एकेरी पालकत्वाची प्रक्रिया भारतातही मोठया जोमाने सुरू झाली आहे. सुश्मिता सेन, संदीप सोपारकर यांच्यासारख्या सेलिब्रेटींनीही एकेरी पालकत्व स्वीकारले आहे. आता याच्या पुढे पाऊल टाकून पुण्यात कामाला असलेल्या; पण मूळचा मध्य प्रदेशच्या इंदूरचा असलेल्या आदित्य तिवारीने एका गतिमंद आणि हृदयाला छिद्र असलेल्या दीड वर्षाच्या मुलाला दत्तक घेऊन एकेरी पालकत्वाचा आदर्श ठेवला आहे. एका गतिमंद मुलाला दत्तक घेण्यासाठी एखाद्या चित्रपटाला शोभेल, असा संघर्ष त्याला एक वर्ष तीन महिने करावा लागला. या मुलाचे पालकत्व घेऊन तो एकेरी पालकत्व स्वीकारणारा देशातील सर्वात तरुण पालकही बनला आहे.
भारतात गेल्या काही वर्षापासून भारतात एकल किंवा एकेरी पालकत्वाचे वारे वाहू लागले आहेत. सुश्मिता सेन आणि संदीप सोपारकर यांच्या आधीपासून ज्यांनी अनाथ मुलांना दत्तक घेतले, अशांची नावे फारशी प्रकाशझोतात आली नाहीत. पण आताही अनेक जण अनाथ मुलांना दत्तक घेत आहेत. लग्न केलेली जोडपी, लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणारी जोडपी आणि एकटया राहणा-या स्त्री किंवा पुरुषांनी अनाथ मुलांना दत्तक घेतलेले आहे.
त्यात आता आदित्य तिवारी या २८ वर्षाच्या अविवाहित तरुणाची भर पडलेली आहे; पण त्याने दत्तक घेतलेले बालक आगळेवेगळे आहे. दीड वर्षाचा बिन्नी हा मुलगा गतिमंद असून त्याच्या हृदयाला छिद्र असल्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला अनाथाश्रमात टाकून पळ काढला होता.
आदित्य वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने इंदूरच्या ख्रिश्चन मिशनरींकडून चालवल्या जाणा-या अनाथाश्रमामध्ये फळे वाटायला गेला होता. मुलांना फळे वाटताना बिन्नी त्याच्या पलंगावर पहुडलेला त्याला आढळला. आदित्यने त्याच्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न केला असता त्याने आदित्याचा हात घट्ट पकडून ठेवला. त्याचा निरागस चेहरा पाहून आदित्यलाही तो पाहताक्षणी आवडला आणि त्याचक्षणी बिन्नीला दत्तक घ्यावे, असा विचार आदित्यच्या मनात आला.
एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल अशी ही कथा आहे. मात्र, चित्रपटात पाहताक्षणी नायकाला नायिका आणि नायिकेला नायक आवडतो. इथे मात्र स्नेह, आपुलकी, माया याने आदित्यच्या हृदयाची जागा भरून गेली. स्त्री आणि पुरुषांची भावनिक तुलना करताना भारतीय समाजाने नेहमीच स्त्रीला अधिक भावनिक असे झुकते माप दिलेले आहे. मात्र, स्त्रीपेक्षाही काही वेळा पुरुष अधिक भावनिक असू शकतो, हे या उदाहरणावरून दिसून येते. मात्र, एखाद्या चांगल्या किंवा वाईट घटनेने एखाद्याच्या डोक्यात बरेच विचार येऊ शकतात. ते येणारे-जाणारे विचार असतात.
एखाद्याचे दु:ख पाहून एखाद्याला तात्पुरती करुणा वाटणे, हे ब-याच वेळा व्यवहारी आयुष्यात घडत असते; पण त्याच्या पुढे भावनिक गाडी सरकत नाही. त्याला तेवढयापुरताच भावनिक ओलावा असतो. त्याच्यापलीकडे जाऊन एखाद्याच्या दु:खावर फुंकर घालावी, यासाठी समाज खूप कमी वेळा पुढाकार घेतो; पण आदित्यबाबत ही भावनिक ओलाव्याची प्रक्रिया प्रदीर्घ काळ सुरू राहिली आणि मग त्याने बिन्नीला दत्तक घेण्याचे पक्के केले; पण ज्या अनाथाश्रमात बिन्नी होता त्याच्या प्रशासनाने याला विरोध तर केलाच; पण त्याच्या आई-वडिलांनीही जोरदार विरोध केला. पहिल्यांदा लग्न कर आणि नंतरच काय ते दत्तक घेण्याचे खूळ पूर्ण कर, असे स्पष्ट केले; पण लग्नाशिवाय बिन्नीला दत्तक घेण्याचे त्याने पक्के केले होते.
