हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली असून, उत्तरेकडच्या राज्यांमध्ये तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे.
नवी दिल्ली – हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली असून, उत्तरेकडच्या राज्यांमध्ये तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. दिल्ली, पंजाब आणि हरयाणामध्ये नागरीक कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. या राज्यांमध्ये सकाळी असणा-या दाट धुक्यांमुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम होत आहे. दाट धुक्यामुळे दिल्लीत विमान सेवेवर परिणाम झाला आहे.
हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात थंडीची लाट आहे तसेच बर्फवृष्टीमुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठवडयाच्या सुरुवातीला सिमलामध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे काही भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. पाणी पुरवठा करणा-या पाईपलाईन्स बर्फ जमा झाल्यामुळे बंद झाल्या आहेत.
प्रशासनाकडून या सेवा सुरु करण्याचे युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कुलू-मनालीमध्ये मोठया प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे. राज्यातील जवळपास २०० रस्ते बर्फवृष्टीमुळे बंद झाले होते. कुलू-मनालीमध्ये अडकून पडलेल्या अनेक पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून मोठया प्रमाणावर पर्यटक कुलू-मनालीला जातात. हिमाचलप्रदेशमध्ये थंडीमुळे आतापर्यंत तीस जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागात तापमान उणे अंश सेल्सिअसमध्ये आहे.
जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीरमध्ये यंदाच्या हिवाळयाच्या मोसमातील गुरुवारची रात्र सर्वात थंड रात्र ठरली आहे. मायनस ४.२ तापमान होते. मागच्या आठवडयाभरापासून काश्मीर खो-यात किमान तापमान मायनस तीन ते मायनस सातमध्ये आहे. पंजाब आणि हरयाणा ही राज्येही थंडी बरोबर दाट धुक्यांच्या चादरीमध्ये लपेटली आहेत. यामुळे येथील रस्ते वाहतूकीवर परिणाम होत आहे.