हैदराबाद विद्यापीठात दलित विद्यार्थी रोहित वेमुलाची आत्महत्या व जेएनयू विद्यापीठातील केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात देशभरातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी रणशिंग फुंकले.
नवी दिल्ली – हैदराबाद विद्यापीठात दलित विद्यार्थी रोहित वेमुलाची आत्महत्या व जेएनयू विद्यापीठातील केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात देशभरातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी रणशिंग फुंकले. स्वयंत्स्फूर्तीने रस्त्यावर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी सरकारच्या दमनशाहीचा निषेध केला. कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विद्यार्थ्यांच्या मोर्चात मार्गदर्शन करून मोदी सरकारला फटकारले. तर बिहारमध्ये नव्हे, तर दिल्लीत ‘जंगल’राज असल्याची सणसणीत टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटण्यात केली.
मोदी सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात संताप वाढत असतानाच देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. देशभरातील विद्यार्थ्यांनी या संतापाला वाट करून देण्यासाठी दिल्लीत भव्य मोर्चा काढला होता. मध्य दिल्लीतील आंबेडकर भवन येथून सुरू झालेला मोर्चा जंतर-मंतपर्यंत गेला. तेथे मोर्चाचे रूपांतर भव्य सभेत झाले. या मोच्र्यात हैदराबाद, उस्मानिया विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, जामिया मिलिया विद्यापीठ, आंबेडकर विद्यापीठातील विद्यार्थी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. ‘वेमुला’च्या हत्येला केंद्र सरकार जबाबदार, अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. वेमुलाची आई राधिका व भाऊ राजा हेही मोच्र्यात सहभागी झाले होते. कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोर्चाला मार्गदर्शन करून केंद्र सरकारला धारेवर धरले.
मोदी सरकारवर टीका करताना कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, देशातील महाविद्यालय व विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा
प्रयत्न मोदी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे. विद्यार्थ्यांची दमनशाहीतून मुक्तता करण्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे. हा कायदा करण्यासाठी कॉँग्रेस विद्यार्थ्यांसाठी लढा देईल, असे आश्वासन त्यांनी दिले. केंद्र सरकार तरुणांचाच नव्हे तर आदिवासी, दलित व समाजातील कमकुवत घटकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारने देशातील विद्यार्थ्यांच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या वाटेला जाऊ नये, अन्यथा ते तुम्हालाच धडा शिकवतील. ते तुमचे सरकार हलवून सोडतील आणि तुम्हाला ते कळणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
दिल्लीत जंगलराज
जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याला पोलिसांच्या समोर ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली, त्यावरून दिल्लीत ‘जंगलराज’ असल्याची टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली.
ते म्हणाले की, पोलिसांच्या समोर कन्हैयाला असभ्य भाषेत शिव्या देऊन वकील मारहाण करत होते. त्यामुळे दिल्लीत कायद्याचे राज्यच नाही. दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात. त्यामुळे दिल्लीत जे घडले तो सर्व प्रकार म्हणजे जंगलराज आहे. बिहारमध्ये छोटय़ा-छोटय़ा घटना भाजपा मोठय़ा करत असते. मात्र, न्यायालयाबाहेर कन्हैयाला कसे फटकवण्यात आले हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. आपण देशविरोधी घोषणांचे समर्थन करणार नाही, मात्र कन्हैयाच्या विरोधात अद्यापि एकही पुरावा दिलेला नाही. देशात संघ व भाजपाला ‘फॅसिझम’ आणायचा आहे. देशातील सर्व निरपेक्ष एकत्र व्हावेत, असे आवाहन त्यांनी केले.
कन्हैया कुमारच्या जामिनाला विरोध
दिल्ली उच्च न्यायालयात जेएनयू विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमार याच्या जामिनाला दिल्ली पोलिसांनी मंगळवारी विरोध केला. दरम्यान, या प्रकरणाचा स्थितीदर्शक अहवाल बुधवारी सादर करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी गेल्या आठवडय़ात कन्हैया कुमारच्या जामिनाला विरोध करणार नाही, असे सांगितले होते. मात्र परिस्थिती बदलल्याचे सांगून त्यांनी मंगळवारी घूमजाव करून जामिनाला विरोध केला.