दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुस-या टी-२०तील प्रेक्षकांच्या गोंधळानंतर पुढील दोन वर्षात कटकमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळवू नये, असे मत विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. एकूण प्रकारासाठी त्यांनी पोलिसांनाही दोषी धरले आहे.
नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुस-या टी-२०तील प्रेक्षकांच्या गोंधळानंतर पुढील दोन वर्षात कटकमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळवू नये, असे मत विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. एकूण प्रकारासाठी त्यांनी पोलिसांनाही दोषी धरले आहे.
‘‘बाराबती स्टेडियमवरील प्रेक्षकांचा गोंधळ समर्थनीय नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत कटकला पुढील दोन वर्षात एकाही आंतरराष्ट्रीय लढतींचे यजमानपद देऊ नये. यापुढे जाऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ओदिशा क्रिकेट असोसिएशनची सवलत थांबवावी. झाल्या प्रकाराला पोलीस प्रशासनही काही प्रमाणात जबाबदार आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते. मैदानाच्या सीमारेषेजवळ तैनात असलेले पोलीस प्रेक्षकांना रोखू शकले असते. मात्र उशीरा त्यांनी दखल घेतली. आपल्या संघाची कामगिरी वाईट झाली तरी खेळात व्यत्यय आणण्याचा अधिकार कुणालाही नाही,’’ असे गावस्कर यांनी सोमवारी म्हटले.
भारतीय संघाच्या कामगिरीबाबत बोलताना, ‘‘घरच्या मैदानावर खेळताना आपल्या क्रिकेटपटूंनी प्रतिस्पध्र्याना गृहित धरू नये. चुकांमधून बोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. युवा फिरकीपटू अक्षर पटेलवर विश्वास नसेल तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राला संधी द्यायला हवी होती. अक्षरला दडपण हाताळण्यात अपयश येतेय,’’ असे गावस्कर म्हणाले.
कटकमधील दुसरी टी-२० जिंकत दक्षिण आफ्रिकेने तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. तिसरी आणि अंतिम टी-२० गुरुवारी (८ ऑक्टोबर) कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळवली जाणार आहे.