कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापराने शेतक-यांना शेतीत लाभदायक ठरणारे अनेक मित्रकिडी, उपयोगी कीटक नष्ट होत आहेत.
आचरा- कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापराने शेतक-यांना शेतीत लाभदायक ठरणारे अनेक मित्रकिडी, उपयोगी कीटक नष्ट होत आहेत. याचा फटका परागीभवनाचे महत्त्वाचे कार्य करणा-या मधमाशांनाही बसत आहे.
शेती पिकात व फळबागात प्रभावीपणे परागीभवन घडून येण्यासाठी मधमाशा ठरतात. अशा मधमाशांपासून रोजगाराचे नवे दालन उभे राहिले आहे. याचा उपयोग करून (यू.एन.डी.पी.) तर्फे समुद्रकिनारी भागात कांदळवनातील मधुमक्षिका पालन प्रकल्प राबवला जात आहे. आचरा गावात डोंगरेवाडी जामडूल येथील महिला बचतगटांच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
कुठेही रुजून येण्यामुळे आणि गाळ माती मुळात साठवून ठेवून खाडीचे पात्र भरून जाणे, घनदाट जंगल होणे आदी गोष्टींमुळे किनारी भागात राहणा-या लोकांच्या मनात कांदळवने त्रासदायक अशा प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला आहे. त्यामुळे गैरसमजातून कांदळवनांची (मैग्रो)ची कत्तल केली जात आहे.
याचा परिणाम पर्यावरणावर होऊन समुद्री जीवांना धोकादायक ठरत आहे. यामुळे भारत सरकार सागरी जैवविविधता संवर्धन व संरक्षण प्रकल्पांतर्गत या मैग्रोवनांचे फायदे त्यावरून मिळणारे रोजगार स्थानिक लोकांना पटवून दिल्यास या कांदळवनांचे संरक्षण होण्यास मदत होईल.
या दृष्टीनेच सिंधुदुर्ग प्रकल्पांतर्गत जैवविविधता संवर्धन व संरक्षण करत असताना संवर्धनासाठी लोकांवर निर्बंध आणून संवर्धन करणे हा दृष्टिकोन न ठेवता स्थानिकांना अतिरिक्त उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देत मधुमक्षिका पालनासारखे प्रकल्प राबवून स्थानिकांना शाश्वत उपजीविका आणि अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी निर्माण करून दिल्या. यासाठी या भागातील गरजू, होतकरू महिलांना निवडून त्यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले गेले.
तसेच मधमाशांसहित आवश्यक सर्व साहित्यही पुरवले गेले. या पालनासाठी सातोरी जातीच्या मधमाशा पुरवल्या गेल्या. याबाबत माहिती देताना यू.एन.डी.पी.च्या प्रकल्प व्यवस्थापक अधिकारी दया पत्की यांनी सांगितले की, मधमाशांच्या आग्या, फुलोरी, सातेरी, इटालियन या चार जाती असल्या तरी सातोरी या जातीच्या मधमाशा आठ किंवा चार चौकटी असलेल्या लाकडी पेटयांमध्ये सहजपणे पाळता येतात.
यात एका वसाहतीतील मधमाशांची संख्या १५ ते २० हजापर्यंत असते. आजूबाजूला फुलो-याची उपलब्धता चांगली असल्यास एका वसाहतीपासून वर्षाकाठी सरासरी ४ ते १० किलो मध मिळू शकते. या पाळीव मधमाशांच्या वसाहतींचे पेटयातून स्थलांतर करून पिकांमध्ये परागीभवन प्रभावीपणे घडवून आणता येते व पीक उत्पादन वाढीचा फायदा मिळविता येतो.
या हिवाळयात ७ अंश सेल्सियस तापमानातही कार्यक्षम असतात. इटालियन मधमाशांपेक्षा दिवसभरातील एकूण काम करण्याचा कालावधीही अधिक असतो. यांचे आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे त्या कमीत कमी सात ते आठ पोळी एकमेकांना समांतर बांधतात व बरीच वर्षे एकाच ठिकाणी वास्तव्य करून राहतात.
तसेच त्या मवाळ स्वभावाच्या असल्याने हाताळण्यासही ब-या. या दृष्टीने विचार करून या मधमाशांचा वापर करून कांदळवन संवर्धन योजना राबविली आहे. यामुळे रोजगाराची संधीही येथील महिलांना मिळू शकते.
आचरा डोंगरेवाडी येथे सौ. रिद्धी बागवे, सौ. श्रद्धा बागवे, प्राजक्ता राणे, प्रगती आचरेकर, एकता राणे, संपदा बागवे, सुहासिनी आचरेकर, सीमा बागवे, सविता आचरेकर, सरस्वती बागवे या दहा महिलांच्या माध्यमातून कांदळवनातील मधुमक्षिका पालन प्रकल्प राबवला जात आहे.
याबाबत यूएनडीपीचे आर्थिक व उपजीविका तज्ज्ञ सुहेल जमादार सांगतात, सिंधुदुर्ग प्रकल्पापूर्वी स्थानिकांमध्ये कांदळवन म्हणजे निरुपयोगी असा गैरसमज पसरला होता.
परंतु ज्या वेळी केंद्र सरकारच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असणा-या समुद्री उत्पादन व निर्यात केंद्र व राजीव गांधी जलकृषी केंद्र संस्थाच्या सहाय्याने कांदळवनातील खेकडा पालन या उपक्रमाची ओळख करून देण्यात आली आणि कांदळवनाकडे पाहण्याचा स्थानिकांचा दृष्टिकोन बदलला.
आता मधुमक्षिका पालनामुळे कांदळवनांचा आणखीन एक उपयोग स्थानिकांसमोर आला आहे. त्यामुळे बहुविध उपयोगी असलेल्या कांदळवनांचेसंवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.