सध्या एकांकिका स्पर्धाचा माहोल सुरू आहे. छोटया-मोठया स्पर्धासह काही प्रतिष्ठित झालेल्या आणि प्रसिद्ध पावलेल्या स्पर्धामधून नवे कलावंत, नवे विषय घेऊन रंगभूमीवर व्यक्त होत आहेत. त्यातलीच एक महत्त्वाची स्पर्धा म्हणजे ‘कल्पना एक आविष्कार अनेक’. २७ सप्टेंबरला या स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईतील शिवाजी मंदिरात झाली आणि प्रसिद्ध कथाकार राजन खान यांनी सुचवलेल्या ‘माणसं’ या विषयावर ही स्पर्धा प्रकाशझोत टाकून गेली.
‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही स्पर्धा सुरू होऊन अठ्ठावीस वर्ष उलटलीत. १९८२मध्ये ‘नाटय़दर्पण’ने या अभिनव स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली होती. आगळेवेगळे आणि तेवढेच नेटके आयोजन या स्पर्धेचे बलस्थान होते. आजचे अनेक दिग्गज लेखक, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ या स्पर्धेने दिले. महाराष्ट्रातील रंगचळवळीला वेगळी दिशा दाखवण्याचे काम ‘नाटयदर्पण’ने केले होते. कालांतराने ही स्पर्धा बंद पडली आणि ती नव्या ताकदीने सुरू करण्याची जबाबदारी ‘अस्तित्व’ या संस्थेने आपल्या खांद्यावर घेतली. गेल्या ११ वर्षापासून ‘अस्तित्व’ या स्पर्धेचे आयोजन करते आहे.
साहित्य-कला क्षेत्रातल्या मान्यवरांकडून या स्पर्धेसाठी दरवर्षी एक विषय सुचवला जातो. त्या विषयावर नवी एकांकिका लिहून रंगकर्मी आपली कलाकृती सादर करत असतात. या वर्षी झालेल्या स्पर्धेचा विषय प्रख्यात कथाकार राजन खान यांनी सुचवला होता, ‘माणसं.’ या माणसांभोवती गुंफले गेलेले विषय या स्पर्धेत सादर झाले. त्यातही प्रभावी सादरीकरण मुंबईच्या प्रवेश या संस्थेचे ‘ब्लॅकआउट’ ठरले.
सरडय़ासारखे रंग बदलणा-या कॉर्पोरेट जगतातल्या माणसांचे दर्शन या एकांकिकेतून घडले. सद्य परिस्थितीशी नाते सांगणारी ही एकांकिका भाग्यश्री अशोक पाणे या तरुणीने लिहिली. तिने लिहिलेली ही पहिलीच एकांकिका संदेश जाधवच्या दिग्दर्शनात सर्वोत्कृष्ट पुरस्काराची मानकरी ठरली. पाठीमागे निंदा करणा-या आणि तोंडावर उत्तुंग प्रेम दाखवणा-या मानवी विकृतीला फटके मारणारी आणि या मानसिकतेचे सराईतपणे चिमटे काढणारी ही एकांकिका होती.
कॉर्पोरेटमध्येही जातीयवाद कसा धुमसत असतो, नवख्यांना कसे ओरबाडले जाते, वेगवेगळ्या कारणांसाठी होणारे राजकारण भाग्यश्रीने ताकदीने आपल्या लेखणीतून साकारले आहे. तेवढय़ाच ताकदीने संदेश जाधव यांनी या कलाकृतीला दिग्दर्शकीय साज चढवला. विवेक जाधवचे नेपथ्य, प्रथमेश गावडेचे संगीत आणि श्याम चव्हाणची प्रकाशयोजना या एकांकिकेत महत्त्वाचे योगदान ठरले. दीपाली जाधव, सुहास लाखन, श्वेता गायकवाड, स्वप्नील काळे, भाग्यश्री पाणे आणि दिशा दानडे यांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना कॉर्पोरेट माणसांच्या अंर्तबाहय मनोवस्थेवर प्रभावी भाष्य केले आहे.
मुले शहरात गेल्यामुळे गावाकडच्या वाडय़ात एकाकी पडलेल्या वृद्ध जोडप्यांनी माणसांत रमण्यासाठी ‘वाडा विकणे आहे’ अशी जाहिरात देतात. वाडा विकत घेण्यासाठी येणा-या माणसांत हे दाम्पत्य रमतात, गमतात, खेळतात. हे कथानक असलेल्या ‘खेळ मांडियेला’ या एकांकिकेचे लेखन विशाल कदम यांनी केले आहे. गेल्या वर्षी मराठी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघाच्या वतीने ‘दीर्घाक स्पर्धा’ घेण्यात आली होती.
