कबुतर हा शांततेचं प्रतीक असलेला पक्षी, पण मुंबईत कबुतरांची संख्या अलीकडे इतकी वाढली आहे की, तो उपद्रवाचं कारण ठरतोय. तथाकथित भूतदयावाद्यांचं अहिंसावादी बेगडी पक्षीप्रेम या उपद्रवात आणखी भर घालतंय.
काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली होती. आपल्या देशातील माळढोक टिटवी, चमचा तुतारी, क्रोंच, वंचक, रानपिंगळा, सुतारपक्षी वगैरे पंधरा पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एका विदेशी विद्यापीठाच्या मदतीने आपल्याकडील एका संस्थेने संशोधन करून ही माहिती उघडकीला आणली होती. मुंबईसारख्या शहरात तर सिमेंट-काँक्रिटचं जंगल अफाट वाढल्यापासून या पक्ष्यांचं दिसणंही दुर्मीळ झालं आहे. त्यामुळे मुंबईत कावळ्या-चिमणीच्या पलीकडे एखादा पक्षी दिसला तरी ‘शुभ योग’ मानावा, अशी परिस्थिती आहे. हे खरं असलं तरी असे काही पक्षी आहेत, ज्यांची संख्या मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. उदा. कबुतरं. कुठल्याही संशोधनातून ही माहिती बाहेर आलेली नाही किंवा याविषयीची नेमकी आकडेवारीही कधी प्रसिद्ध झालेली नाही, तरीही असं म्हणण्याचं कारण म्हणजे कबुतरांचा उपद्रव.
मुंबई हे एकेकाळी कावळ्याचं शहर समजलं जायचं. (अगदी ‘मुंबईचे कावळे’सारखं नाटकही मुंबईच्या रंगभूमीवर येऊन गेलंय.) त्यामुळेच मुंबई हे जगातलं एक गलिच्छ शहर म्हणूनदेखील कुप्रसिद्ध आहे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर असं समजलं जातं की, ज्या शहरात कावळ्यांची संख्या जास्त असते ते शहर बकाल. नॅशनल पार्क, नेचर पार्क, मुंबईच्या काही खाडया इथे वेगवेगळे पक्षी पाहायला मिळायचे, हे खरं, पण मुंबईत बहुसंख्या होती ती कावळ्यांची. गेल्या काही वर्षात हे चित्र बदललं. या कावकावणा-या कावळ्याची जागा कबुतरांनी कधी घेतली, हे कळलंच नाही. मुंबईत तसे जुने कबुतरखाने अनेक आहेत. उदाहरणार्थ, गेटवे ऑफ इंडियासमोरचा, फोर्ट येथील जीपीओसमोरचा, दादरच्या भवानीशंकर रोडवरचा, मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीजवळचा. भुलेश्वर आणि घाटकोपर भागांतही जैन देरासरांसमोर अनेक कबुतरखाने आहेत. या कबुतरखान्यांतच दिसणारी कबुतरं आता जिकडेतिकडे दिसू लागली आहेत. इमारतींचे कोनाडे, घरांच्या खिडक्या, सिमेंटच्या जाळ्या, रिकामे खोके यासारख्या सगळ्या ठिकाणी या कबुतरांचं अस्तित्व दिसतं. आता एखाद्या पक्ष्याची संख्या वाढली तर ती पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चांगलीच गोष्ट ठरायला हवी, परंतु तसं न होता कबुतरांच्या उपद्रवाने मुंबईकर हैराण होत आहेत, पण तथाकथित भूतदयावादी आणि प्राणी-पक्षीप्रेमींपुढे ते हतबल आहेत.
कबुतरांच्या उपद्रवांची यादी तर खूपच मोठी आहे. ही कबुतरं जागा मिळेल शिटतात आणि ती जागा खराब करून टाकतात. त्यांच्या शिटण्याचा अत्यंत वाईट वास येतो. त्याहून गंभीर बाब म्हणजे, त्यांच्या विष्ठेमुळे अॅलर्जीचे, तर पंख फडफडवण्यामुळे श्वसनाचे आजार जडतात. घरांच्या बाहेर कपडे वाळत घातल्यास कबुतरं त्यांच्यावर शिटतात. त्यामुळे कपडे परत धुवावे लागतात. अनेकदा घरांच्या गॅलरीत ठेवल्या जाणा-या कुंडय़ांत, रिकाम्या खोक्यांमध्ये बसून ती अंडी घालतात. मग ती पूर्ण उबवून त्यातून पिल्लं बाहेर पडेपर्यंत तिथून हटत नाहीत. सुरुवातीला त्याची गंमत वाटते, पण त्यातला किळसवाणेपणा नंतर लक्षात येतो. अनेकदा कबुतरं उघडया खिडक्यातून घरात घुसतात आणि फिरत्या पंख्यात वगैरे अडकून जखमी होतात. या सगळ्या उपद्रवापासून सुटका करायची तर एकच उपाय. तो म्हणजे खिडक्यांना विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकच्या जाळ्या लावून घ्यायच्या. कबुतरांच्या त्रासापायी स्वत:ला असं ‘बंदिस्त’ करणा-या मुंबईकरांची संख्या मोठी आहे.
