अनधिकृत दारू विक्रेत्याच्या पाठीशी राहून त्याची बाजू खासदाराने घेणे, हे कोकणचे दुर्दैव
रत्नागिरी – कोकणात विविध सामाजिक प्रश्न असताना, त्याकडे लक्ष देण्यास खासदार विनायक राऊत यांना वेळ नाही. मात्र, अनधिकृत दारू विक्रेत्याची बाजू मांडण्यासाठी खासदारांना वेळ आहे. एका अनधिकृत दारू विक्रेत्याची बाजू घेणे हे खासदाराला शोभत नाही. कोकणच्या दृष्टीने ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल, असे परखड मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी मांडले. प्यायलेल्या दारूची, खाल्लेल्या मिठाची खासदार विनायक राऊत यांनी परतफेड केल्याचा आरोपही निलेश राणे यांनी यावेळी केला.
रत्नागिरी शहरानजीकच्या निवळी ते हातखंबा महामार्गादरम्यान न्यू शांती धाबा येथे अवेळी दारूची विक्री केली जाते, यासंदर्भात अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या. हा धाबा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप यांचा आहे. शासकीय नियमानुसार रात्री ११ वाजेपर्यंत दारूची विक्री करणे हा नियम असताना पहाटे पाच वाजेपर्यंत याठिकाणी दारू विक्री कशी केली जाते, हा प्रश्न आहे. त्याचबरोबर धाब्यावर दारू विक्री करता येते का, असाही प्रश्न आहे. यापूर्वीही धाब्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, आमदार उदय सामंत यांच्यामुळे त्यांना सोडण्यात आल्याचे श्री. राणे म्हणाले.
मुंबई-गोवा महामार्गावरच हा धाबा असल्याने याठिकाणी होणा-या दारू घेतल्यानंतर अपघात घडण्याचे प्रकारही घडत असल्याच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. या धाब्यावर बंद लाईटमध्ये दारूची विक्री ग्राहकांना केली जात असल्याचे आढळून आले आहे. याबाबत शूटिंगही करण्यात आले आहे. त्याठिकाणी कोणालाही काही बोललो नाही. तेथून रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात रितसर तक्रारही करण्यात आली आहे. त्यावेळी ग्रामीणचे पोलीस अधिकारी हेमंतकुमार शहा उपस्थित होते. त्यांच्याशी यासंदर्भात बोलणे झाले. त्यावेळी शहा यांनी लेखी तक्रार द्या कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.त्यानुसार ग्रामीण पोलीस स्थानकात लेखी तक्रार करण्यात आली असल्याचे माजी खासदार राणे यांनी सांगितले.
या प्रकारानंतर खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडण्याचे काम केले. एका अनधिकृत दारू विक्रेत्याची बाजू खासदाराने घेणे, हे कोकणचे दुर्दैवच म्हणावे लागेल. आज कोकणात अनेक सामाजिक प्रश्न आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, नाणार प्रकल्प रद्द करणे. जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प रद्द करणे.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत केंद्रातून निधी आणणे, यासारखे कोकणच्या सामाजिक हिताचे प्रश्न असतानाही अनधिकृत दारू विक्रेत्याची बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यास खासदारांना वेळ आहे. अशी सर्व महत्त्वपूर्ण कामे करण्यात विद्यमान खासदार अपयशी ठरले आहेत. आपल्या पदाधिका-याची बाजू मांडण्यासाठी आमदार, जिल्हाप्रमुखांना एकत्रित आणले जाते. यातून शिवसेना नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. यावरूनच स्वाभिमान पक्षाची तसेच निलेश राणे यांची ताकद दाखवून देण्याचे काम शिवसेना नेतेच करत असल्याचा टोलाही माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी हाणला.
अन्यथा स्वाभिमान स्टाईलने कारवाई करू
निवळी येथील त्या धाब्यावर अवेळी होणा-या दारू विक्री विरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात लेखी तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामीणचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्याशी चर्चा झाली आहे. पोलिसांकडून योग्य पद्धतीने कारवाई झाली पाहिजे. कारवाई न झाल्यास स्वाभिमान स्टाईलने कारवाई केली जाईल, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला.
अख्खी शिवसेना कामाला लावली हीच स्वाभिमानची ताकद
गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीतील अख्खी शिवसेना कामाला लावली आहे. हीच तर स्वाभिमानची ताकद आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.