इंग्लिशच्या तुलनेत आपल्या भाषेत काही कमतरता आहे, असा विचारच चुकीचा आहे. शेजा-याचं नाक लांब आहे, म्हणून आपण आपलं नाक लांब करण्याची मुळीच गरज नसते. तसं केल्यानं श्वासोच्छ्वास अधिक चांगला करता येतो असं नसतं, पण आपल्याला गो-या कातडीचं आणि इंग्लिश भाषेचं इतकं आकर्षण आहे की, येनकेनप्रकारे आपल्याला इंग्लिशसारखं व्हायचं असतं.
काळ (टेन्स) ही प्रत्येक भाषेची आपली अशी खास परंपरा असते. प्रत्येक भाषेनं आपल्या काळांच्या मर्यादा निश्चित केलेल्या असतात, इतर भाषांमध्ये त्या मर्यादा तशाच असल्या पाहिजेत असं मुळीच नाही. अगदी मराठी-हिंदीसारख्या, अक्षरश: सख्ख्या बहिणीसारख्या असलेल्या भाषांमध्येही त्या कल्पना सारख्या आहेत, असं नाही. आज भारतीय भाषांच्या संदर्भात काळांचा विचार करताना बहुधा इंग्लिशमधल्या काळांशी तुलना केली जाते, कारण इंग्लिशमधल्या प्रमाणीकरणाचा स्टॅन्डर्डायजेशनचा फायदा आपल्याला (जमल्यास सहजपणे किंवा ओरबाडून) घ्यायचा असतो.
या बाबतीत आपण आपल्याकडच्या संस्कृतच्या प्रमाणीकरणाचा उपयोग करण्याचा विचार करीत नाही, त्याचं एक कारण म्हणजे संस्कृतातले काळ जरा वेगळे आहेत आणि दुसरं कारण म्हणजे आपल्याला इंग्लिशच्या आधारानं केलेला विचार आधुनिक वाटतो हेही आहे. इंग्लिशचा प्रभाव हल्ली आपल्यावर एवढा आहे की, संस्कृतचे अनेक जाणकारही संस्कृतमध्ये इंग्लिश काळांची नक्कल करायला लागले आहेत, उदा. इंग्लिशमध्ये वर्तमान, भूत आणि भविष्य अशा तीनही काळांमध्ये कन्टिन्यूअस असा प्रकार आहे म्हणजे –
I am going / I was going / I will be going इत्यादी.
इंग्लिशमधल्या काळांचा हा प्रकार संस्कृतात मुळीच नाही, तरीही इंग्लिशची भ्रष्ट नक्कल करून –
‘अहं गच्छन् अस्मि।’, ‘स गृहं गच्छन् आसीत्।’ अशी चमत्कारिक, अक्षरं, अ-संस्कृत वाक्यं अलीकडच्या संस्कृतप्रेमींकडून केली जातात आणि त्याचं समर्थनही केलं जातं, हे चूक आहे.
‘तो जातो / गेला’ एवढा अर्थ संस्कृतमध्ये पुरेसा असतो. ‘तो जात आहे / जात होता’ याची गरजच संस्कृतात नाही. (संस्कृतप्रमाणे जर्मन, रूसी वगरे अनेक भाषांमध्येही नाही.)
ही वाक्यं संस्कृत पद्धतीनं ‘अहं अगच्छम्।’, ‘स गृहं अगच्छत्।’ अशीच व्हायला पाहिजेत.
मुळात संस्कृतात नसलेल्या अनेक गोष्टी प्रादेशिक भाषांमधून मठ्ठ भाषांतराच्या आधारानं मोडतोड करून संस्कृतात बसवण्याच्या प्रकाराचं समर्थन करताना हे संस्कृतप्रेमी असं म्हणतात की, ‘हे संस्कृतचं आधुनिक रूप आहे, सारे प्रादेशिक भेद त्यात घेतले म्हणजे संस्कृतचा विकास होईल..’ शास्त्रीयदृष्टया पाहिलं, तर आजच्या मराठी, हिंदी, बांगला वगरे भाषा म्हणजे संस्कृतची विविध भागातली आधुनिक रूपंच आहेत, त्यात पुन्हा प्रादेशिकता आणायची असेल, तर मग ‘सर्वाना जोडणारी संस्कृत’ असं तिचं रूप होतच नाही!