त्या स्पर्धेत औरंगाबादच्या ‘प्रयास’ संस्थेने दासू वैद्य लिखित ‘रियल इस्टेट’ नावाचा दीर्घाक सादर केला होता. ‘घर विकणे आहे’ अशी जाहिरात देऊन घर बघायला येणाऱ्यांसोबत वेळ घालवणारा घरमालक आणि घर बघायला आलेल्या ग्राहकाची गोष्ट यात सांगितली होती. ‘खेळ मांडियेला’ ही एकांकिका बघताना त्या दीर्घाकाची आठवण होत होती. संवाद, मांडणी, पात्रयोजना वेगवेगळ्या असल्या तरी त्या विषयाशी साधर्म्य सांगणारी ही गोष्ट आहे, हे इथे नमूद केलेच पाहिजे.
‘सकस, मुंबई’ने सादर केलेल्या या एकांकिकेचा प्रयोग चकचकीत होता. निर्दोष सादरीकरण हे या एकांकिकेची जमेची बाजू होती. प्रमुख भूमिका साकारणारे ओमकार भोजना (म्हातारा), शीतल कुलकर्णी (म्हातारी), प्रथमेश शिवलकर (जाधव) यांनी या एकांकिकेत रसिकांना खिळवून ठेवले आणि सुमित जाधवच्या दिग्दर्शनात दमदार सादरीकरण केले.
या दोन एकांकिकांशिवाय कल्याणच्या ‘मितीचार’ची ‘सर्पसत्र’ ही कवी अरुण कोलटकर लिखित आणि ललित प्रभाकर दिग्दर्शित एकांकिका रंगमंचीय आविष्कार म्हणून उत्तम होती. त्यातील कलावंतांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य अधोरेखित केले. पुण्याच्या ‘संक्रमण’ने सादर केलेली ‘उडान’ तृतीयपंथीयांना माणूसपण देण्याची गोष्ट सांगणारी होती. त्यांचा संघर्ष, त्यांच्याविषयी समाजात असणारे समज, गैरसमज असे अनेक धागे यतीन माझिरे यांनी आपल्या लेखन-दिग्दर्शनात विणण्याचा प्रयत्न केला. रविकुमार चव्हाण यांचे संगीत, अनिल कपुरे यांची प्रकाशयोजना, वैभव नवसकर यांचे नेपथ्य या तांत्रिक बाजू भक्कम करीत कलावंतांनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. त्यातील यतीन माझिरे (गौरी), बागेश्री निंबाळकर (जान्हवी), स्वानंद पटवर्धन (श्रीकांत), रोहित सोरटे (रेवती), अजिंक्य भालेराव (गुरू माँ ) यांच्यासह सार्थक ओगले आणि प्रज्ञा सूर्यवंशी या बालकलाकारांचे प्रयत्न अधिक महत्त्वाचे ठरले आहेत.
नागपूरच्या ‘रंगभूमी’ संस्थेने सादर केलेली ‘तिमिरांत’ ही गौरव खोंड लिखित आणि विशाल तराळ दिग्दर्शित एकांकिका लेखक आणि त्याच्या प्रतिभेचे द्वंद्व मांडणारी होती. सादरीकरणातील बटबटीतपणा, नको तेवढा ‘अकांडतांडव’ या एकांकिकेच्या उणिवा ठरल्या असल्या तरी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे. विशाल तराळ आणि अश्विनी गोरले यांनी या एकांकिकेत अनुक्रमे श्रीपाद कुलकर्णी, मनवा/कालिंदी या भूमिका वठवल्या.
पाच एकांकिकांपैकी सादरीकरणात कमी-अधिक प्रमाणात डाव्या-उजव्या ठरल्या असल्या तरी विषयाच्या अनुषंगाने लक्षात राहिली ती ‘ब्लॅकआउट’. थेट विषयावर भाष्य करणारी. सादरीकरणात सरस ठरलेली. आजच्या पिढीशी नाते सांगणारी. या एकांकिकेत एक उत्तुंगपणा दिसला. हेच ‘कल्पना एक आविष्कार अनेक’चे या वर्षीचे यश आहे, असे समजू या! पुढच्या वर्षी ही स्पर्धा सादरीकरण, लेखन, प्रायोगिकतेत भरारी घेईल आणि अंतिम फेरीत एक से बढकर एक कलाकृती बघायला मिळतील, अशी अपेक्षा करू या.