श्रीकांत बापट हे एक समाजसेवीवृत्तीचे, उदार मनाचे असे सहृदयी उद्योजक आहेत! ठाण्यात राहणा-या व ठाणे जिल्ह्यात आपल्या उद्योग-व्यवसायाला स्थापन करणा-या श्रीकांत बापट यांना त्यांच्या रत्नागिरीतील जन्मगावाची शिखरे साद घालत असतात!
कोकण कर्तृत्ववान माणसांना जन्म देणारा एका विशिष्ट अर्थाने सुपीक असा श्रीमंत भाग आहे! शून्यातून आपल्या आयुष्याचे आणि उद्योगाचे विश्व उभे करणारे ठाण्यातील लॅब इंडिया उद्योगाचे संस्थापक व संचालक श्रीकांत बापट रत्नागिरी जिल्ह्यातील नांदिवडे खेडयातील पौरहित्य करणा-या शंकरराव व गृहिणी असलेल्या पार्वतीबाई यांच्या पोटी
५ नोव्हेंबर १९४४ रोजी जन्माला आले.
जन्मगावीच प्राथमिक शिक्षण घेऊन ते माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणार्थ पुण्यास मामांकडे गेले. ट्रिग्नॉमिटरी हा मामांचा विषय होता. मामा विद्वान होते. त्यांचा मित्रपरिवार नामवंतांचा होता. गं. बा. कानेटकर आणि रँग्लर केरकर हे ट्रिग्नॉमिटरी पुस्तकाचे लेखक, आचार्य प्र. के. अत्रे आणि अत्र्यांचे मित्र देवभक्त, कवी यशवंत, कॉण्टिनेण्टल प्रकाशनचे अनंतराव कुलकर्णी, चित्रशाळेचे रानडे, राम गणेश गडकरींचे मित्र कमतनूरकर इत्यादी मंडळी मामांच्या मित्रपरिवारात होते. ब्रीज खेळण्यास रोज नियमितपणे येणारे त्यांतील काही जण होते. त्यांच्या गप्पा श्रीकांत ऐकत.
मामांकडील चार वर्षाच्या वास्तव्यात पुण्यातील एस.पी. कॉलेजचे प्राचार्यही मामांकडे नियमितपणे आलेले त्यांनी पाहिले. या थोर मंडळींच्या बोलण्यातून मिळालेल्या प्रेरणेने आपण नोकरी न करता उद्योजकच व्हायचे स्वप्न श्रीकांत यांनी तरुणपणातच पाहिले. परंतु हे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी १५ वर्षे त्यांना नोकरी करावी लागली. मात्र त्या नोकरीतूनच त्यांच्यातील उद्योजक घडवला गेला.
श्रीकांत बापट पार्किंन एल्मर कंपनीच्या एजन्सी असलेल्या सव्र्हिस इंजिनीअरिंग कंपनीत नोकरी करत असताना मार्केटिंगचे तंत्र शिकले. जगातील अॅनालिटिकल इन्स्ट्रमेंट्स संदर्भातील सुप्रसिद्ध अशी ही कंपनी होती. कंपनीतर्फे ते प्रशिक्षणार्थ इंग्लंड व जर्मनीस जाऊन आले होते. अनेक परदेशी बुद्धिमान मित्र त्यांना लाभले होते.
मर्फी इंडिया लि., नेटेल क्रोमोटोग्राफ्स, सुपिरिअर इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी उद्योग विश्वातील नोकरीतील अनुभवही त्यांच्या गाठी होता. वयाच्या अडतिसाव्या वर्षी १९८२ साली त्यांनी नोकरी सोडून ‘लॅब इंडिया’ ही स्वत:ची कंपनी तीन सहका-यांच्या मदतीने उभी केली. अॅनालिटिकल इन्स्ट्रमेंट्सची विक्री आणि सेवा किंवा देखभाल करणे हे त्यांच्या कंपनीचे काम होते. २००९ मध्ये याच कंपनीचे ‘लँब इंडिया अॅनालिटिकल इन्स्ट्रमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’ असे नामांतर झाले.
आता लॅब इंडिया ही एक ख्यातनाम आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सहकार्याने कार्यरत असलेली अग्रेसर फर्म किंवा व्यावसायिक कंपनी आहे. रासायनिक, औषध निर्मितीविषयक आणि पेट्रोकेमिकल उद्योग जगतातील संशोधन आणि विकास, गुणवत्ता नियंत्रण आणि शास्त्रीय साधने वा उपकरणे विकण्याचा उद्योग ‘लॅब इंडिया’ करते. ब्रुकर, सेम, लीमॅन, हॅन्सन, मॅग्रीटेक, फंगीलॅब इत्यादी नामवंत अग्रेसर कंपन्यांच्या उत्पादनाची विक्री लॅब इंडिया करते.
