औषधी वनस्पती म्हणून धामापूर येथील शिरीष विश्वनाथ देसाई यांनी हळद लागवड केली आहे. देसाई हे कोल्हापूर येथे भगवती फार्मास्युटिकलद्वारे आयुर्वेदिक औषधे तयार करतात.
औषधी वनस्पती म्हणून धामापूर येथील शिरीष विश्वनाथ देसाई यांनी हळद लागवड केली आहे. देसाई हे कोल्हापूर येथे भगवती फार्मास्युटिकलद्वारे आयुर्वेदिक औषधे तयार करतात. औषधनिर्मितीच्या हेतूने त्यांनी धामापूर येथील आपल्या जमिनीत विविध औषधी वनस्पतींची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. हळद लागवडीद्वारे त्यांनी याची सुरुवात केली आहे. या ठिकाणी उत्पादित होणारी हळद ते आपल्या भगवती फार्मास्युटिकलमधील आयुर्वेदिक औषधनिर्मितीसाठी वापरणार आहेत.
मालवण तालुक्यातील धामापूर येथील प्रगतिशील शेतकरी म्हणून शिरीष देसाई यांची ओळख आहे. कृषी उत्पादनातून अर्थार्जन करण्यासाठी त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्यांची आयुर्वेदिक औषधनिर्मितीची फर्म आहे. या भगवती फर्मास्युटिकलमधून ते मधुमेह, त्वचारोग, मूत्राशयाचे आजार यांसारख्या सुमारे 40 आजारांवर आयुर्वेदिक औषधे तयार करत आहेत. आयुर्वेदिक औषधनिर्मितीसाठी त्यांना मोठय़ा प्रमाणावर लाजरी, दगडी पाला (ट्रायडॅक्स), आले, हळद, काजूचे बोंड यांचे उत्पादन घ्यावे लागत आहे. म्हणूनच आयुर्वेदिक औषधनिर्मितीसाठी त्यांनी या वर्षी धामापूर येथील आपल्या पडीक जमिनीत हळद लागवड केली आहे. त्यांनी 30 गुंठे क्षेत्रात हळदीचे सेलम हे वाण वापरले आहे.
देसाई यांनी जमिनीची जून महिन्यामध्ये उभी-आडवी नांगरणी करून शेतातील तण काढून टाकले. यानंतर त्यांनी हळद पिकाची लागवड केली. ऑगस्ट महिन्यामध्ये हळदीच्या शेतात मजुरांद्वारे पुन्हा एकदा त्यांनी खुरपणी करून तणांचा भार कमी केला. यानंतर त्यांनी हळदीच्या पिकाला मातीची भर दिली. हळदीच्या पिकाचा ते आयुर्वेदिक औषधासाठी वापर करणार असल्याने खतासाठी त्यांनी गांडूळखताचा वापर केला आहे. संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने देसाई हे हळदीचे उत्पादन घेणार आहेत.
हळदीचे पीक हे आठ महिन्यांचे असून, शेवटचे दोन महिने त्यांना पिकाला स्प्रिंकलरद्वारे विहिरीतील पाणी द्यावे लागणार आहे. यासाठी त्यांनी सिंचनाचीही तयारी केली आहे. 30 गुंठय़ांत केलेल्या या हळदीच्या पिकातून सुमारे दोन टन हळदीचे उत्पादन मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. शेती सेंद्रिय पद्धतीने करणे ही काळाची गरज असल्याचे देसाई यांच्या कृषी उत्पन्नाचे व्यवस्थापक असलेल्या दिनेश ठाकूर यांनी सांगितले.
गावातील होतकरू, बेरोजगार तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी देसाई प्रयत्न करत आहेत. यासाठी ते गरजू शेतक-यांसाठी आपली जमीन, पाणी यांसारख्या प्राथमिक बाबीही उपलब्ध करून देण्यास तयार आहेत. मात्र होतकरू तरुणांनी कृषी व्यवसायातून रोजगार निर्माण करण्यासाठी पुढे येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सेंद्रिय खतांचा वापर
देसाई हे आयुर्वेदिक औषधनिर्मितीसाठी हळदीसारख्या पिकाची लागवड करत असल्याने त्यांनी पहिल्यापासून सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला आहे. पिकांना सेंद्रिय खताचा तुटवडा पडू नये म्हणून त्यांनी धामापूर येथेच गांडूळखत प्रकल्प उभा केला आहे. या गांडूळखत प्रकल्पातून ते दरवर्षी सुमारे 150 टन सेंद्रिय पद्धतीचे गांडूळखत तयार करत आहेत. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील कोल्हापूर येथूनही देसाई यांच्या सेंद्रिय खत प्रकल्पातील गांडूळखताला मोठी मागणी आहे. 50 किलोच्या पॅकिंगने व 350 रुपये दराने ते गांडूळखताची विक्री करतात. या गांडूळखत प्रकल्पासाठी लागणारे शेणखत धामापूर येथून व कुडाळ परिसरातून आणतात. देसाई यांची याच ठिकाणी 40 एकरात काजूची बाग आहे. या बागेतील सुके गवत व पालापाचोळय़ाचाही ते सेंद्रिय खतासाठी वापर करीत आहेत.
आपण हळद शेती महाराष्ट्रात करू शकत नाही का
कृपया मर्गदर्शन करावे.
कृपया हळद लागवडीचे मार्ग्दर्ह्स्न करावे