२०१४ च्या निवडणुकीत भाजपाने या राज्यात ४२ टक्के मते घेतली होती. आज ती हवा नाही. भाजपा आणि त्यांचे सुप्रीमो नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेत लोकांना दिलेला एकही शब्द त्यांनी पूर्ण केला नाही.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने आसाम आणि केरळ ही दोन राज्ये गमावली. या निकालानंतर ‘काँग्रेसमुक्त भारता’चा सूर भाजपावाले नव्याने आळवू लागले आहेत. काँग्रेस पक्ष पेन्शनीत निघाला, राहुल गांधी संपले, २०१९च्या निवडणुकीत काँग्रेस खिसगणतीत नसेल अशी चर्चा पद्धतशीरपणे सुरू करण्यात आली आहे. अशी चर्चा करणा-यांमध्ये आतले-बाहेरचे विरोधक तर आहेतच; पण दिग्विजय सिंग यासारख्या काँग्रेसच्या मुरब्बी सरचिटणीसानेही ‘काँग्रेसला सर्जरीची गरज आहे,’ असे सांगून खळबळ उडवून दिली. निवडणूक म्हटली की कुणीतरी हरणारच. जय-पराजय चालू असतात. पण म्हणून सर्जरीची भाषा करावी, असे काँग्रेसला काहीही झालेले नाही. काँग्रेस हा समुद्र आहे. हलाहल पचवण्याची ताकद त्याच्यात आहे आणि म्हणून तो टिकून आहे. आता सर्जरी करायची म्हटले तर कोण करणार? राहुल गांधी यांना बाजूला व्हा म्हणण्याची ताकद कुणात आहे? गांधी घराणे वजा केले तर काँग्रेसमध्ये उरते काय? २००४ मध्ये देशात १३ राज्यांत काँग्रेस सत्तेत होता. आज केवळ कर्नाटक, उत्तरांचल, हिमाचल, मेघालय, मिझोरम आणि मणिपूर या सहा राज्यांत काँग्रेसची सत्ता उरली आहे. भाजपा सध्या १२ राज्यांत सत्तेत आहे. काँग्रेसच्या हातून एक एक राज्य निसटते आहे हे खरे आहे. पण सत्ता गेली म्हणजे तो पक्षच संपला, तो विचारच संपला असे होत नाही. मात्र भाजपावाले गोबेल तंत्रात वस्ताद आहेत. खोटे बोलतात, तेही दाबून बोलतात. भाजपाने आसाम जिंकला असेल. पण तामिळनाडू आणि बंगाल, केरळमध्ये मार खाल्ला. भाजपावाले हे बोलत नाहीत. निकालाचे अर्धसत्य पुढे केले जात आहे.
आसामच्या विजयाचा भाजपा डंका पिटतो आहे. आसाम गण परिषद आणि बोडोलानड या दोन पक्षांच्या कुबडय़ा घेऊनही भाजपाला काँग्रेसपेक्षा कमी मते पडली. आसामबाहेरच्या चार राज्यांमध्ये भाजपाने लढवलेल्या ६०७ जागांपैकी फक्त ४ जागा भाजपा जिंकू शकला. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये तर भाजपाला भोपळाही फोडता आला नाही. मग आता सांगा, कुणाला सर्जरीची गरज आहे? जनतेने भाजपाला जवळ केलेले नाही, तिने काँग्रेसेतर विरोधी पक्षांवर विश्वास टाकला. भाजपामध्ये सारे आलबेल नाही. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि राजस्थान या राज्यात नजीकच्या काळात निवडणुका आहेत. या सर्व राज्यांत अँटीइन्कम्बन्सीचा त्रास भाजपाला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल यांना बदलण्याच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशचा महासंग्राम आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने या राज्यात ४२ टक्के मते घेतली होती. आज ती हवा नाही. भाजपा आणि त्यांचे सुप्रीमो नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेत लोकांना दिलेला एकही शब्द त्यांनी पूर्ण केला नाही. उलट निवडणुका लढवण्यातच मोदी स्वत:ला धन्य मानत आले. एक निवडणूक झाली की, हे सरकार दुसरीच्या तयारीला लागते. नोकरशाही याचा फायदा उठवते आहे. मोदींचे सुरुवातीचे ‘टेरर’ केव्हाच संपले आहे. पंतप्रधानांचे कार्यालय हे निवडणुकीचे मुख्यालय बनले आहे. मोदी सत्तेत आल्यानंतर सात राज्यांत निवडणुका झाल्या आणि जणू आपणच उमेदवार आहोत अशा थाटात मोदींनी त्या लढल्या. त्यासाठी भाजपाने कधी बीफबंदी तर कधी लव्ह जिहाद खेळून पाहिला. सहिष्णुता हाही प्रचाराचा मुद्दा बनवण्यात आला. दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठातील कन्हैय्याचे देशद्रोहाचे प्रकरण तर ताजे आहे. आता हेलिकॉप्टर खरेदीत काँग्रेसच्या नेत्यांनी कसे पैसे खाल्ले हे सांगण्यात भाजपाचे नेते कामाला लागले आहेत. काँग्रेसमुक्तीच्या धुंदीत भाजपाला २०१४ मध्ये दिलेल्या वचनांचा विसर पडला आहे. केवळ राजकारण सुरू आहे. विकास, रोजगार, आर्थिक सुधारणा, शिक्षण आणि अर्थव्यवस्था या विषयावरील चर्चा बाजूला पडली आहे. राज्यकारभारावर कुणाचाही फोकस नाही. सत्तेला दोन वर्षे झाल्याबद्दल मोदी आणि त्यांच्या सरकारचे मंत्री कामाचे गुलाबी आकडे सांगत आहेत. कोण विश्वास ठेवणार?
