रिक्षा, टॅक्सी चालकांना दिलासा
नवी दिल्ली – केंद्रीय परिवहन मंत्रालयाने रिक्षा, टॅक्सी आणि ई-रिक्षा चालकांना मोठा दिलासा दिला आहे. मंत्रालयाच्या निर्णयानुसार आता रिक्षा, टॅक्सी आणि ई-रिक्षा चालवण्यासाठी व्यावसायिक वाहन परवान्याची गरज (कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स) लागणार नाही. त्यामुळे आता केवळ सामान्य वाहन परवाना असेल तरीही व्यावसायिक वाहने चालवता येणार आहेत. मात्र, ट्रक, बस आणि अन्य जड वाहनांसाठी व्यावसायिक वाहन परवाना बंधनकारक असणार आहे.
सुधारित नियमानुसार आता ७ हजार ५०० किलो किंवा त्यापेक्षा कमी वजन असेलली वाहने चालवण्यासाठी आता व्यावसायिक वाहन परवान्याची गरज लागणार नाही. परिवहन मंत्रालयाने राजधानी दिल्लीसह सर्व राज्यांना याबाबत सूचना जारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जुलै २०१७ मध्ये दिलेल्या एका आदेशानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्रालयातील अधिका-याच्या मते, सरकारच्या नव्या निर्णयामुळे, कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेत होणारा भ्रष्टाचार बंद होईल.
सरकारच्या या निर्णयानंतर लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. कारण आतापयर्ंत व्यावसायिक वाहन परवाना नसल्यामुळे आणि हा परवाना मिळवण्यासाठी जवळपास वर्षभराचा वेळ लागत असल्यामुळे अनेकांना रिक्षा, टॅक्सीचा व्यवसाय करता येत नव्हता.