कल्याण रेल्वे स्टेशन भागातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ५ वर्षापूर्वी एमएमआरडीएच्या अर्थसहाय्यातून स्कायवॉकच्या तयार करण्यात आला.
कल्याण- कल्याण रेल्वे स्टेशन भागातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ५ वर्षापूर्वी एमएमआरडीएच्या अर्थसहाय्यातून स्कायवॉकच्या तयार करण्यात आला. मात्र या स्कायवॉकच्या ढिसाळ कामाने कल्याणकर त्रासले असून आता तर स्कायवॅकवरुन ये-जा करणेही लोकांसाठी धोकायदायक बनत आहे.
जवळपास ६८कोटी रुपये खर्च करुन याठिकाणी हा स्कायवॉक उभारण्यात आला आहे. यातील फायबर शीटला अनेकदा आगी लागल्या आहेत. शिवाय येथे फेरीवाले, गर्दुल्ले, प्रेमीयुगुले यांचा मुक्त वावर असल्याने लोकांना त्याचा वापर करणे कठिण झाले आहे.
स्कायवॉकवर ठिकठिकाणी फुटलेल्या फरश्या, चोरीला गेलेल्या रेलिंग यांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असून गुरुदेव हॉटेलसमोरील स्कायवॉकच्या जिन्याच्या फरश्या उखडल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्याखालील लोखंडी पत्रे बाहेर आले असून परिणामी येथे अपघात होण्याची भिती सिद्धार्थ मातोंडकर आणि प्रथमेश अंकलकोटे यांनी व्यक्त केली आहे.
निकृष्ट साहित्याचा वापर
कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराने हा स्कायवॉक उभारला असून त्यात निकृष्ट साहित्य वापरल्याने स्कायवॉकचे आयुर्मान ५ वर्षातच ढासळल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अनेक शहरांत हे स्कायवॉक उभारण्यात आले असूल त्यापैकी कल्याण रेल्वे स्टेशन भागातला स्कायवॉक अपूर्णावस्थेत आहे. कल्याण पूर्वेला जोडलेला स्कायवॉक अजूनही सुरू केलेला नसून खासदार, आमदार व नगरसेवक यांच्यातील समन्वयाच्या अभावानेच स्कायवॉकची ही अवस्था झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.