भाजपा सरकारच्या काळात ९ हजारपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी मुख्यमंत्री म्हणतात कर्जमाफीची योग्य वेळ आलेली नाही.
मुंबई- भाजपा सरकारच्या काळात ९ हजारपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी मुख्यमंत्री म्हणतात कर्जमाफीची योग्य वेळ आलेली नाही. नेमक्या किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर कर्जमाफीची योग्य वेळ येणार आहे? असा खडा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला केला.
शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा शुक्रवारी मराठवाडय़ात दाखल झाली. हिंगोली येथील जाहीर सभेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्याच्या विविध भागांत रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत; पण सरकार शेतक-यांना दिलासा देण्यासाठी काहीच करत नाही. २०१३ साली आमच्या सरकारच्या काळात प्रचंड दुष्काळी परिस्थिती होती. त्या वेळी आम्ही १० लाख जनावरे चारा छावणीत सांभाळली. शेतक-यांसाठी राज्याची तिजोरी उघडी केली. भाजपा सरकारने उद्योगपतींची १ लाख १७ हजार कोटींची कर्ज माफ केली, पण शेतक-यांचे ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज हे सरकार माफ करत नाही. शेतक-यांना मदत करण्याची या सरकारची दानत नाही, असेही चव्हाण म्हणाले.
याच सभेत बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा जोरदार समाचार घेतला. जनतेला भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. या सरकारच्या काळात महागाई मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.
निवडणुकीत आश्वासन देऊनही सरकार शेतीमालाला हमी भाव देत नाही. खासगी बाजार समित्या आणून शेतक-यांची लूट करण्याचे काम या सरकारने सुरू केले आहे.
या सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असून यांच्या मनात नथुराम आहे, अशी जळजळीत टीका पवार यांनी केली. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. लोकांना फसवून त्यांची मते घेऊन मोदी पंतप्रधान झाले, पण लोकांचे अच्छे दिन काही आले नाहीत. भाजपा सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला असून विरोधकांचा आवाज दाबून हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतक-यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
दरम्यान, तिस-या दिवशी संघर्षयात्रा विदभार्तील सहा जिल्ह्यांतून मार्गक्रमण केल्यानंतर हिंगोलीमार्गे मराठवाडय़ात दाखल झाली. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड, मालेगाव, मंगरूळपीर आदी ठिकाणी संघर्षयात्रेचे शेतक-यांनी मोठय़ा उत्साहात स्वागत केले. मार्गातील खेडय़ापाडय़ांतही अनेक शेतकरी रस्त्यावर संघर्ष यात्रेच्या प्रतीक्षेत उभे होते. मराठवाडय़ात सात जिल्ह्यांत प्रवास करून ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे. या संघर्षयात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, पिपल्स रिपब्लिकन पार्टी एमआयएम या सर्व विरोथी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.