इस्लाम धर्म हा परमेश्वरी आज्ञांच्या पालनाला आणि शिस्तीला अतिशय महत्त्व देणारा धर्म आहे. आज जो सण आहे तो म्हणजे रमझानच्या पवित्र महिन्याच्या समाप्तीला साजरा होणारा ‘ईद उल फित्र’! या महिन्याचेही मुस्लीम धर्मात विशेष असे स्थान आहे.
याच महिन्यात परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी ‘कुराण’ भूतलावर पाठवले होते, अशी श्रद्धा आहे. परमेश्वराचे दूत जिब्राईल यांनी पैगंबर महंमद यांना याच महिन्यात परमेश्वराची वचने सांगण्यास सुरुवात केली. तेच पवित्र कुराण. त्यामुळे रमझानचा महिना विशेष पवित्र मानला जातो.
उपासनेचा काळ
सर्व जगातले मुस्लीम बांधव आणि भगिनी या महिन्यात परमेश्वराची मनोभावे उपासना करतात. हा महिना उपवासाचा म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. या काळात प्रत्येक सच्च्या मुसलमानाला अनेक आध्यात्मिक गोष्टी करायच्या असतात. हा धर्म अत्यंत तार्किक आणि नियमबद्ध धर्म असल्याने ७ वर्षाखालील मुलांना यातील काहीही करणे बंधनकारक नाही. अजाण मुलांना ईश्वराने पूर्ण सूट दिलेली आहे. मात्र ७ वर्षापुढील व्यक्तीला निश्चित अशी आचारसंहिता इस्लाममध्ये सांगितली आहे.
रमझानच्या महिन्यात ‘रोझे’ म्हटलेले अत्यंत कडक उपवास सर्व मुस्लिमांना बंधनकारक आहेत. पहाटे विशिष्ट वेळेत थोडी न्याहारी करून उपवास सुरू होतो आणि महिनाभर चालणारा हा उपवास इतका कडक असतो की, स्वत:ची थुंकीही भाविकाने दिवसभर गिळायची नसते. सूर्यास्तानंतर उपवास सोडायचा असतो. जर उपवासाच्या काळात भाविकाच्या मनात कोणत्याही वासनेचा नुसता विचार जरी आला तरी उपवास मोडला, असे मानले जाते आणि त्याचे प्रायश्चित केले जाते. सायंकाळी हा उपवास सर्व कुटुंबीय आणि आप्तस्वकियांसमवेत सोडला जातो. हे रमझानचे केवळ अगदी मोघम वर्णन झाले.
आध्यात्मिक साधना
रमझान हा केवळ शारीरिक शुद्धीचा महिना नाही. या काळात ‘काया, वाचा, मना’ने माणसाने शुद्ध होणे अपेक्षित आहे. म्हणजे एकही वाईट शब्द उच्चारायचा नाही, शरीराने काहीही पाप करायचे नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रमझानच्या महिन्यात मुस्लीम व्यक्तीने मनात एकही वैषयिक किंवा पापाचा विचारसुद्धा आणायचा नाही. राग, मोह, काम, क्रोध यावर विजय मिळवण्याचे ते व्रत आहे. रमझानमधील रोझ्यांच्या काळात जकातीचेही खूप महत्त्व आहे. ‘जकात’ म्हणजे आपल्या प्रामाणिक कष्टाने मिळवलेल्या उत्पन्नातून स्वत:हून गोरगरिबांसाठी केलेला दानधर्म. रमझानच्या महिन्यात मानवजातीला पवित्र कुराण प्राप्त झाल्याने त्या महिन्यात केलेल्या सर्व सत्कृत्यांना देव वर्षाच्या इतर दिवसांच्या किमान १० पट अधिक फळ देतो, अशी श्रद्धा आहे.
कुराण पठण केवळ कर्मकांड नाही
या काळात भाविक मुस्लीम लोक एका महिन्यात पूर्ण कुराणाचे वाचन पूर्ण करतात. कुराण वाचनाबद्दलही इस्लामची जी शिकवण आहे, ती त्याचे अत्यंत विचारी आणि काटेकोर स्वरूप स्पष्ट करते. कुराण हा केवळ एक ‘धार्मिक ग्रंथ’ म्हणून पठण केल्यासारखे तोंडातल्या तोंडात, घाईघाईने वाचायची ‘पोथी’ नाही. तो ईश्वराचा मानवाशी त्याने स्वत:हून साधलेला संवाद आहे. त्यामुळे तो अतिशय पवित्र वातावरणात ‘शुचिर्भूत होऊन’, ‘एकचित्त होऊन’ वाचायचा मार्गदर्शक ग्रंथ आहे. तो ‘सावकाश वाचावा आणि मनातल्या मनात वाचू नये’ तर ‘मोठय़ाने वाचावा’ अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. त्यातील प्रत्येक ईश्वरी विधानाचा ‘अर्थ समजावून घेतच’ त्याचे वाचन करायचे आहे, अशा स्पष्ट सूचना आहेत. तो केवळ ‘आवर्तन’ पूर्ण करण्याचा एखाद्या अंधश्रद्धा कर्मकांडाचा भाग नाही. या गोष्टी लक्षात घेतल्या तर मुस्लीम समाज आपल्या धर्माचे काटेकोर पालन करताना का दिसून येतो, त्याचे रहस्य उलगडते. माणसाचा अंगीभूत आळशीपणा, काम संपवण्याची वृत्ती, टंगळमंगळ करण्याचा स्वभाव हे आधीच लक्षात घेऊन कुराणाच्या पठणाबद्दलचे वरील दंडक ठरवण्यात आल्याचे दिसून येते. हा ग्रंथ उच्च जागी ठेवावा. त्याला शुचिर्भूत नसताना स्पर्शही करू नये, कारण तो देवाने मानवाशी केलेला संवाद आहे, असे मुसलमान भाविक मानतात.
