आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पंचांच्या एलिट पॅनलमध्ये भारतीय पंच सुंदरम रवी यांचा समावेश झाला आहे.
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पंचांच्या एलिट पॅनलमध्ये भारतीय पंच सुंदरम रवी यांचा समावेश झाला आहे. आयसीसीच्या पंचांच्या एलिट पॅनलमध्ये स्थान मिळवणारे सुंदरम रवी दुसरे भारतीय पंच ठरले आहेत.
रवी यांच्यापूर्वी एस.वेंकटराघवन हे एकमेव भारतीय पंच आयसीसीच्या पंचांच्या एलिट पॅनलमध्ये होते. रवी यांच्या समावेशाने भारताची प्रतिक्षा अकरा वर्षानंतर संपुष्टात आली आहे.
सुंदरम रवी यांनी एलिट पॅनलमधील समावेशाचे श्रेय ऑस्ट्रेलियाच्या सायमन टॉफेल यांना दिले आहे. मागच्या तीन वर्षात सायमन टॉफेल यांच्याकडून मी ब-याच गोष्टी शिकलो. मैदानावर जाण्यापूर्वीची तयारी, मोठया खेळाडूंना, सामना आणि व्यक्तींना कसे हाताळायचे तसेच अचूक निर्णय कसे घ्यायचे हे मी त्यांच्याकडून शिकलो. मी सायमन टॉफेल यांचा आभारी आहे त्याच्यामुळे मी हे यश मिळवू शकलो असे रवी यांनी सांगितले.
मागच्या पाच-सहावर्षात भारतीय पंचांचा जो दर्जा सुधारला आहे ते आयपीएलमुळे शक्य झाले आहे. आयपीएलमुळे भारतीय पंचांना आंतरराष्ट्रीय पंचांसोबत काम करण्याची संधी मिळते. आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षकांशी संवाद होतो. त्यामुळे भारतीय पंचांचा दर्जा सुधारला असून, नजीक भविष्यात आणखी एक ते दोन भारतीय पंचांचा आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये समावेश होईल असा विश्वास रवी यांनी व्यक्त केला.