इंग्लिशच्या तुलनेत आपल्या भाषेत काही कमतरता आहे, असा विचार मुळातच चुकीचा आहे. आपल्या शेजा-याचं नाक लांब आहे, म्हणून आपण शस्त्रक्रिया करून आपलं नाक लांब करण्याची मुळीच गरज नसते. तसं केल्यानं श्वासोच्छ्वास अधिक चांगला करता येतो असं नसतं, पण आपल्याला गो-या कातडीचं आणि इंग्लिश भाषेचं इतकं आकर्षण आहे की, येनकेनप्रकारे आपल्याला इंग्लिशसारखं व्हायचं असतं. इंग्लिशमध्ये आहेत तसे कन्टिन्यूअस काळ जर्मनमध्ये किंवा रूसी भाषेत नाहीत, पण त्यांना याचं वैषम्य वाटत नाही. त्यामुळे त्यांची प्रगती कुठे थांबली नाही, अडली नाही. त्यामुळे आपल्या भाषेत कमतरता आली, आपलं नुकसान झालं, असं त्यांना कधी वाटलेलं नाही. जगातलं हे वास्तव आपल्याला हे कधी कळणार?
मुगल काळात धर्माच्या कारणानं अरबी आणि दरबारी भाषा म्हणून फार्सी या भाषांचा परिणाम भारतीय भाषांवर झाला, पण त्या परिणामांमध्ये काय घडलं? अनेक अरबी, फार्सी, तुर्की शब्द आपल्या भाषांमध्ये आले एवढंच. आपल्या भाषांच्या रचनांवर अरबी-फार्सी-तुर्की यांचा काहीही परिणाम झाला नाही. भारतीय भाषांची मोडतोड झाली नाही. इंग्रजी राज्याच्या काळातही तेच घडलं. खूपसे इंग्लिश शब्द भारतीय भाषांमध्ये घुसले, पण भाषांच्या अंतर्गत रचनेत म्हणजे व्याकरणात काही मोडतोड झाली नाही.
१९४७ मध्ये इंग्रज इथून निघून गेल्यावरही परिस्थिती फारशी बदलली नाही, पण मागच्या शतकात सत्तरच्या दशकापासून मात्र तमाम भारतीय भाषा-भाषिकांनी आपणहून आपल्या भाषांची पद्धतशीर मोडतोड करायला सुरुवात केलेली आहे. आपल्या भाषेला प्रयत्नपूर्वक बिघडवण्याचे उद्योग चालू आहेत. अनेक वर्तमानपत्रंही नियोजनपूर्वक हा प्रकार करत असल्याचं दिसतं. (त्याबद्दल त्यांना कोण काय देतं, कोण जाणे.) चोवीस तास खोटे / विकृत कार्यक्रम दाखवणा-या दूरचित्रवाणीच्या खासगी वाहिन्या, विशेषत: मराठी वाहिन्या भाषा बिघडवण्याचा उद्योग फार मोठय़ा प्रमाणावर करत आहेत आणि याबद्दल मराठी भाषिकांना काहीच वाटत नाही. (हिन्दीभाषिक वाहिन्या असं काही करत नाहीत, पण ऊठसूठ हिंदीचा राग-राग करणा-या मराठीप्रेमींना हे दिसत नसावं / ऐकू येत नसावं.)
आपल्या भाषेत परंपरेनं असणारे काळ आपल्याला पुरेसे असतात, त्यांचा नीट उपयोग केला तर कुठेही काहीही अडत नाही. आपल्या भाषेसाठी आपण एक सोपी गोष्ट सहज करू शकतो, तिचा उपयोग, तिचा नीटपणे केलेला उपयोग. लक्षात असू दे की, आपल्या भाषेचे आणि संस्कृतीचे मारेकरी नेहमी स्वकीयच असतात!