महागाई केंद्रित पतधोरण राबवले जात असतानाच आरबीआयने व्याजदर कमी केले तरी बँकांकडून त्याचे अनुकरण करण्याची शक्यता कमी असल्याचे सांगत गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी अविश्वास व्यक्त केला आहे.
मुंबई- महागाई वाढत असल्याने रिझव्र्ह बँकेकडून कडक पतधोरण राबवले जात आहे. महागाई केंद्रित पतधोरण राबवले जात असतानाच आरबीआयने व्याजदर कमी केले तरी बँकांकडून त्याचे अनुकरण करण्याची शक्यता कमी असल्याचे सांगत गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी अविश्वास व्यक्त केला आहे.
आर्थिक समावेशकतेसाठी आरबीआयकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र याच वेळी बँककडून महागाई कमी करण्यावरही भर दिला जात आहे. महागाई हा विकासातील मोठा अडथळा असल्याचे राजन यांनी सांगितले. बचत, चलन विनिमय आणि व्याजदर कपातीमध्ये महागाई परिणामकारक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. महागाई कमी करण्यासाठी सर्वानी एकत्रित काम करणे आवश्यक असल्याचे राजन यांनी सांगितले.
ज्या वेळी महागाई कमी होईल त्या वेळी आरबीआयकडून निश्चितच व्याजदर कमी केले जातील. मात्र याच वेळी बँकांकडून अशा प्रकारचा निर्णय घेतला जात नाही, असे ते म्हणाले. यामुळे सर्वसामान्यांना फायदा होत नाही. मग पुन्हा महागाई वाढू लागल्याने पतधोरणावरील दबाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.