लॅब इंडियाने भारताच्या सीमा ओलांडून जागतिक बाजारातील भागीदार जोडले आहेत. जगातील अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आणि रशिया इत्यादी तेरा देशांत लॅब इंडिया सध्या आपली उत्पादने निर्यात करते. तसेच लॅब इंडियाच्या ‘इन्स्ट्रमेंटेशन डिव्हिजन’च्या अकरा कार्यालयात साडेचारशेपेक्षा अधिक प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत.
श्रीकांत बापट हे एक समाजसेवी वृत्तीचे, उदार मनाचे असे सहृदयी उद्योजक आहेत! ठाण्यात राहणा-या व ठाणे जिल्ह्यात आपल्या उद्योग-व्यवसायाला स्थापन करणा-या श्रीकांत बापट यांना त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील जन्मगावाची शिखरे साद घालत असतात! त्यामुळे तेथील वरवडे गावातील कनिष्ठ महाविद्यालयास त्यांनी उदारपणे देणगी दिली आहे. त्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव ‘कै. पार्वतीबाई शंकर बापट ज्युनिअर कॉलेज’ असे ठेवण्यात आले आहे.
मागासलेल्या व अत्यंत गरजू अशा १२०० ग्रामीण विद्यार्थ्यांची फार मोठी सोय या कनिष्ठ महाविद्यालयामुळे झाली. संगणकीय शिक्षणाचा लाभ घेऊन आधुनिक युगाला सक्षमपणे ते विद्यार्थी आता सामोरे जात आहेत.
खेडयात जन्माला येऊन आणि चार बहिणी व दोन भाऊ यांच्यात वाढताना आपण शिक्षण घेतल्यानेच प्रगती करू शकलो हे श्रीकांत बापट जाणतात. शिक्षणाचे अपार महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी पुण्याच्या एस.पी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘अॅडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन अॅनालिटिकल केमिस्ट्री’ या विषयासाठी मार्गदर्शन केले. तसेच, ठाण्यातील वि. प्र. मंडळाच्या महाविद्यालयातील ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सेस इन अॅनालिटिकल इन्स्ट्रमेंट्सच्या विद्यार्थ्यांसाठी क्रियाशील सहकार्य लॅब इंडियाने दिले आहे.
श्रीकांत बापट यांना जीवनाच्या अनेक विषयात रस आहे. सामाजिक जाणिवेने, पाच ते पंधरा वयाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वयम’ नावाचे मासिक प्रकाशक म्हणून ते वैशिष्टय़पूर्णरित्या प्रकाशित करतात. विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण करणे हा त्यांचा हेतू आहे. ‘वयम’ मासिकाला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभलेत. श्रीकांत बापट हे रोटरीचे २००४ ते २००५ या वर्षात अध्यक्ष होते.
इंटरनॅशनल बिझनेस डेलिगेशन कमिटीचे ते चेअरमन होते. २०१०-११ या साली रोटरी क्लबचे ते असिस्टंट गव्हर्नर होते. रोटरीच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे विविध प्रकल्प अमलात आणले होते. श्रीकांत बापट यांच्या कार्यकर्तृत्वाला त्यांचा लॅब इंडियाचा उद्योग किंवा रोटरी क्लबचे कार्य कमी पडत असावे! म्हणूनचे जागतिक मराठी परिषद, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, ठाणे मॅन्युफॅक्चर्स असोसिएनशन इत्यादी संस्थांचे सदस्यत्व स्वीकारून ते त्या संस्थांसाठीही कार्य करतात.
‘इंडियन अॅनालिटिकल इन्स्ट्रमेंट्स असोसिएशन’ १९९६ मध्ये स्थापन झाली. श्रीकांत बापट हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून चौदा वर्षे कार्यरत होते.
श्रीकांत बापट यांनी २०१४ मध्ये ‘श्रीकांचन हॉटेल्स अॅण्ड रिसॉर्ट्स प्रा.लि.’ ही नवी संस्था स्थापन केलेली आहे. या संस्थेमार्फत दोन प्रकल्प केले जात आहेत. दापोलीमधील गिम्हवणे गावी ‘मून व्हॅली’ प्रकल्पाद्वारे वैशिष्टय़पूर्ण निवासी बंगल्यांची सोय केली जात आहे. तसेच, ‘समुद्रमंथन’ या प्रकल्पाद्वारे दापोलीतील दाभोळ येथे बार आणि रेस्टॉरंटची निर्मिती करण्यात येत आहे.
श्रीकांत बापट यांना त्यांच्या कार्याबद्दल ठाणे महानगरपालिकेने ‘ठाणे गौरव’ आणि ‘ठाणे भूषण’ हे पुरस्कार दिले आहेत. २०११ मध्ये ‘उद्योग श्री’ या पुरस्कारानेही त्यांचा गौरव झाला आहे. सर्व क्षेत्रांतील अनेक नामवंत त्यांचे मित्र आहेत. उद्योजक म्हणून ते श्रीमंत आहेतच, पण चांगले मित्र ही त्यांची एक खास श्रीमंती आहे!