कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण हे दोन विधानसभा मतदार संघ मनसेच्या ताब्यात आहेत.
कल्याण – कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण हे दोन विधानसभा मतदार संघ मनसेच्या ताब्यात आहेत. दोन्ही मतदार संघात पंचरंगी लढत होणार आहे. मागील पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे मनसेला दोन्ही जागा जिंकणे एक मोठे आव्हान आहे. रेल्वेच्या परीक्षेत उत्तर भारतातून आलेल्या तरुणांना मनसैनिकांनी केलेली मारहाण प्रकरणाची पहिली ठिणगी कल्याणात पडल्यानंतर त्याचा वणवा महाराष्ट्रभर पसरला होता. त्याच लाटेवर स्वार होऊन मनसेने २००९ च्या निवडणुकीत१२ जागांवर विजय मिळवला होता.
कल्याण पश्चिमेतून मनसेचे प्रकाश भोईर हे नवखे उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यावेळी शिवसेना भाजपची युती होती. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांविरोधात भाजपचे मंगेश गायकर यांनी बंडखोरी केल्याने भोईर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. कट्टर काँग्रेसचे पदाधिकारी असलेले रमेश पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी न मिळल्याने त्यांनी मनसेची वाट धरून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यावेळी पाटील यांनी विजयश्री खेचून आणली. २०१४ च्या निवडणुकीतही मनसेने पुन्हा दोन्ही विद्यमान आमदारांना रिंगणात उतरवले आहे.
डोंबिवलीत मनसेने माजी आमदार व एकेकाळी भाजपशी संलग्न असलेले हरिश्चंद्र पाटील यांना तर कल्याण पूर्वेत नगरसेवक नितीन निकम या दोघांना उमेदवारी दिली आहे. भाजपची मते खेचण्यासाठी पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. तरुण चेहरा म्हणून निकम यांना रिंगणात उतरवले आहे. यंदाच्या निवडणुकीचे विशेष म्हणजे युती व आघाडी नसल्याने चार उमेदवारांचा सामना मनसेला करावा लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला मोठा फटका सहन करावा लागला होता.
अनेक मतदारसंघात मनसे उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले. मनसेचे आमदार असलेल्या मतदारसंघातही शिवसेनेला आघाडी मिळाली आहे. त्यामुळे मनसेला ही निवडणूक जिंकणे कठीण जाणार असल्याचे चित्र आहे. मागील पाच वर्षात कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीणमध्ये मनसे आमदारांनी गेल्या पाच वर्षात कोणती कामे केली. त्याचा लेखाजोखा त्यांना मतदारांसमोर मांडावा लागणार आहे. मनसे आमदारांची विकास कामेच त्यांना तारू शकणार आहेत. पालिका निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले. मात्र मागील पाच वर्षात मनसेची हवा गूल झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेना-भाजप व काँग्रेस- राष्ट्रवादी हे देखील आपसांत लढणार आहेत. त्यामुळे ही लढाई जिंकणे मनसेसाठी सोपे नाही.