दोन भारतीय मच्छिमारांना ठार मारल्याप्रकरणी भारतात अटकेत असलेल्या इटालियन नौसैनिकाला चार महिन्यांसाठी मायदेशी जाण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिली.
नवी दिल्ली- दोन भारतीय मच्छिमारांना ठार मारल्याप्रकरणी भारतात अटकेत असलेल्या इटालियन नौसैनिकाला चार महिन्यांसाठी मायदेशी जाण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिली.
इटालियन नौसैनिक मॅस्सिमिलियानो लाट्टोरे याने चार महिने पूर्ण होताच भारतात परतण्याची शपथपत्राद्वारे लेखी हमी द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरचिटणीस आर. एम. लोढा यांनी निर्देश दिले आहेत. यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी पक्षाघाताचा धक्का बसलेल्या लाट्टोरे याला आठ सप्टेंबर रोजी न्यायालयाने चाणक्यपुरी पोलिस ठाण्यात हजर रहाण्यासाठी दोन आठवड्यांची सूट दिली होती.
न्यायालयाने इटलीच्या राजदूतांकडूनही लाट्टोरे याला चार महिन्यांनी भारताच्या ताब्यात देण्यासाठी लेखी हमीपत्र मागितले आहे.
इटलीच्या एर्निका लेक्झी नावाच्या जहाजाच्या रक्षणासाठी तैनात असेलेल्या मॅस्सिमिलियानो लाट्टोरे आणि साल्वाटोर गिरोन या दोन नौ सैनिकांनी १५ फेब्रुवारी २०११ रोजी केरळच्या समुद्रकिना-याजवळ केलेल्या गोळीबारात दोन भारतीय मच्छिमारांचा मृत्यू झाला होता. आपल्या जहाजाजवळ आलेले हे मच्छिमार सागरी चाचे असल्याचा गैरसमज झाल्यामुळे आपण गोळीबार केला, असा बचाव या नौसैनिकांनी केला. मात्र या दोन्ही नौसैनिकांना अटक करून केरळच्या तुरुंगात डांबून त्यांच्यावर भारतीय कायद्यानुसार सदोष मनुष्यवधाचा खटला चालवला जात आहे.
फेब्रुवारी २०१२ पासून ते भारताच्या ताब्यात आहेत. या दोन्ही आरोपींना यापूर्वी डिसेंबर २०१२ मध्ये नाताळच्या सणासाठी मायदेशी जाण्याची परवानगी केरळ न्यायालयाने सहा कोटी रुपयांच्या हमीपत्राद्वारे देण्यात आली होती. त्यानुसार ते नाताळसाठी घरी जाऊन भारतात परतलेही.
त्यानंतर पुन्हा इटलीत झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करण्यासाठी जाण्याची परवानगी या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात अर्जाद्वारे मागितली होती. न्यायालयाने चार आठवड्यांत भारतात परतण्याच्या अटीवर २२ फेब्रुवारी २०१३ ला त्यांना इटलीत जाण्याची परवानगी दिली होती. मात्र चार आठवडे उलटल्यानंतर त्यांनी आणि इटली सरकारने हे नौसैनिक भारतात परतणार नाहीत, असे जाहीर केले होते. त्यावेळी भारताने इटलीवर प्रचंड दबाव आणला. हे प्रकरण चांगलेच चिघळल्याने नरमाईची भूमिका घेत इटलीने या दोन नौसैनिकांना भारतात पाठवले होते.