देशातील कोटयावधी कर्जदार ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो निर्णय रिझर्व्ह बॅँकेने गुरुवारी मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर घेतला.
मुंबई – देशातील कोटयावधी कर्जदार ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो निर्णय रिझर्व्ह बॅँकेने गुरुवारी मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर घेतला. रिझर्व्ह बॅँकेने अचानक रेपो रेटमध्ये पाव टक्के कपात करून कोटय़वधी कर्जदारांना ‘ईएमआय’ कपातीचा तिळगूळ दिला आहे. आता गृहकर्ज व वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार आहे.
महागाईचा जोर कमी होत असतानाही गेले दीड वर्षे रिझर्व्ह बॅँकेने रेपो रेटमध्ये कपात केली नव्हती. त्यामुळे केंद्र सरकार व उद्योग जगताकडून रिझव्र्ह बॅँकेवर रेपो रेट कमी करण्याचा दबाव वाढत होता. त्यातच बुधवारी जाहीर झालेल्या घाऊक महागाईचा निर्देशांक ०.११ टक्के झाल्याने व्याजदर कपातीचा धोशा अधिक तीव्र झाला होता. सर्वाचे लक्ष येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणा-या पतधोरणाकडे लागले होते.
मात्र, गुरुवारी सकाळी रेपो रेट ८ टक्क्यावरून ७.७५ टक्के केला असून त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येईल. व्याजदर कपात हे सकारात्मक पाऊल आहे. जानेवारी २०१६पर्यंत महागाईचा दर ६ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, असे रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले.
रिझर्व्ह बॅँकेने यापूर्वी मे २०१३मध्ये रेपो रेट ७.५वरून ७.२५ केला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष रेपो रेटमध्ये बॅँकेने कोणताही बदल केला नाही. रिझर्व्ह बॅँकेच्या या निर्णयामुळे गृह, वाहन व अन्य कर्जाच्या हप्तांमध्ये कपात होणार आहे. त्यामुळे घराघरातील बचत वाढण्यास मोठी मदत मिळणार आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
सेन्सेक्सने घेतली झेप
रिझर्व्ह बॅँकेच्या निर्णयानंतर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ८४७ अंशांनी तर एनएसईचा निफ्टीने १९४ अंशांनी झेप घेतली. या निर्णयामुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पसरले होते.