‘एक दुजे के लिए’ या प्रेमकथेने १९८०च्या दशकात धुमाकूळ घातला. प्रेमाला विरोध असल्याने आत्महत्या करणारी प्रेमी जोडपी हा आदिबंध बॉलिवुडमध्ये या चित्रपटानेच अमर करून ठेवला. पुढे तो केंद्रस्थानी ठेवून अनेक प्रेमपट आले. ‘एक दुजे के लिए’मधील अनेक दृश्य प्रभावी रीतीने चित्रित केली होती की, त्यांनी थेट तरुणांच्या काळजातच प्रवेश केला. त्यामुळे तो बॉलिवुडच्या प्रेमकथांमधला एक माइलस्टोन ठरला.
आमच्या काळात उदयाला आलेल्या ‘एक दुजे के लिए’ या फिल्मने नवा इतिहास घडवला असला तरी प्रत्यक्षात या फिल्मच्या मागे अनेक शतकांचा इतिहास आहे. गंगोत्री ही प्रचंड शुद्ध असते. पण, तिची नदी बनताच तिच्यात अनेक उलटेसुलटे प्रवाह विसर्जित होतात आणि ती अधिकाधिक गढूळ बनते. सर्वच धर्माचे काहीसे असेच झाले आहे. इस्लामही याचा अपवाद नव्हता आणि नाही. मात्र, प्रत्येक धर्मात मूळ गंगोत्रीला शाबूत ठेवणारा एक छोटासा स्त्रोत असतो. इस्लाममध्येही असा मूळ स्त्रोत शाबूत ठेवण्याचे श्रेय सुफी पंथाला जाते. या सुफी पंथाने निर्माण केलेली आणि गाजलेली कथा म्हणजे लैला-मजनू. सुफी पंथानुसार, अल्लासाठी तळमळणारा फकीर म्हणजे मजनू, तर लैला म्हणजे अल्लाचे सगुण रूप. मजनू या लैलासाठी पागल होतो आणि शेवटी अल्लात विलीन होतो.
युरोपमध्ये प्रबोधनाची सुरुवात होताच आशयातून ज्या अनेक गोष्टी युरोपमध्ये पोहोचल्या त्यातील एक गोष्ट म्हणजे लैला-मजनू. ही कथा रूपांतरित होत होत शेवटी शेक्सपिअपर्यंत पोहोचली. मूळची धार्मिक असलेली ही कथा शेक्सपिअरने त्याच्या काळात उदयाला आलेल्या रोमँटिसिझम या विचारप्रणालीच्या प्रभावाखाली पार्थिव केली आणि तिच्यातील धार्मिक टच पूर्णपणे गायब केला. त्यामुळे रोमिओ आणि ज्युलिएट ही प्रेमकथा अधिकाधिक ऐहिक झाली. तिचा प्रभाव सर्वत्र पडला. मात्र, भारत आणि भारताच्या प्रभावाखालील देश त्यांच्यावर मात्र तिचा प्रभाव झाला नाही. या अंगाने भारतात शोकात्मिका का जन्मल्या नाहीत, याचा शोध युरोपियन विचारवंतांनी घ्यायला सुरुवात केली. उदा. ‘द क्लासिकल ड्रामा ऑफ इंडिया’ या एच. डब्ल्यू. वेल्स यांनी लिहिलेल्या ग्रंथात या प्रश्नाची चर्चा आलेली आहे. त्यामुळे बॉलिवुडमध्ये लैला-मजनू आणि हीर-रांझा यांचा अपवाद वगळता फारच थोड्या शोकात्मिका आपणाला दिसतात. याचे कारण काय असावे?
सर्वसाधारणपणे ग्रीक आणि भारतीय तत्त्वज्ञानातील फरक हा याला जबाबदार होता. ग्रीक तत्त्वज्ञानामध्ये देव आणि दैव यांच्या हातचा माणूस हा केवळ भावना किंवा खेळणे आहे. त्यामुळेच ग्रीकांचे देव आपल्या लहरीनुसार, वाटेल तसे माणसाच्या जीवनाशी खेळताना दिसतात. भारतीयांच्यात मात्र कर्मफल सिद्धांत प्रभावी आहे आणि त्यामुळे खुद्द देवालाही माणसाच्या आयुष्याशी खेळता येत नाही. जर एखादा माणूस पुण्यवान असेल तर देवसुद्धा त्याला नरकात धाडू शकत नाही. किंबहुना जगाच्या रंगमंचावर देवाला फारसा रोलच नाही. जे काही आहे ते माणसाचे कर्म आहे आणि त्या कर्मानुसार फळ आहे. त्यामुळे एखाद्या माणसाची शोकात्मिका झाली, तर त्या शोकात्मिकेला तो माणूसच जबाबदार आहे. उदा. ‘ऊरूभंग’ या नाटकामध्ये जे भारतीय रंगमंचावरील असे एकमेव नाटक होते, ज्यात नायकाचा म्हणजे दुर्योधनाचा मृत्यू होतो, मात्र मरताना दुर्योधन ‘हे सर्व माझ्याच कर्माचे फळ आहे’ असे म्हणून सुखाने मरतो. अगदी रावणसुद्धा खलनायक असूनही अनेक नाटकांमध्ये त्याच्या मृत्यूला शोकात्मिकेची किनारच नाही. वैष्णवांच्या रामायणात तर रावण हा रामाच्या हातून मृत्यू आला म्हणून आनंदाने मरतो. आता अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शोकात्मिका जन्मणार कशी? त्यामुळे साहजिकच बॉलिवुडमध्ये लैला-मजनू आणि रोमिओ-ज्युलिएट यांच्यापासून प्रेरणा घेऊन राज कपूरने जेव्हा ‘बॉबी’ बनवला, तेव्हा नायक आणि नायिका पाण्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात, पण शेवटी एकमेकांचे बाप एकमेकांना वाचवतात आणि सुखात्मिका घडते. शेवट गोड होतो.