बिन्नीला दत्तक घेण्यासाठी आदित्यने अनाथाश्रमाच्या फे-या घालणे सुरू केले, त्याबरोबर अनाथाश्रमाच्या प्रशासनाने त्याचे मन वळवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला; पण तो बधत नाही, हे लक्षात आल्यावर त्याला विविध कारणे देऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. अविवाहित एकटया पुरुषाला मूल दत्तक घेता येत नाही, अशी कारणेही सांगण्यात आली. मुलाला दत्तक देण्यासाठी अनाथाश्रम दिरंगाई करत असल्याचे लक्षात आल्यावर आदित्यने थेट केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी आणि पंतप्रधान कार्यालयाकडेही याबाबत तक्रार केली आणि दाद मागितली. त्यांनीही थेट अनाथाश्रमात येऊन याबाबत त्याला मदत केली आणि अनाथाश्रमाने सगळया गोष्टींची रितसर आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मुलाला त्याला दत्तक देण्याची प्रक्रिया लवकर पाड पाडावी, अशी सूचना केली.
मात्र, त्यानंतरही संस्थेकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, त्याच वेळी एक चांगली गोष्ट घडली. केंद्र सरकारच्या सेंटर अॅडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी (सीएआरए)ने मुलांना दत्तक घेण्यासाठी ३० वर्षे ही वयोमर्यादा शिथिल केली आणि ती २५ वर्षावर आणली. त्यामुळे आदित्यला हुरूप आला. त्याने पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू केले. मनेका गांधी आणि पीएमओ कार्यालयाला ई-मेल केले आणि शेवटी अनाथाश्रमाकडून बिन्नीचा ताबा आदित्यला दिला गेला. आदित्य बिन्नीचा पिता झाला. पाहायला गेले तर आदित्यचा एकेरी पालकत्वाकडचा प्रवास खडतर होता.
आई-वडिलांचा विरोध. लग्नाआधी अशा मुलाला दत्तक घेतले तर तुझ्याशी लग्न कोण करेल, तुझा वंश पुढे कसा सुरू राहील, म्हणून आई-वडिलांचा आक्रोश तर अशा मुलाला सांभाळणे कठीण असते, त्यामुळे तुझ्या कारकिर्दीवर परिणाम होईल, अशा सगळया शक्यता अनाथाश्रमाकडून वर्तवल्या गेल्या. या बिन्नीने आदित्यला बाबा केले, त्याला पालक केले; पण त्याचबरोबर त्याची इतर नातेसंबंध मात्र कटू केले आहेत. या पुढे कदाचित बिन्नीमुळे आदित्य आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये कायमची कटुता निर्माण होईल; पण या सगळयासाठी आदित्य तयार आहे.
एकीकडे त्याला पिता झाल्याचा आनंद मिळाला आहे आणि एकीकडे त्याच्या माता-पित्यापासून तो दुरावलेला आहे. लहान मुलांचे खूप कोडकौतुक होते; पण बिन्नीसारख्या विशेष मुलाचे आदित्यला कोडकौतुक असेल; पण समाजाला ते असेल काय? एक गतिमंद मुलगा म्हणून समाज त्याच्याकडे पाहत आहे आणि पाहत राहील. आदित्यला त्याचे कौतुक आहेच; पण त्याला तितकेच जपावे लागेल. त्याच्या शारीरिक, मानसिक विकासाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
त्याच्या शरीरधर्माकडे लक्ष द्यावे लागेल. त्याची नियमित शारीरिक-मानसिक वैद्यकीय चाचणी करून घ्यावी लागेल आणि हे सगळे त्याला नोकरी करून एकटयाला सांभाळावे लागणार आहे. त्यासाठी त्याने मानसिक तयारी केली आहे. त्याला दिलासा देणारी बाब म्हणजे त्याच्या कंपनीच्या तळमजल्यावर पाळणाघर असल्यामुळे त्याची चिंता काहीशी कमी झाली आहे. तो कामात असताना बिन्नीची काळजी योग्य रितीने घेतली जाईल.
व्यवहारी दुनियेत एका गतिमंद मुलासाठी एखाद्या तरुणाने एवढे करण्याची आवश्यकताच काय, असा प्रश्न समाज निर्माण करेल. एखाद्या अनाथावर दया, करुणा करण्यापुरताच आदित्यचा हा निर्णय वाटत नाही. त्या पलीकडे जाऊन घेतलेला हा निर्णय आहे. पालकत्वाची व्याख्या आपल्याकडील सगळया भावभावना, पैसाअडका पुढील पिढीला मिळावे, अशी असते.
मूल स्वत:चे असो, की दत्तक घेतलेले, त्याला वाढवताना, ते वाढत असतानाचा आनंद काही वेगळा असतो. त्यावेळी कुठेतरी मनात एक भावना लपून असते की, म्हातारपणी हा आपला आधार होईल; पण बिन्नीसारख्या एखाद्या विशेष मुलाला जन्मभर सांभाळण्याचा संयम आई-वडिलांकडे असेलच असे नाही. विवाहित जोडप्याला गतिमंद मूल झाले आणि त्यांनी ती टाळता न येणारी बाब असल्यामुळे त्यांना मुलाची काळजी घ्यावीच लागते. ते पालकत्व न टाळता येणारे असते.
पण आदित्यचे तसे नाही. त्यामुळेच आदित्याचे पालकत्व आगळेवेगळे ठरले आहे. बिन्नीसारख्या मुलाची निवड करून त्याने ते स्वत: मिळवले आहे, हे विशेष. त्याने बिन्नीला आयुष्यभर सांभाळण्याचा संयम अगदी तरुणपणीच, वयाच्या २८व्या वर्षीच दाखवला आहे. त्यासाठी त्याच्या संयमाचेही कौतुक करायला पाहिजे.