मध्यंतरी मुंबईत मुंबई सेंट्रलजवळच्या कबुतरखान्याजवळ महापालिकेचा एक इंजिनीअर आपल्या मोटारसायकलवरून जात असताना एक कबुतर त्याच्या तोंडावर आपटलं. त्यामुळे त्याचा तोल जाऊन झालेल्या अपघातात त्याचं निधन झालं होतं. त्यानंतर मुंबईतील सगळे कबुतरखाने बंद करण्याचा विचार महापालिकेने केला होता. परंतु तथाकथित भूतदयावाद्यांच्या दबावामुळे त्याची अंमलबजावणी झाली नाही.
शांततेचं प्रतीक असलेल्या कबुतरांना असं उपद्रवकारी म्हणणं तथाकथित भूतदयावाद्यांना आवडणार आणि पटणार नाही, परंतु प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या तेच या कबुतरांतचा उपद्रव वाढायला कारणीभूत आहेत. ही मंडळी कबुतरांना चणे, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तांदूळ असे दाणे टाकतात. त्यामुळे एकदा दाणे मिळू लागल्यावर कबुतरं तिथून जात नाहीत. एखाद्या भूतदयावाद्याने आपल्या इमारतीत दाणे टाकायला सुरुवात केली की, हळूहळू तिथल्या कबुतरांची संख्या वाढत जाते. मग त्या इमारतीत किंवा परिसरातच ‘कबुतरखाने’ तयार होतात. अनेक जण आपल्या घराबाहेर कबुतरांसाठी छोटेखानी घरं बनवतात. ही आयती घरं मिळाल्यावर कबुतरांचा उपद्रव वाढू लागतो. त्याची स्वत:ला अिहसावादी वगैरे समजणा-यांना अजिबात फिकीर नसते. मुळात कबुतरासारख्या पक्ष्याला दाणे घालणं, हे पक्षी-प्रेम नव्हे किंवा अहिंसेशीही त्याचा संबंध नाही. कबुतरं हा पाळीव प्रकारातला पक्षी आहे, त्यांना नैसर्गिक अधिवास नाही, हे खरं असलं तरी त्यांचं भक्ष्य ती स्वत: शोधतात. किडे, कीटक हे त्यांचं भक्ष्य. ही अन्नसाखळीच असते. ते दाणेही खात असले तरी त्यांना सतत दाणे खायला घालणंही चुकीचंच. त्यामुळे कबुतरांची संख्या वाढत जाते, ही गोष्टही पर्यावरणाच्या दृष्टीने चुकीचीच गोष्ट. शिवाय प्राणी-पक्ष्यांच्या अनेक दुर्मीळ जाती धोक्यात आहेत. त्यांच्यासाठी ही मंडळी काही करत नाहीत.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कबुतरांना दाणे घातल्यामुळे होणारी अन्नाची नासाडी. एका अंदाजानुसार मुंबईत दररोज कबुतरांना शेकडो टन धान्य टाकलं जातं. तीनेक वर्षापूर्वी एका वन्यजीवप्रेमी संस्थेने केलेल्या पाहणीतून असं बाहेर आलं होतं की, मुंबईत दररोज पन्नासेक टन धान्य कबुतरं फस्त करतात. मुळात या सगळ्यामागे जबरदस्त मोठं अर्थकारण आहे, हे लक्षात घ्यायला हवं. कारण जिथे जिथे कबुतरखाने असतात, तिथे तिथे ही धान्य विकणारे व्यापारी असतात. या सगळ्यात त्यांची सर्वात जास्त कमाई होते. त्यामुळे कबुतरांच्या उपद्रवाबद्दल आवाज उठला की, त्याला सगळ्यात जास्त विरोध ही मंडळी करतात. कबुतरखान्यांना विरोध करणा-यांना या व्यापा-यांनी मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कबुतरांना टाकण्यासाठी विकलं जाणारं धान्य कमी दर्जाचं असल्याने त्यात व्यापा-यांचा फायदा जास्त
असतो. त्यासाठी ते कुठल्याही थराला जातात. कबुतरांना दाणे टाकण्याच्या अहिसेला अशी हिंसेची जोड असते.
कुठल्याही धर्माचा इथे मुद्दा तर सारासार विवेकाचा आहे. पक्ष्यांवर प्रेम करायला कुणाची काही हरकत नसेल, पण आपल्या पक्षीप्रेमातून पर्यावरण आणि जीवसृष्टीचक्राला काही फायदा न होता, इतरांना उपद्रवच होत असेल, तर तो बेगडीपणाच ठरेल, हे या तथाकथित पक्षीप्रेमींना कधी कळणार?