त्यामुळेच या सगळ्या पार्श्वभूमीवर, जेव्हा ‘एक दुजे के लिए’ ही फिल्म आली त्या वेळी तो सगळ्यांना काहीसा धक्का बसला. या चित्रपटाला तत्कालीन तरुणांचे प्रचंड पाठबळ मिळाले होते. मी स्वत: या चित्रपटाचे कोल्हापुरात २७च्या २७ खेळ सलग पाहिले होते. अर्थात, असा काही मी एकटाच नव्हतो. अनेक होते. कारण या चित्रपटातील जी गोष्ट होती ती आमच्या आसपास घडणा-या अनेक प्रेमप्रकरणांना पूरक अशी होती. असे नेमके काय झाले की, के. बालचंदर यांची फिल्म इतकी हिट झाली.
१९४७मध्ये भारत स्वतंत्र झाला, तशा तशा अनेक रोमँटिक प्रेमाच्या यशस्वी कथा ही फँटसी प्रचंड यशस्वी होत होती. या सर्व फँटसींना जमिनीवर आणले ते अमोल पालेकर यांच्या चित्रपटाने. तत्कालीन मध्यमवर्गीय वास्तवाच्या जवळ जाणा-या सगळ्या प्रेमकथा होत्या. विशेषत: ‘रजनीगंधा’. ‘बॉबी’नंतर आलेल्या ‘ज्युली’ या चित्रपटात प्रेमकथा आणि कुमारी मातेचे प्रश्न नव्या दृष्टिकोनातून मांडले होते. मात्र, या काळामधील अनेक प्रेमप्रकरणात आई-वडिलांनी प्रचंड हस्तक्षेप करून त्या प्रेमप्रकरणांची विल्हेवाट लावली होती. याच काळात यंग अँग्रीमॅनचा उदय होऊन चित्रपट अधिक वास्तववादी व्हायला लागला. मात्र, या अॅक्शन चित्रपटातील प्रेमकथा या कोणत्याच अर्थाने तत्कालीन तारुण्याला भुरळ घालणा-या नव्हत्या. त्यामुळे साहजिकच भारतीय समाज अशा एका प्रेमकथेची वाट पाहत होता, ज्यात भावनांची तीव्रता आणि प्रेमभावनेची गहनता ही अतिशय शोभित आणि प्रक्षोभित अशा शैलीत मांडली. या काळातील कथा, प्रेमकथा या रोमँटिक असल्या तरी त्यात तारुण्याचा उन्माद नव्हता आणि शरीरांचे, शारीरिक वासनांचे आवेगीकरण नव्हते. नेमक्या याच काळात शरीरसंबंधांबाबतची लज्जा संपुष्टात यायला सुरुवात झाली होती. आचार्य रजनीश यांच्या ‘संभोग से संन्यास तक’ने खळबळ उडवून दिली होती आणि १९८०पर्यंत रजनीश ही हळूहळू कल्ट फिगर बनत गेली. त्यांनी भावना जशा येतात तशा फेका, असा उपदेश केल्याने त्यांच्या नादाला लागलेल्या काही भारतीयांनी भावनिक ताळतंत्र पूर्ण सोडायला सुरुवात केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतात महाविद्यालयात प्रवेश करणा-या तरुणींची संख्या ही २०-३० टक्क्यांपर्यंत पोहोचली. अनेक कॉलेजमध्ये तरुण-तरुणी एकत्र शिकायला लागले. ‘बॉबी’मध्ये कॉलेजमध्ये जाणारे जोडपे नाही.
