एटीएम व क्रेडिट कार्डमधून होणारे गैरव्यवहार लक्षात घेऊन रिझव्र्ह बॅँकेने सर्व बॅँकांना ईएमव्ही चीप असलेली क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड ग्राहकांना देण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई- एटीएम व क्रेडिट कार्डमधून होणारे गैरव्यवहार लक्षात घेऊन रिझव्र्ह बॅँकेने सर्व बॅँकांना ईएमव्ही चीप असलेली क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड ग्राहकांना देण्याचे आदेश दिले आहेत. येत्या एक सप्टेंबर २०१५ पासून ही कार्ड ग्राहकांना सुपूर्द करावीत, असेही मध्यवर्ती बॅँकेने म्हटले आहे.
सध्या सार्वजनिक, खासगी क्षेत्रातील बॅँका आपल्या ग्राहकांना मॅग्नेटिक चीप असलेली कार्डे देतात. या कार्डामुळे मोठे गैरव्यवहार होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ग्राहकांना ईएमव्ही चीप असलेली क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड पुरवावीत, असे रिझव्र्ह बॅँकेने आपल्या आदेशात म्हटले आहे.
या नवीन कार्डासाठी लागणा-या सर्व पायाभूत सुविधा बॅँकांनी उभाराव्यात. त्याचबरोबर वस्तू खरेदी कराव्या लागणा-या दुकानांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी बॅँकांना चार महिन्यांची मुदत देण्यात येत आहे.
एक सप्टेंबर २०१५ नंतर सर्व डेबिट, क्रेडिट आणि नॅशनल व इंटरनॅशनल कार्डमध्ये ‘ईएमव्ही चीप’ आणि ‘पिन’ वर आधारित कार्ड जारी करणे बंधनकारक आहे, असे रिझव्र्ह बॅँकेने आपल्या आदेशात म्हटले आहे.
तसेच ज्या ग्राहकांमध्ये सध्या जुनी कार्डे आहेत. त्यांना ती बदलून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. त्यासाठी कालावधी निश्चित करावा.
ईएमव्ही चीप कशासाठी?
ईएमव्ही चीप असलेली क्रेडिट व डेबिट कार्डमुळे गैरव्यवहार होण्याची शक्यता नसतेच. ही कार्ड स्कीमिंग करता येत नाही. ही कार्ड अतिसुरक्षित समजली जातात.