धृतराष्ट्र हा आंधळा असूनही प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहात होता. मात्र श्रीनिवासन यांनी प्रत्येक गोष्टीकडे कानाडोळा केला. तेरा वर्षापूर्वी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तेव्हा बीसीसीआय आणि आयसीसीचा अध्यक्ष होईन, असे कदाचित श्रीनिवासन यांना वाटले असेल. मात्र ही मोठी पदे भूषवत असताना अचानक इतक्या वाईट पद्धतीने पायउतार व्हावे लागेल, असे त्यांच्या मनातही आले नसेल. मात्र श्रीनिवासन यांच्यावर तशी वेळ आली. एक चांगला क्रिकेट प्रशासक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली तरी हितसंबंध जपण्याच्या प्रयत्नात ते ‘व्हिलन’ झाले. श्रीनिवासन यांची हीच ओळख आता सर्वाच्या लक्षात राहील.
मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात सोमवारी झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) चेअरमन नारायणस्वामी श्रीनिवासन यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या रूपाने त्यांची जवळपास एका तपाची क्रिकेट प्रशासकाची कारकीर्द संपुष्टात आली. श्रीनिवासन यांच्या गच्छंतीनंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यात एका मान्यवराने श्रीनिवासन यांना धृतराष्ट्र असे संबोधले. त्यांचे असे म्हणणे की, महाभारतातील धृतराष्ट्राप्रमाणे श्रीनिवासन यांनीही स्वकियांना जपले. त्यातच त्यांनी सर्वस्व गमावले. मात्र धृतराष्ट्र यांनी स्वहित जपले तरी स्वकियांना चुकाही दाखवून दिल्या. त्यांनी सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष केले नाही. श्रीनिवासन यांनी केवळ आपला आणि आपल्या भोवतालच्या लोकांचा स्वार्थ पाहिला. परिणामी, हितसंबंध जपताना शिकार झालेले पहिले क्रिकेट प्रशासक ठरले. एम. ए. चिदंबरम, फतेहसिंग गायकवाड, एम. चिन्नास्वामी, शेषराव वानखेडे, माधवराव शिंदे, इंदरजित सिंग बिंद्रा, राजसिंग डुंगरपूर, ए. सी. मुथय्या, जगमोहन दालमिया, शरद पवार आणि शशांक मनोहर या बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. शरद पवार तर आयसीसीचे अध्यक्ष बनले.
श्रीनिवासन यांची प्रशासकाची कारकीर्द चांगली ठरली. प्रामाणिक, हुशार आणि तत्त्वनिष्ठ म्हणून ते प्रसिद्ध होते. बीसीसीआयचे आजवरचे सवरेत्कृष्ट सचिव म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. २०११ मध्ये विद्यमान अध्यक्ष शशांक मनोहर यांनाच हरवून अध्यक्ष बनलेल्या श्रीनिवासन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चांगले उपक्रम राबवले. चांगल्या योजनाही आणल्या. त्यातील उल्लेखनीय योजना म्हणजे अनेक माजी क्रिकेटपटूंना एकरकमी मिळालेले मानधन. याबद्दल माजी क्रिकेटपटूंनी त्यांना धन्यवाद दिले. बीसीसीआयनंतर आयसीसीवरही श्रीनिवासन निवडून आले. आयसीसीचे स्वरूप बदलताना चेअरमनपद हे नवे पद निर्माण केले. श्रीनिवासन यांच्या सोळा महिन्यांच्या चेअरमनपदाच्या कालखंडात बीसीसीआयने वादग्रस्त अंपायर डिसीजन रिव्हय़ू पद्धत (डीआरएस) स्वीकारण्यासाठी अन्य बोर्डाकडून दबाव टाकण्यात आला. मात्र श्रीनिवासन कुणाला बधले नाहीत. बीसीसीआयचा ‘डीआरएस’ पद्धतीला विरोध कायम आहे. शैली वादग्रस्त असलेल्या गोलंदाजांमुळे क्रिकेट खेळ हा ‘चकर’ गोलंदाजांचा बनला आहे, असे म्हटले जात आहे. श्रीनिवासन यांच्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीत पाकिस्तानचा ऑफस्पिनर सईद अजमल आणि मोहम्मद हफीझ, वेस्ट इंडिजचा ऑफस्पिनर सुनील नारायण आणि मार्लन सॅम्युअल्स तसेच श्रीलंकेचा सचित्र सेनानायके आदी ‘फेकी’ गोलंदाजांना आपली गोलंदाजीची शैली वैध ठरवण्यासाठी चाचणी द्यावी लागली. मात्र आयपीएलमधील फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणाने आयसीसीचे पहिलेवहिले चेअरमन म्हणून निवडून आलेल्या श्रीनिवासन यांना आपला कार्यकाळही पूर्ण करता आला नाही. आयपीएल फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणामुळे श्रीनिवासन यांनी केलेल्या चांगल्या कामाचा विसर पडला आहे.
