मुंबई कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ‘ईपीएफओ’ने ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड’ (ईटीएफ)च्या माध्यमातून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुंतवणूक करत गुरुवारी पहिल्यांदाच शेअर बाजारात ऐतिहासिक पाऊल ठेवले.
मुंबई कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ‘ईपीएफओ’ने ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड’ (ईटीएफ)च्या माध्यमातून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुंतवणूक करत गुरुवारी पहिल्यांदाच शेअर बाजारात ऐतिहासिक पाऊल ठेवले.
या वर्षी शेअर बाजारात ५,००० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाईल. मात्र पुढच्या वर्षी गुंतवणुकीचे प्रमाण अधिक असेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
शेअर बाजारातील या पहिल्यावहिल्या गुंतवणुकीचे साक्षीदार होण्यासाठी केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय हे बडय़ा बाजार सहभागीदारांसह उपस्थित होते.
शेअर बाजारातील पहिली गुंतवणूक एसबीआय म्युच्युअल फंडच्या सेन्सेक्स आणि निफ्टीच्या ईटीएफमधून करण्यात आली. दत्तात्रेय म्हणाले की, ईपीएफओ सुरुवातीला वाढीव निधीपैकी ५ टक्के शेअरमध्ये गुंतवणार आहे. ५ हजार कोटींच्या आसपास ही गुंतवणूक असेल.
पुढच्या वर्षी ही मर्यादा १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येईल. ईटीएफ गुंतवणुकीच्या माध्यमातून ८.७५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा ४.६७ कोटी पीएफधारकांना मिळेल, असेही ते म्हणाले. दत्तात्रेय यांच्याबरोबरच या कार्यक्रमाला सेबीचे पूर्णवेळ सदस्य एस. रमण, एचबीआयचे अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, बीएसईचे प्रमुख आशिषकुमार चौहान आणि केंद्रीय पीएफ आयुक्त के.के. जालान उपस्थित होते.
चौहान म्हणाले की, पेन्शन फंडांच्या माध्यमातून होणारी शेअर बाजारातील गुंतवणूक ही जगभरात स्वीकारली गेली आहे. नागरिकांना यातून चांगला परतावाही मिळत असल्याचे ते म्हणाले. एनएसईच्या प्रमुख चित्रा रामकृष्णन या कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या.
मात्र त्यांनी दिलेल्या लेखी संदेशात यामुळे मोठय़ा प्रमाणावर बचत खुली होऊन त्याचा राष्ट्रउभारणीला हातभार लागेल. इतर आस्थापनाही असाच पुढाकार घेतील, अशी आशा व्यक्त केली. या गुंतवणुकीसाठी एसबीआय ईटीएफ निफ्टी आणि एसबीआय सेन्सेक्स ईटीएफ या दोन इंडेक्स लिंक स्कीमचा यात समावेश करण्यात आला आहे.
‘ओएनजीसी’चा निधीही ईपीएफओकडून नियंत्रित केला जातो. या निधीतूनही बाजारात गुंतवणुकीचा निर्णय होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर बाजारातील या माध्यमातून होणारी गुंतवणूक ७ ते ८ हजार रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एसबीआय म्युच्युअल फंडचे दिनेशकुमार खरा आणि एनएसईच्या अधिका-यांनी ‘ईपीएफओ’च्या गुंतवणुकीचे प्रमाणपत्र श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय यांना सादर केले. या वेळी एसबीआयच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
सध्या ईपीएफओकडे ६.५ लाख कोटींचा निधी आहे. यामध्ये दरवर्षी होणाऱ्या वाढीपैकी ५ टक्के ईटीएफच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवण्यात येणार आहेत. एका वर्षानंतर परिस्थितीचा अभ्यास करून पुढच्या वर्षी ही मर्यादा १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल.
– बंडारू दत्तात्रेय, केंद्रीय श्रममंत्री
‘ईपीएफओ’ होणार दुस-या क्रमांकाचा गुंतवणूकदार
पुढच्या वर्षी वाढीव निधीपैकी १५ टक्के गुंतवणुकीची शक्यता पाहता ‘ईपीएफओ’ बाजारातील दुस-या क्रमांकाची गुंतवणूकदार सरकारी आस्थापना ठरण्याची शक्यता आहे. सध्या विमा क्षेत्रातील दिग्गज सरकारी कंपनी आयुर्विमा महामंडळाकडून (एलआयसी) दरवर्षी जवळपास ५० हजार कोटी रुपये गुंतवले जातात.
गुंतवणुकीची पद्धत अशी असेल
ईपीएफओकडून बाजारात होणा-या गुंतवणुकीपैकी ७५ टक्के गुंतवणूक एनएसई ईटीएफमध्ये होईल. तर उर्वरित २५ टक्के गुंतवणूक ही बीएसई ईटीएफमध्ये केली जाणार आहे. याबरोबरच सीपीएसई ईटीएफमध्ये गुंतवणुकीचा सरकारकडून विचार केला जात असल्याची माहिती के. के. जालान यांनी दिली.