तरुण पिढी सतर्क आणि सुजाण आहे. जो लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्दयांवरती काम करेल त्यालाच तरुणांचं मत मिळेल. काहीही असो पहिल्यांदा मतदान करताना एक प्रश्न सारखा सतवतोय तो म्हणजे ‘मतदान म्हणजे नक्की काय? माझा अधिकार, कर्तव्या की जबाबदारी?’.- संकेत कुपेकर
माझा हक्क, माझी जबाबदारी!
लोकशाही असलेल्या देशात मी प्रथमच मतदान करणार आहे. आता येणा-या विधानसभा निवडणुकांमध्ये मत कोणाला द्यायचं? कोणता पक्ष आपल्या समस्यांचं निराकरण करेल? हे प्रश्न प्रत्येक मतदाराला पडतात. आजच्या संगणक युगात नेतेमंडळी तरुण पिढीला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे योग्य उमेदावाराला निवडूण देणं ही प्रत्येक तरुणाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. मतदान हा माझा हक्क तर आहेच पण समाजाच्या कल्याणासाठी एका ख-या माणसाची निवड करणं ही माझी जबाबदारी आहे. – राजेंद्र आर्दालकर
अमाप उत्साह आहे !
लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझं मतदान नव्हतं. त्यावेळी मला फार वाईट वाटलं, त्यामुळे मी अगदी प्रयत्नपूर्वक माझी नोंदणी करून घेतली. आता पहिल्यांदाच मी विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान करत आहे. मला राज्याचा वा इतर पक्षांच्या परिस्थितीचा फारसा अभ्यास करायला मिळाला नाही. त्यात माझी रुचीही नाही. मी जे मत देणार आहे ते माझ्या विधानसभा मतदार संघातल्या सर्व उमेदवारांचा विचार करूनच देणार आहे. आमच्या घरी जवळ जवळ सर्वच उमेदवार येऊन गेले आहेत. काही जण केवळ प्रचारासाठी तर काही जण राजकीय चर्चेसाठीही आले होते. त्यावेळी जे माझ्या कानावर पडत होतं. त्यानुसार मग मी माझं मत तयार केलं आहे. माझा संबंध हा माझ्या सभोवतालच्या वातावरणाचा आहे. त्यात सहजता असली पाहिजे. मी काही दिवस लंडनमध्ये राहिल्यामुळे तिथे व्यवस्था कशा प्रकारे काम करते हे मी पाहिलेलं आहे. त्यावेळी माझ्या घराच्या आजुबाजुलाही अशाच प्रकारचं वातावरण असावं अशी माझी अतीव इच्छा होती. तिथले रस्ते, तिथली कचरा उचलण्याची पद्धत, तिथले पोलिस आणि त्यांची काम करण्याची पद्धत. त्याचप्रमााणे तिथली सार्वजनिक वाहतुक व्यवस्था या सा-या गोष्टी मी जवळून पाहिल्या आहेत. अगदी त्यांच्यासारखंच नाही तरी किमान लोकांचा वावर सहज व आरामदायक व्हावा अशी परिस्थिती तरी निर्माण करायला हवी. माझ्या मनात अशा अनेक भावना असल्या तरी आज सकाळी मतदान केंद्रावर जाऊन माझं मत देणार याचाच आनंद मला अधिक आहे. मतदान करताना माझं नाव पुकारतील तेव्हा तर मला अगदी सेलिब्रेटी झाल्यासारखं वाटेल हे निश्चित. – आकांक्षा शिरभाते
अभ्यासपूर्वक मतदान करणार
पहिल्यांदाच मतदान करणार आहे म्हणून मतदान म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्त्व काय आहे, हे वडिलधा-यांकडून आधीच समजून घेतलं आहे. मतदान हे कोणाला विचारून न करता स्वत:च्या मनाला काय वाटतं त्याचा विचार करूनच कराव. मतदान करण्याची ही माझी पहिलीच वेळ असली तरीही योग्य त्या उमदेवाराला निवडून मी माझ्या मतदानाचा हक्क बजावेन. मत द्यायचं आहे म्हणून कोणत्याही उमेदावाराला मतदान दिलं म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. आजवर कोणत्या उमेदावाराने कोणती कामं केली आहेत किंवा नाही याची पडताळणी करूनच मत देणार आहे. – राहुल मोरे
ही माझी पहिली वेळ असली तरीही मी योग्य उमेदावारालाच मत देईन. कारण महाराष्ट्राची सध्य स्थिती खूपच गंभीर आहे. प्रत्येक जण केवळ स्वार्थ बघतोय. जो उमेदवार सामान्य जनतेच्या भल्याचा, त्यांच्या विकासाचा विचार करतो अशाच उमेदावाराला मी माझं मत देईन. कारण, आपण अयोग्य उमेदवाराला निवडलं तर ते आपल्यालाच त्रासदायक ठरेल. – ऋषिकेश मोहिते.
योग्य पक्षाला मत देण्याचा कटाक्ष
मी पहिल्यांदा मतदान केलं तेव्हा मला त्यातल काही फारसं माहीत नव्हतं. मतदान कार्ड हे एक ओळखपत्र असल्यामुळे मतदान कार्ड काढ, असं आईवडिलांनी सांगितलं. कारण, सरकारी कामातच नव्हे तर कुठेही मतदानाचं ओळखपत्रच ग्राधरलं जातं. या कारणा निमित्त मी पहिल्यांदा मत दिलं होतं. खरं तर गंमत म्हणूनच केलं. असं असलं तरी जेव्हा मला मतदानाचा खरा अर्थ कळला तेव्हापासून आपलं मत योग्य पक्षाला देण्याकडे माझा कटाक्ष असतो. त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करते. यासाठी त्यांनी आजवर काय केलं आहे यावर लक्ष असतं. प्रसार माध्यमांमुळेदेखील पुष्कळ माहिती मिळते त्या माहितीच्या आधारे मी मत देते. – पुनम भद्रेसा
स्वतंत्र्य असल्याची जाणीव देणारं शस्त्र!
आज मी ख-या अर्थाने भारताचा नागरीक होईन. कारण, मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. मतदान हा पहिला टप्पा आहे जो तुम्हाला राष्ट्राचा सक्षम नागरिक बनवतो. मतदान हा आपला हक्क आणि जबाबदारी आहे. माझ्या मते मतदान हे एकमेव असं शस्त्र आहे जे आपण स्वातंत्र्य आहोत याची जाणीव करून देतो आणि सक्षम सरकार निवडू शकतो. माझ्या मतामुळे लोकशाही बळकट होईल हे नक्की. आपली लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने न चुकता मतदान करावं.- संदीप बेलवडकर