हीच गोष्ट ‘ज्युली’बाबत. त्यामुळे साहजिकच या नव्याने एकत्र शिकणा-या तरुण-तरुणींच्या भावनांना साद घालणारा चित्रपट कधी येतोय, याची जणू भारतीय तरुणवर्ग वाटच पाहत होता. त्यामुळे के. बालचंद्रन यांचा हा चित्रपट या सगळ्या गोष्टी घेऊन आला, त्या वेळी त्यांनी बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडले. प्रेमाला भाषा नसते असे म्हणतात. या चित्रपटाची सुरुवातच दोन भिन्न भाषिक तरुण-तरुणींच्या भेटीने होते. हळूहळू एकमेकांची भाषा आणि भावना समजून घेत त्यांच्यातील प्रेम वाढीला लागते. आतापर्यंत केवळ विनोदाला म्हणून वापरला गेलेला दक्षिण भारतीय नायक इथे खराखुरा प्रेमवीर म्हणून अवतरला. तो कमल हासन याने सादर केल्याने, त्याला एक वेगळाच दिशाकोन लाभला. त्याचे प्रत्यंतर म्हणून आपणाला यात कमल हासनचे शास्त्रीय नृत्य दिसते. बॉलिवुडमधील हा पहिला असा नायक होता जो भरतनाटयम् घेऊन अवतरला आणि तरीही पुरुषीच वाटला. व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’मध्ये गोपीकृष्ण याने सादर केलेला नायक हा शास्त्रीय नृत्यात निपुण असला तरी काहीसा बायकी म्हणजे सण होता. कमल हासनचे व्यक्तिमत्त्व प्रचंड पुरुषी असल्याने साहजिकच ‘मर्दाना नर्तक’ बॉलिवुडमध्ये प्रथमच अवतरला. त्यातच या चित्रपटातील कमल हासनची पिळदार बॉडी ही नवा सेक्स सिम्बॉल ठरली आणि पुढे संजय दत्त, सलमान खान यांच्या बॉडीत कायम राहिली. या चित्रपटातील कमल हासनची दुचाकीवरील कसरतही अभूतपूर्व होती. के. बालचंदर यांनी कमल हासनच्या सर्व अंगांचा व्यवस्थित वापर करून वासू हा नायक तयार केला. कमल हासनला तितकीच दमदार साथ रती अग्निहोत्रीने दिली. या दोघांचाही भावनांचा आवेग आणि उन्माद दाखवणारा अभिनय हा लिजेंडरी ठरला. के. बालचंदर यांनी भिंतीवर वासू-सपना अशी सतत लिहिणारी प्रेयसी, स्वत:च्या गालावर हे लिहिलेले वासू-सपना पुन्हा उमटवून घेत त्यांना आरशात पाहणारी प्रेयसी, आईने प्रेमपत्रे जाळली तर त्याचा काही भाग आपल्या तोंडात कोंबून घेत आपल्या पोटात ढकलणारी प्रेयसी अशी अनेक विलोभनीय आणि ज्याला नादखुळी म्हणावी, अशी दृश्ये अशा काही प्रभावी रीतीने चित्रित केली होती, की त्यांनी थेट तरुणांच्या काळजातच प्रवेश केला. या चित्रपटाच्या कथानकाला तोडीस तोड असे संगीत आणि पार्श्वसंगीत लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी पुरवले. ‘सोला बरस की, बाली उमर को सलाम’, ‘तेरे मेरे बिच में कैसा है यह बंधन अनजाना’, ‘हम तुम दोनो जब मिल जाऐगें, एक नया इतिहास बनायेगें’ आणि ‘मेरे जीवन साथी’ हे केवळ चित्रपटांच्या नावांची गुंफण असलेले गाणे यांनी एकच धमाल उडवली. या गाण्यांची कोरिओग्राफी हा एक कोरिओग्राफीच्या इतिहासातील एक माइलस्टोन आहे. हा तारुण्याचा जल्लोष होता आणि शोकांतिकाही. या चित्रपटाने आत्महत्या करणारे जोडपे हा आदिबंध बॉलिवुडमध्ये कायमचाच अमर करून टाकला.
आजही या आदिबंधाचे आकर्षण संपत नाही. ‘कयामत से कयामत तक’ ते ‘इशकजादे’, ‘रामलीला’ या आताच्या चित्रपटांपर्यंत, समाजाने मान्यता न दिल्याने आत्महत्येच्या टोकाला जाणारी जोडपी सातत्याने सादर केली. त्यांचा आधुनिक साचा ‘एक दुजे के लिए’पासून सुरू झाला. के. बालचंदर यांनी आपल्या तमिळ चित्रपटाचा बनवलेला हा रिमेक संपूर्ण भारतात पोहोचला आणि दक्षिण भारतीय मसाला संपूर्ण भारताला आवडू शकतो, तेही या फिल्मने सिद्ध केले. या फिल्मने आजही प्रेमिकांमध्ये मिळवलेले स्थान अबाधित आहे. ग्रँड सॅल्यूट टू के. बालचंदर!