वीस लहान-मोठय़ा माणसांचा ग्रुप कास पठारला पोहोचला होता आणि तिथं गेल्यावर काय पाहायचं असा प्रश्न त्यांना पडला होता. आता तिथं काय पाहायचं हे समजावून देणं हे माझ्यापुढचं आव्हान होतं. निसर्गरम्य ठिकाणी गेलेल्या या सहलीचा हा मजेशीर अनुभव.
मी डोंबिवलीहून पुण्याला जाणारी गाडी पकडली होती. साता-याजवळ असणारं, निसर्गप्रेमी व छायाचित्रकारांमध्ये प्रसिद्ध असणारं कास पठार पाहायचं म्हणून उत्साह अंगात भरला होता. ऑक्टोबर महिन्याची सकाळची थंडी चांगलीच गारठवणारी होती; तरी काही वाटत नव्हतं कारण डोक्यात सहलीचे विचार चालू होते. ही सहल माझ्यासाठी महत्त्वाची होती, कारण या सहलीला मी पर्यटक म्हणून जात नव्हते तर सहल संयोजक व मार्गदर्शक म्हणून चालले होते. पुण्याला पोहोचेपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता, याचं कारण माझे सर्व सहलयात्री हे पुण्यातलेच होते व मी त्यांना पुण्याहून कासला घेऊन जाणार होते. अखेर मी पुण्यात पोहोचले व दुस-या दिवशी लवकर जमण्यासाठी फोनाफोनी सुरू केली. दुस-या दिवशी सकाळी सर्व जण जमता जमता नऊ वाजले. आमची बस देखील आली. मग आम्ही पुण्याहून साता-याकडे निघालो. थंडीचे दिवस असल्याने हवेत छान गारवा होता. पहाटे उठायला लागून धावपळ होत होती, तरीही प्रसन्न वाटत होतं. आता माझ्यासोबत पर्यटक होते, त्यामुळे त्यांना रिझवणं, माहिती देणं हे माझं काम होतं. या सर्वामध्ये ६-७ लहान मुलं देखील होती. त्यांची नेहमीप्रमाणे धमाल-मस्ती सुरू होती. त्यांना तसंच खेळू देत मी बसमधल्या लोकांशी बोलायला सुरुवात केली. त्यांना कास पठाराची थोडी माहिती दिली. त्यांचे विचार व प्रश्न जाणून घेतले. ही सर्व जण छान उत्साहात होती. मराठी लोकांप्रमाणेच काही मराठी नसलेली कुटुंबही यात होती. त्यामुळे हिंदी-मराठी-इंग्रजी असं सर्व बोलणं चाललं होतं. बसमधील एक ज्येष्ठ व्यक्ती, देसाई यांनी बोलायची परवानगी मागितली. ते इतिहास अभ्यासक होते. अर्थातच त्यांनी एकेक मनोरंजक गोष्टी सांगत बसमधल्या सर्वाना गुंतवून ठेवलं. साधारण साडेबारा-एकच्या सुमारास आमची बस कासला पोहोचली. परंतु बस पठारावर जाण्याआधीच आम्हाला बस देखील रांगेत लावावी लागली. कारण वीकेंड असल्यामुळे आधीच पर्यटकांची खूप गर्दी जमली होती. या सर्वाच्या बसेस आमच्यापुढे होत्या आणि काही बसेस आमच्यापाठी होत्या. प्रत्यक्ष पठाराकडे जाण्याआधी अर्धा तास ही अशीच बसची रांग लागली होती. मग आम्ही उतरलो आणि चालू लागलो.
कास पठारला गेल्यावर तिथं आधी कॅमेरा व प्रवेश करणा-यांची सशुल्क नोंद करून घ्यावी लागते, तशी ती करून घेतली. वातावरण कमालीचं आल्हाददायक असल्याने आमच्या ग्रुपच्या अंगात आता जास्तच उत्साह संचारला होता. पण कासची माहिती नसल्यामुळे कुठून सुरुवात करायची हे कोणाला माहीत नव्हतं. कासला आल्यावर माझा मित्र रोहन तावरे देखील आम्हाला सामील झाला होता. आता हा ग्रुप आम्हा दोघांच्या मार्गदर्शनाखाली कास पठार पाहणार होता. सर्वत्र फुललेलं पठार पाहून सगळेच खूश झाले होते. कारवीपासून ते निसुरडीपर्यंत अनेक छोट्या छोट्या विविधरंगी फुलांनी दोन्ही बाजूंची पठारं भरून गेली होती. स्वत: आम्हालाही हे निसर्गसौंदर्य पाहून खूप आनंद झाला होता. फुलांचे पसरलेले ताटवे पाहून मंडळी चांगलीच खूश झाली होती. लगेच कोणीतरी तिथं बसून डबा खाण्याची कल्पना मांडली. तेव्हा हे जागतिक वारसा दर्जाचं पर्यटनस्थळ असल्याने इथे अशा पद्धतीनं कागद व पाय पसरून डबा वगैरे खाता येणार नाही हे त्यांना समजावून द्यावं लागलं. यावर एकाने विचारलं की हे जागतिक दर्जाचा वारसा म्हणजे काय प्रकार असतो आणि तो याच पठाराला का दिलाय? त्यांच्या दृष्टीने हा प्रश्न अगदी साहजिक व चांगला होता. तेव्हा मग आम्ही पुन्हा एकदा ग्रुपचं एक लेक्चर घेतलं. त्यानंतर प्रत्येक फुलापाशी, झाडापाशी नेऊन त्यांना माहिती द्यायला सुरुवात केली. योगायोगाने आम्हाला तिथं एक चांगलं ज्ञान असणारे वनस्पती तज्ज्ञ भेटले. त्यांनी आमचं काम अधिकच सोप्पं केलं. मग त्यांनीच आमच्या ग्रुपचा ताबा घेतला. आम्ही देखील आनंदाने त्यांची माहिती ऐकायला सुरुवात केली. असे तीन-चार तास तिथं घालवल्यावर मग आम्ही कास पठाराचा निरोप घेतला व पुढे सज्जनगडाकडे कूच केली. आता आमची नवी कामगिरी आमच्यासमोर उभी होती, ती म्हणजे सोबतच्या मंडळींना सज्जनगडाची माहिती देण्याची..