विधान परिषदेच्या एक जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेला संघर्ष गुरुवारी संपुष्ठात आला.
मुंबई– विधान परिषदेच्या एक जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेला संघर्ष गुरुवारी संपुष्ठात आला. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी निवड आता बिनविरोध होईल.
शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होणार होती. या जागेसाठी काँग्रेसकडून मोहन जोशी यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनिल तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार मागे घेणार नसल्याचे बुधवारपर्यंत सांगितले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसच्या जोशींनी माघार घेतल्यामुळे तटकरे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पक्षाने दिलेल्या आदेशानुसार अर्ज माघे घेतल्याचे जोशी यांनी सांगितले. यासंदर्भात बुधवारी रात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते.
तटकरेच्या या निवडीमुळे परिषदेतील राष्ट्रवादीचे संख्याबळ २९वर पोहचणार आहे. ७९ सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे २२, भाजपचे ११, शिवसेनेचे सहा, लोकभारती, शेतकरी कामगार पक्ष आणि पीआरपी पक्षाचे प्रत्येकी एक तर सात अपक्ष सदस्य आहेत.