भाजपाचे बडबडे खासदार सुब्रमण्यम स्वामी परवा नागपुरात होते. ‘आमचे सरकार नवा इतिहास आणणार आहे’ असे त्यांनी सांगितले. ‘नव्या पिढीला खरा इतिहास शिकवला जात नाही. त्यामुळे येत्या दोन वर्षात इतिहासाची नवी पुस्तके आम्ही अभ्यासक्रमात आणणार आहोत.’ असे त्यांनी मोठय़ा तावात सांगितले. भाजपाला राज्य करण्यात रस नाही. त्यांना या देशाचा इतिहास बदलायचा आहे, हेच शाश्वत सत्य आहे. हिंदू राष्ट्र आणायचे आहे. त्यासाठी सा-या उडय़ा सुरू आहेत. शाळेच्या पुस्तकातील नेहरूंवरील धडा काढला. इतिहास बदलायचा म्हणजे हे होणार. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी येणार. गांधी-नेहरूंच्या विरोधात बोलायची या देशात आधी कुणाची हिंमत होती? पण आता ऋषी कपूरसारखा हीरोही ‘बाप का माल है क्या?’ अशा शब्दात विष ओकू लागला आहे. राज कपूर जिवंत असते तर या दिवटय़ाला ठोकून काढला असता. पण ही असली शोबाजी धडाक्यात सुरू आहे. दिल्लीतल्या पर्यावरण भवनाला परवा दीनदयाल उपाध्याय यांचे नाव दिले. राष्ट्रीय तपास संस्थेने आरोपी बनवलेल्या साध्वीला क्लीन चीट दिली. यांचे हेच धंदे. देशाला रखेल समजून भाजपा राज्य करीत आहे. सत्ता हाती आली म्हणून काहीही कराल? इतिहास लिहिणे हे काय सरकारचे काम आहे? लोकच आता यांचा माज उतरवतील आणि हे सुरू झाले आहे. त्यामुळे दोन राज्ये हातची गेली म्हणून काँग्रेसने सुतक पाळायचे कारण नाही. भाजपाला धक्का देण्याची क्षमता असल्याची इच्छाशक्ती काँग्रेसला दाखवावी लागेल. पर्याय दिसत नव्हता म्हणून लोकांनी भाजपाला डोक्यावर घेतले होते. उद्या ते फेकून देतील. सारा देश २०१९ची वाट पाहत आहे. २०१४चा हिशोब जनता चुकती करणार आहे. या तीन वर्षात काँग्रेसने आपली तब्येत टणाटण करून घ्यायला काय हरकत आहे?
आता प्रश्न आहे तो हा की, काँग्रेसवर सर्जरी कशी करायची म्हणजे नेमके काय करायचे? कुणी करायचे? ज्यांनी कधी साधे इंजेक्शन टोचून घेतले नाही ते सर्जरीला तयार होतील? सोनियांच्या नेतृत्वात काँग्रेसने १९ वर्षे सोन्याचे दिवस पाहिले. आता त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्या हाती पक्ष गेल्याने ‘बुरे दिन’ आलेत का? राहुल तुसडे आहेत, लहरी स्वभावाचे आहेत, आमदारांचे ऐकत नाहीत अशी बाहेर खूप चर्चा पसरवली गेली आहे. खुद्द राहुलच आपल्या वागणुकीतून या लोकांची तोंडे बंद करू शकतात. गेली कित्येक वर्षे तेच तेच लोक दिल्ली दरबारात दिसतात. या तथाकथित नेत्यांनीच काँग्रेस लंबी केली आहे. या सर्वाना आधी घरी बसवा. सोनियांनी एकदाचा निर्णय करून टाकावा. त्या की राहुल? त्यांचा ‘आतला आवाज’ सांगत असेल तर पुढच्या निवडणुकीत त्यांनी स्वत: पंतप्रधानपदाचे दावेदार व्हावे. एकदा होऊन जाऊ द्या फैसला.