सहाव्या हंगामातील स्पॉटफिक्सिंग प्रकरणाच्या सुनावणीनंतर इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) अडचणीत सापडली आहे. आठव्या हंगामासाठी बीसीसीआयने तयारी सुरू केली असली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तसेच त्यांनी बीसीसीआयवर ओढलेल्या ताशे-यांनंतर स्पर्धेच्या भवितव्याबाबत शंका वाटू लागली आहे.
आयपीएलच्या सात हंगामांमध्ये अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या तरी दोन वर्षापूर्वीच्या स्पॉटफिक्सिंग प्रकरणामुळे लीग अडचणीत येणार, हे नक्की होते. तसेच झाले आहे. गुरुवारच्या सुनावणीनंतर बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे बीसीसीआयमधील तसेच दोन वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघाचे आयपीएलमधील अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
श्रीनिवासन यांना दुहेरी फटका बसला आहे. ‘तेलही गेले आणि तूपही गेले’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यांच्या स्वार्थाचा फटका चेन्नई संघाला बसला. कारण श्रीनि चेन्नईचे मालक आहेत. तसेच त्यांचा जावई गुरुनाथ मय्यपन संघप्रमुख आहे. मय्यपनवरील बेटिंगचे आरोप खरे ठरले. तुम्हाला माहीतच असेल की, चेन्नई संघ हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. सात हंगामांमध्ये सलग दोन जेतेपद मिळवणारा तो एकमेव संघ आहे. तीन वेळा चेन्नईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सातपैकी पाच वेळा अंतिम फेरी गाठण्याची करामत केवळ त्यांनाच साधता आली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या बहारदार नेतृत्वाची झलक आयपीएलमध्ये चेन्नईच्या मोठय़ा यशाच्या रूपाने पाहता आली. मात्र फिक्सिंग आणि बेटिंगच्या आरोपांमुळे बंदी आल्याने चेन्नईचे यश मातीमोल ठरले आहे. धोनी आणि सहका-यांनी सहका-यांनी स्वत:च्या बळावर नव्हे तर फिक्सिंग आणि बेटिंगच्या बळावर वर्चस्व राखले, हे सिद्ध झालेय. राजस्थान रॉयल्स हा आयपीएलचा पहिला विजेता आहे. मात्र त्यानंतरच्या सहा हंगामात त्यांची कामगिरी खालावली. सांघिक कामगिरी खालावली तरी राजस्थानचा सहमालक राज कुंद्राने बेटिंग करताना करोडो रुपयांची संपत्ती गोळा केली. मात्र त्याचे बिंगही फुटले आहे.
श्रीनिवासनसह मय्यपन आणि कुंद्राबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. या त्रिकुटाचा निकाल लागला तरी स्पॉटफिक्सिंगमध्ये सहभागी असलेल्या क्रिकेटपटूंची सुनावणी अद्याप शिल्लक आहे. यातील काहींना बीसीसीआय नियुक्त समितीने दोषी ठरवताना शिक्षा सुनावली असली तरी न्यायालयाच्या पुढील निकालाकडे सर्वाची नजर लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आयपीएलची पुढील (आठव्या) आवृत्तीबाबत साशंकता निर्माण झाली असली बीसीसीआय ब-यापैकी ‘अॅडव्हान्स’ आहे, याची प्रचिती आली. प्रकरण न्यायप्रविष्ट असूनही बीसीसीआयने आठव्या हंगामासाठीचा कालावधी आधीच नक्की केला आहे. ८ एप्रिल ते २४ मे २०१५ दरम्यान आयपीएल होईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. यापुढे जाऊन सहभागी संघांवरही शिक्कामोर्तब केले आहे. मात्र सुनावणीमुळे आयपीएलसह बीसीसीआयच्या अडचणींमध्ये खूप भर पडली आहे.
