आठवणींचं एक बरं असतं नाही, त्यांना काळ, वेळ, स्थळ, देश, परदेश याचं काही बंधनच नसतं. त्या केव्हाही आपल्याला भूतकाळात घेऊन जातात आणि कधीही वर्तमानात आणून सोडतात.
आठवणींचं एक बरं असतं नाही, त्यांना काळ, वेळ, स्थळ, देश, परदेश याचं काही बंधनच नसतं. त्या केव्हाही आपल्याला भूतकाळात घेऊन जातात आणि कधीही वर्तमानात आणून सोडतात.
मध्यंतरी दुबईला जाण्याचा योग आला. म्हणजे दुबई दर्शनाची इच्छा होतीच आणि ती इच्छा पूर्ण झाली. अतिशय सुंदर देश. तिथे पूर्वी
वाळवंट होतं हे आपल्याला आठवावं लागतं आणि त्यांना ते सांगण्याची, उगाळण्याची गरज वाटत नाही. इतकी हिरवळ आणि उत्तमोत्तम वास्तू त्यांनी तिथे निर्माण केल्या आहेत.
दुबईला विमानातून उतरलो आणि आमच्या शेजारीच बसलेल्या मुलाने लगेच त्याचा मोबाईल सुरू केला. ‘किती ही आजकालची मुलं मोबाईलच्या आहारी गेली आहेत’ असा विचार माझ्या मनात आला. तितक्यात त्या मुलाचं बोलणं कानावर आलं, तो त्याच्या मित्राला सांगत होता, ‘आधी आईला कळवतो रे, सुखरूप पोहोचलो म्हणून. जोपर्यंत माझा फोन, मेसेज जात नाही तोपर्यंत तिला चैन पडणार नाही. काळजी करत बसेल.
रात्री स्काईपवरही बोलेन.’ त्या तरुण मुलाची घरच्यांबद्दलची काळजी पाहून माझं मन भरून आलं आणि त्या तरुण मुलावरून आठवली ती ३५-३६ वर्षापूर्वीची ती घटना. माझा आत्येभाऊ सतीश इंजिनीयर झाला होता. त्याला औरंगाबादला आणि नंतर पुण्याला चांगली नोकरीही होती. पण मुळात स्वस्थपणे १० ते ५ नोकरी करून ठरावीक रकमेत समाधान मानण्याची त्याची वृत्ती नव्हती. स्वस्थ बसणे स्वभावात नव्हते आणि तो काहीतरी नवीन मिळण्याची संधी शोधत होता.
हुशारी, मेहनती स्वभाव आणि इच्छाशक्ती या सगळ्यांचा संगम झाला आणि त्याला दुबईला नोकरीसाठी जाण्याची संधी मिळाली. तेव्हा परदेशात नोकरीला जाण्या-यांचं कौतुक वाटायचं. क्वचित कुणाला असुयाही वाटायची. आई-वडिलांना आभाळ ठेंगण व्हायचं, असा तो काळ होता.
माझ्या आत्येभावाची दुबईला जाण्याची तारीख ठरली आणि आत्याबाईच्या डोळ्यांना धारा लागल्या. एका डोळ्यात लेकांबद्दल कौतुक होतं तर दुस-या डोळ्यात काळजी. शब्दानं जे व्यक्त होत नव्हतं ते डोळ्यांतून वाहत होतं. विमान मुंबईहून सुटणार होतं.
मुलाला निरोप द्यायला आपणही मुंबईला जावं अशी आत्याची मनापासून इच्छा होती, परंतु मनाने प्रेमळ असणारे पण वर्तनाने जमदग्नी असणा-या नव-यासमोर स्पष्ट बोलण्याची प्राज्ञा त्यांच्यात नव्हती. जीव नुसता वर-खाली होत होता. शेवटी त्यांनी भीतभीत विचारणाही केली; पण नव-याने स्पष्ट सांगितले ‘मुंबईला येण्याची काही गरज नाही. इथूनच निरोप घ्या.’ आणि मग त्या माय-लेकरांनी भरल्या डोळ्यांनी आणि दाटल्या कंठाने निरोप घेतला. नंतरचे कित्येक दिवस आत्याच्या डोळ्यांला डोळा लागला नाही आणि घशाखाली घास उतरत नव्हता.
पोर नीट पोहोचलं असेल की नाही? मुळात पोहोचला असेल की नाही? असे उलटे सुलटे विचार मनात िपगा घालत होते. तिकडे मुलाचीही अवस्था काही वेगळी नव्हती. नवीन देश, नवीन माणसं. या अनोळखी देशात आपला निभाव लागेल का? माणसं कशी असतील अशा असंख्य विचाराने त्यालाही कावराबावरा व्हायला होत होतं. इतके दिवस एका सुखी आणि सुरक्षित कुटुंबात वाढलेला, वावरलेला तो.. आता एकदमच मोकळ्या आभाळाखाली एकटा पडल्यासारखा झाला होता. भारतात आई-वडिलांशी बोलायला तर आतासारखे तेव्हा मोबाईल नव्हते, ना घरोघरी फोन. संपर्काची साधनंच खूप कमी होती.
थोड स्थिरस्थावर झाल्यावर त्याने घरी सविस्तर पत्र पाठवलं. दुबईहून पाठविलेलं ते पत्र मजल-दरमजल करत परभणीला जवळपास महिन्याभराने पोहोचलं. तोपर्यंत त्या माऊलीचा जीव तडफडत होता, पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखा. जोपर्यंत मुलाची ख्यालीखुशाली कळत नव्हती तोपर्यंत त्यांच्या जीवाला स्वस्थता लाभत नव्हती.
आज माझ्याशेजारी बसलेल्या त्या मुलाने काही मिनिटातच आपली खुशाली आपल्या आईला कळवली. दोघांचेही जीव सुखावले! हीच सुविधा तेव्हा असती तर.. आत्याचे ते अनेक दिवस आणि रात्री काळजीत, तळमळण्यात आणि चिंतेत गेल्या नसत्या.
काळ बदलला. सोयीसुविधा आल्या. तंत्रज्ञानाने माणसांना जवळ आणलं. क्षणांत आपण एकमेकांना आपले प्रॉब्लेम किंवा खुशाली कळवू शकतो. पण आपलं माणूस जेव्हा नजरेआड होतं आणि जोपर्यंत ते सुखरूप आहे हे कळत नाही तोपर्यंत जीव तळमळतोच, तडफडतोच. मग तो काळ ३५-३६ वर्षापूर्वीच्या आत्याचा असो की आजच्या या अज्ञात माऊलीचा. जिथे मायेचा धागा विणला जातो, तिथे त्याला काळजीपोटी ओढ बसतेच.