आयपीएलसारखी टी-२० लीग सुरू करताना श्रीनिवासन यांच्याइतके हितसंबंध कुणी जपेल, असे वाटले नव्हते. बीसीसीआयचे पदाधिकारी किंवा नातेवाईकांना आयपीएलमध्ये फ्रँचायझी (संघ) विकत घेण्याची तरतूद त्यांनी बीसीसीआयच्या घटनेत केली. चेन्नई सुपर किंग्ज संघ श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट्स कंपनीच्या मालकीचा. इंडिया सिमेंटवर कार्यरत असलो तरी लाभाचे पद नाही, असे म्हणून श्रीनिवासन यांनी आपला संघ घुसवला. जावई गुरुनाथ मयप्पनला संघमालक नेमला. त्याच्या माध्यमातून संघाची सूत्रे हलवली. आपल्या आजूबाजूच्या लोकांना कसे खूश ठेवावे, हे श्रीनिंकडून शिकावे. त्यांनी चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आपल्या कंपनीचा डायरेक्टर बनवले. एक कर्णधार थेट संचालक बनणे, श्रीनिवासन यांच्यामुळे शक्य झाले. बीसीसीआय अध्यक्ष असल्यामुळे आपल्याला कुणी विचारणार नाही, अशा अविर्भावात ते वागले. जग जिंकण्याची ईर्षा बाळगलेल्या श्रीनिवासन यांना हुकूमशाही कारभार तसेच एककल्ली वृत्ती महागात पडली. त्यांच्या या वागण्याचे अनेक वर्षाची इभ्रत एका क्षणात मातीमोल झाली. श्रीनिवासन यांना वर्षभरात बीसीसीआय आणि आयसीसी अशा सर्वोच्च पदांवरून पायउतार व्हावे लागले. आता केवळ तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे (टीएनसीए) अध्यक्षपद त्यांच्याकडे उरले आहे. आयपीएलच्या सहाव्या हंगामातील (२०१३) फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) प्रतिष्ठा पणाला लागली होती. स्वायत्त संस्था असल्यामुळे बीसीसीआयवर केंद्र सरकारचा अंकुश नाही. मात्र ‘हम करे सो कायदा’ असे कधीच होत नाही. बीसीसीआयने स्वत:ची चौकशी समिती नेमून फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे ‘नाटक’ केले. राजस्थान रॉयल्सच्या तीन क्रिकेटपटूंवर बंदी घालून कारवाईसुद्धा केली, हे दाखवून दिले. मात्र फिक्सिंग आणि बेटिंगला केवळ क्रिकेटपटू जबाबदार नव्हते. बीसीसीआयचे काही पदाधिकारी, आयपीएल फ्रँचायझींचे (संघ) काही संघमालक आणि पदाधिका-यांचाही त्यात हात होता. मात्र एन. श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयने स्वत:च्या पदाधिका-यांसह आयपीएलचे संघमालक आणि पदाधिका-यांना जपले. शेवटी बीसीसीआयच्या विरोधात बिहार क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आदित्य वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने याची गंभीर दखल घेत बीसीसीआयला फटकारले. बीसीसीआय नियुक्त चौकशी समिती आणि त्यांचा निकाल रद्दबातल ठरवला.
सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती मुकुल मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून केलेल्या चौकशीत चेन्नई सुपर किंग्जचा संघमालक आणि श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन तसेच राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा यांना फिक्सिंग आणि बेटिंगप्रकरणी दोषी ठरवले. चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही आयपीएल संघांना प्रत्येकी दोन वर्षासाठी निलंबित केले. आयपीएल फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरण व्यवस्थित हाताळले नाही म्हणजे हितसंबंध जपल्याबद्दल तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांना पद सोडण्यास सांगावे, अशी बीसीसीआयकडे शिफारस केली. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी समितीच्या शिफारशीनंतर बीसीसीआय पुरते अडचणीत आले. चहूबाजूंनी टीका झाली. मुख्य लक्ष्य श्रीनिवासन होते. वाढत्या टीकेनंतर बोर्डाचे श्रीनिवासन यांच्यासह अन्य पदाधिका-यांचा नाईलाज झाला. श्रीनिवासन यांना अध्यक्षपदावरून हटवताना माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची निवड करण्यात आली. प्रकृती अस्वाथ्यामुळे दालमिया यांना अपेक्षित काम करणे जमले नाही. दोन महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाल्याने त्यांचा कार्यकाळ जेमतेम वर्षभराचा ठरला. श्रीनिवासन यांना तात्पुरते बाजूला करणे, हा बोर्डाची प्रतिमा सुधारण्याचा एक भाग होता. मात्र त्यांना कायमस्वरूपी बाहेर केले जाईल, असे वाटले नव्हते. बीसीसीआयची प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयोग स्तुत्य आहे. मात्र श्रीनिवासन यांना केवळ पदे सोडावी लागलीत. आयपीएल फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अद्याप शिल्लक आहे. चेन्नई संघमालक आणि जावई मयप्पनवरील बेटिंग आणि फिक्सिंगचे आरोप सिद्ध झाल्यास श्रीनिवासन यांची उरलीसुरली अब्रू जाईल. त्यावेळचे दु:ख याहून अधिक असेल.