एप्रिल महिन्यातच कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त भागांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.
नेरळ – एप्रिल महिन्यातच कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त भागांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुरू केलेले हे टँकर दरवर्षी जून महिन्याचे पहिल्या आठवडयात बंद करण्यात येतात, मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने जून महिना संपला तरी पाण्याचे टँकर सरकारला सुरू ठेवावे लागले आहेत. सध्या तालुक्यातील २० गावे आणि वाडय़ांत पिण्याचे पाणी टँकरने दिले जात आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागांत पिण्याचे पाणी टँकरच्या साहाय्याने पुरवावे लागते. तहसील कार्यालय आणि पंचायत समिती यांच्या माध्यमातून आमदारांच्या उपस्थितीत पाणीटंचाईग्रस्त भागांचा आराखडा तयार केला जातो. त्यानुसार या वर्षी एप्रिल महिन्याच्या ११ तारखेला कर्जत तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.
दरवर्षी जून महिना सुरू झाल्यानंतर पावसाची स्थिती पाहून हे टँकर कर्जत पाणीटंचाई कृती समिती बंद करते. यंदा पाऊस लांबल्याने तालुक्यातील ताडवाडी, बांगरवाडी, मोरेवाडी, भक्ताचीवाडी, जांभूळवाडी, भल्याचीवाडी, काठेवाडी, चाफेवाडी, टेपाचीवाडी, वडाचीवाडी, बोरीचीवाडी आणि मिर्चूलवाडी या आदिवासी वाडय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय पाथ्रज, माणगाव, मोग्रज, पिंपळस, खानंद, धामणी, अम्भेरपाडा आणि ओलमन या गावांना पाणी पुरवले जात आहे.
मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने या गावपाडय़ांची पिण्याच्या पाण्यासाठीची धावपळ कायम आहे. त्यामुळे तहसीलदार रवींद्र बाविस्कर आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी थुळे यांनी टंचाईग्रस्त भागात टँकर सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.