फिक्सिंगप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर बंदी घालण्याची शक्यता असल्याने या दोन संघाविना आठवा हंगाम खेळावा लागेल. आता उर्वरित सहा संघांत स्पर्धा खेळवावी की चेन्नई आणि राजस्थानच्या बदल्यात नव्या संघांचा समावेश करावा, याचाही निकाल त्यांना लवकर घ्यावा लागेल. मात्र आधी सांगितल्याप्रमाणे बीसीसीआय सराईत आहे. म्हणजे यापूर्वीही अनेक वाद निर्माण झाले. अडचणी आल्या त्यावर मात करताना स्पर्धेत खंड पाडला नाही. अर्थात त्यासाठी बीसीसीआय पदाधिका-यांच्या कौशल्याची प्रशंसा करणे, योग्य नाही. पैशाच्या बळावर कुणालाही ‘मॅनेज’ करता येते, हे त्यांना ठाऊक आहे. फ्रँचायझी कराराचा भंग केल्याप्रकरणी डेक्कन चार्जर्स, हैदराबाद सनरायझर्स, पुणे वॉरियर्स, कोची टस्कर केरळ या संघांना गेल्या चारपैकी काही मोसमांत खेळता आले नाही. मात्र काही ना काही तडजोड करत बीसीसीआयने आयपीएल पार पाडली. त्यामुळे चेन्नई आणि राजस्थानच्या बदल्यात नवे संघ घेण्यासाठी त्यांनी आधीच तयारी केली असावी, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
संघांवर बंदी घालण्याची शक्यता असतानाच चेन्नई आणि राजस्थान संघांतील करारबद्ध क्रिकेटपटूंचे काय? या क्रिकेटपटूंना आता कोण वाली असेल? नव्या संघांना सामावून न घेतल्यास दोन्ही संघांतील अनेक क्रिकेटपटू बेकार होतील. त्यात अनेक देशींसह परदेशी क्रिकेटपटूंचा समावेश असेल. यावरही बीसीसीआयच्या पदाधिका-यांकडे उपाय असावा. यापूर्वीप्रमाणे अनेक अडचणींवर मात करत बीसीसीआय आयपीएल भरवेल आणि यशस्वी करून दाखवेलही. मात्र विश्वासार्हतेचे काय? आयपीएलमध्ये सामने ‘फिक्स’ केले जातात. बेटिंग लावून निकाल बदलला जातो, हे सर्व जगाला कळलेय. क्रिकेटचाहत्यांची विश्वासार्हता पुन्हा मिळवण्यासाठी बीसीसीआय काय करणार, हे महत्त्वाचे आहे. यापुढच्या हंगामात बीसीसीआयला त्यांच्या कारभारात तसेच क्रिकेट सामन्यांत प्रचंड पारदर्शकता आणावी लागणार आहे. स्पॉटफिक्सिंगच्या सुनावणीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडूनही (आयसीसी) बीसीसीआयला काही सूचना अपेक्षित आहेत. आयसीसीची अधिकृत मान्यता नसली तरी गेल्या आठ वर्षात आयपीएलसाठी कालावधी देताना आयसीसीने हात आखडता घेतलेला नाही. मात्र क्रिकेटसाठी घातक बेटिंग आणि फिक्सिंग घडत असल्याने आयसीसीला कडक पावले उचलावी लागतील. अर्थात आयसीसीचे चेअरमन श्रीनिवासन असल्याने तशी शक्यता कमी वाटते. बेटिंग आणि फिक्सिंगचे लोण आपल्या क्रिकेटपटूंपर्यंत पोहोचू नये, म्हणून सर्व क्रिकेट बोर्ड विशेष काळजी घेतील, हे नक्की.
झटपट आणि आकर्षक क्रिकेट म्हणून भारतीय चाहत्यांनी आयपीएलवर भरभरून प्रेम केले. मात्र त्यांच्या विश्वासार्हतेला धक्का बसला आहे. आयपीएलमधील फिक्सिंगनंतरआंतरराष्ट्रीय क्रिकेटवरील लोकांचा विश्वास कायमचा उडू नये, इतकी अपेक्षा.