रमझान आणि ‘ईद उल फित्र’चे तीन प्रमुख लाभ या काळाचे प्रमुख तीन लाभ मानले जातात.
१) परमेश्वराने जे सुख, समाधान, वैभव आपल्याला दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार मानण्याची आणि त्याचे नेहमीपेक्षा अधिक वेळा, अधिक उत्कटतेने आणि दररोज स्मरण करण्याची ही संधी आहे.
२)आत्मचिंतन करून स्वत:चे वस्तुनिष्ठ, आध्यात्मिक मूल्यमापन करण्याची वेळ. रमझानच्या कडकडीत उपवासाच्या काळात त्या शारीरिक आणि मानसिक तणावामुळे आपोआप आत्मपरीक्षण करून, आपण कुठे दुर्बल आहोत, आपण कोणत्या पापाच्या, वासनांच्या आहारी जात आहोत, हे लक्षात येते तसेच आपल्याला अल्लाहने काय चांगले दिले आहे, ते आपण कसे वाढवू शकतो, कुठे आपल्याला सुधारण्याची गरज आहे? ते या काळात सहज कळू शकते. उपवासात शरीराला फारसे काम नसल्याने आपले मन बाहेरच्या जगाऐवजी आत वळते, आपले चैतन्य स्वत:कडे अधिक बारकाईने पाहू लागते. मनाच्या खोल तळाशी दडलेल्या वाईट आणि चांगल्या प्रवृत्ती मनाच्या पृष्ठभागावर तरंगू लागतात. त्यांना पाहणे सोपे जाते आणि आपणच आपल्याला अधिक समजून घेऊ शकतो, हा या महिन्याचा अतिशय वेगळा आणि मोठा लाभ आहे.
३) या दानधर्माच्या काळात श्रीमंत लोक आपल्या गरीब बांधवांच्या अधिक जवळ येतात. कारण रमझानमध्ये आणि ‘ईद उल फित्र’ला आपल्या नोकर-चाकरांसह सर्व कुटुंबांचा विचार करून त्या प्रमाणात अन्नदान करणे, प्रत्येक मुस्लीम भाविकाला बंधनकारक असते. रमझान आणि ईद उल फित्र माणसाला घेण्यापेक्षा देण्यातील आनंद काय असतो त्याचा परिचय करून देते आणि उदारपणाची सवय लावते. या उपासना काळात आपण नीट निरीक्षण केले तर धार्मिक दृष्टिकोन आणि ऐहिक विचार यातला फरक आपल्या सहज लक्षात येतो. कुराण माणसाला आपल्याकडे जे देवाने अधिक दिले आहे ते आपल्यातील ज्या बांधवांकडे कमी आहे त्यांना स्वत:च्या इच्छेने आणि आनंदाने द्यायला शिकवते तर इहवाद आपल्याला पाप-पुण्याचा, नतिकतेचा किंवा अनतिकतेचा विचार न करता इतरांकडे जे आहे ते ओरबाडून घ्यायला शिकवतो. तो आपल्यातील विषयवासना वाढवण्याचा प्रयत्न करतो तर धर्म आपल्याला विकारांवर विजय मिळवायला, संयमाने जगायला, त्याग करायला आणि आध्यात्मिक बनायला शिकवतो. अध्यात्म, मग ते कोणत्याही धर्मातील असो, ते आपल्यातील उद्दात्त मूल्यांचे संवर्धन करते, आपल्याला उच्च पातळीवर नेण्याचा प्रयत्न करते तर इहवाद आपल्यातील पाशवीवृत्तीला उत्तेजन देतो. आपल्यातील लालची, क्रोधी, कामुक, विधिनिषेधशून्य प्रवृत्तीला आवाहन करतो. हा फरक मुस्लीम भाविकाला याच महिन्यात प्रकर्षाने जाणवतो, कारण त्याला कुराण संयम आणि त्यागाचे महत्त्व शिकवत असते. तर इहवाद त्याला वाईट गोष्टींचे समर्थन शिकवत असतो. यातल्या द्वंद्वातून त्याला जावे लागते. त्यामुळे कठोर धर्माचरणाची सांगता आनंदाच्या उत्सवात करणारी ‘ईद’ फार वेगळा सण ठरतो.