सासणे आश्रमशाळेतील अनागोंदी व अधीक्षकांचा मनमानी कारभार उघड झाला असतानाही प्रकल्प कार्यालयाने या शाळेच्या अधीक्षकावर कारवाई केलेली नाही.
मुरबाड- तालुक्यातील आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजवण्यास सर्वत: आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारीच जबाबदार असून, हे अधिकारी आदिवासी मुलांचा विकास करण्याऐवजी आश्रमशाळांतील मुख्याध्यापक, अधीक्षकांमार्फत तसेच ‘ठक्करबाप्पा योजने’तील कामांतून मलिदा खाण्यातच व्यस्त असतात. सासणे आश्रमशाळेतील अनागोंदी व अधीक्षकांचा मनमानी कारभार उघड झाला असतानाही प्रकल्प कार्यालयाने या शाळेच्या अधीक्षकावर कारवाई केलेली नाही.
मुरबाड तालुक्यातील ३० टक्के आदिवासींच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी सरकारी व खासगी आश्रमशाळांतून कोटय़वधी रुपये खर्च करत आहेत, परंतु सरकार देत असलेल्या सुविधांवर आश्रमशाळांतील मुख्याध्यापक व अधीक्षक संक्रांत आणत असल्याने मुलांच्या पदरात अपु-या सोयीसुविधा पडत आहेत. मुलांना दिल्या जाणा-या मटण, अंडी, सफरचंद, केळी, भाजीपाला यांच्या वजनात व दर्जात कपात केली जाते. मुलांना पुरवल्या जाणा-या गणवेश, शैक्षणिक साहित्यही कंत्राटदारांशी संगनमत करून निकृष्ट दर्जाचे पुरवले जाते. या सर्व बाबींतून शाळांच्या मुख्याध्यापक व अधीक्षकांकरवी दरवर्षी मार्चअखेरीस प्रकल्प अधिका-यांना विशिष्ट टक्केवारीने रक्कम दिली जाते. तालुक्यातील सर्वच सरकारी आश्रमशाळांतून प्रचंड अनागोंदी सुरू असतानाही प्रकल्प अधिकारी शाळांना भेट देत नाहीत किंवा आदिवासी मुलांच्या समस्या जाणून घेत नाहीत. कोणी कितीही तक्रारी केल्या तरी आमचे काही बिघडणार नाही, असे मुख्याध्यापक व अधीक्षक खासगीत बोलत असतात. सासणे आश्रमशाळेतच नाही तर तालुक्यातील कोणत्याच आश्रमशाळांत शिक्षक निवासी राहत नसल्याची खंत खुद्द सहा अप्पर आयुक्त किरण माळी यांनी व्यक्त केली.
सासणे आश्रमशाळेच्या दुरवस्थेविषयी वारंवार तक्रारी प्रकल्प कार्यालयाकडे जात असतानाही मुलांच्या भौतिक सुविधा तसेच शौचालय व स्नानगृहांत सुधारणा झालेली नाही. अजूनही मुलांना अंघोळीसाठी बंधा-यावर जावे लागते. तर शौचाला रानात जावे लागत आहे. याबाबत वृत्त प्रसारित झाल्यानंतर प्रकल्प कार्यालय शहापूरच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण)पवार व विस्तार अधिका-यांनी सासणे आश्रमशाळेत येऊन विद्यार्थ्यांवर दबाव टाकला. शाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षकांना क्लीन चिट दिली. कारवाई करण्यासाठी आलेल्या अधिका-यांचीही मुस्कटदाबी करण्यात आली आहे.
याच शाळेतील बदली झालेले मुख्याध्यापक शिवाजीराव देशमुख व अधीक्षक के. जी. वारे यांनी शालेय साहित्य व पोषण आहार साहित्य खरेदीत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याने संबंधित माहिती न देण्याबाबत मुख्याध्यापकांवर दबाव टाकला जात आहे. एकंदरीत या आश्रमशाळांतील कारभार ‘सब मिल बांटकर खायेंगे’ असाच सुरू आहे.