सह्याद्रीचे मस्तक म्हणजे साल्हेर. महाराष्ट्रातील दोन क्रमांकाचे शिखर म्हणजे साल्हेर. बेलाग, बुलंद, अजिंक्य, अजस्त्र असा हा बागलाणातील किल्ला महाराष्ट्राचे वैभव आहे. शिवाजीने साल्हेरचे युद्ध जिंकल्याची बातमी ऐकून मुसलमानांच्या काळजात धडकीच भरली. स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तिन्ही लोक शिवाजीचे यश गाऊ लागले असे गौरवोद्गार या किल्ल्याविषयी कविराज भूषणांनी लिहून ठेवलेले आहेत.
आम्ही साल्हेर व त्याचा जोड किल्ला सालोटय़ाचा ट्रेक आयोजित केला होता. नेहमीप्रमाणे बोरिवलीहून खासगी वाहनाने रात्री साडेदहा वाजता आम्ही साल्हेर ट्रेकसाठी प्रयाण केले. या ट्रेकसाठी आम्ही एकूण सत्तावीस जण होतो. रात्री बारा वाजता आम्ही ठाणे, भिवंडी माग्रे नाशिकला निघालो. थंडी कडाक्याची होती. सर्व जण गाडीतल्या उबदार वातावरणात मस्त झोपले होते. पहाटे ४ वाजता आम्ही नाशिकला पोहोचलो. पुढे सटाणा-कळवण-ताहराबादमाग्रे आम्ही सकाळी उजाडता उजाडता मुल्हेर गावात पोहोचलो. या गावाबाहेरच उद्धव महाराजांचा मठ आहे. या मठात आम्ही आमची राहण्याची व्यवस्था केली होती. फ्रेश होऊन जुजबी सामान घेऊन आम्ही पुन्हा आमच्या गाडीने थोडय़ाच वेळात साल्हेर गावात पोहोचलो तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. साल्हेर गावाला लागूनच साल्हेर गड आहे. आम्ही या गावातच न्याहारी व चहा घेऊन गड चढण्यास सुरुवात केली.
वातावरणात प्रचंड गारवा असल्यामुळे ट्रेकला मजा येत होती. काही अंतर चढून जाताच उजव्या हाताला सुबक मंदिर पाहण्यास मिळते. मंदिराबाहेर मारुतीची दोन सुंदर शिल्पे पाहण्यास मिळतात. येथे सभोवती गच्च झाडी आहे. देवदर्शन आटपून आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. गड चढण्यास जास्त प्रयास पडत नव्हते. कारण काळय़ा कातळात प्रशस्त पाय-या घडवलेल्या आहेत. अर्धाअधिक गड चढून वर आल्यावर आम्ही गडाच्या पहिल्या दरवाजात येऊन पोहोचलो. आजही प्रवेशद्वार चांगल्या अवस्थेत आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या हातावर एक शिलालेख कोरलेला आहे. प्रवेशद्वार ओलांडून आम्ही गडप्रवेश करून थोडे पुढे आल्यावर आम्हाला गडाचा दुसरा दरवाजा पाहण्यास मिळाला. हा दरवाजाही चांगल्या अवस्थेत सुबक नक्षीकाम केलेला आहे. हा दरवाजा ओलांडून आम्ही साल्हेर गडाच्या माचीवर आलो. गडाची माची प्रशस्त आहे. येथे पाण्याची अनेक टाकं,घरांचे,वाडय़ांचे उद्ध्वस्त चौथरे तसेच काही ठिकाणी शाबूत असलेली तटबंदी पाहण्यास मिळते. या माचीवरून सभोवतालचे दृश्य खूपच मनमोहक दिसते. येथे आम्ही थोडा विसावा घेतला.
विसावा आटपून आम्ही गडाचा दुसरा टप्पा चढण्यास सुरुवात केली. गडाच्या पायथ्यापासून वपर्यंत दगडी पाय-या तासून काढलेल्या आहेत. त्यामुळे चढण्यास त्रास होत नाही व थकवाही येत नाही. गड जसजसा जवळ येऊ लागला तसा गडाचा तिसरा दरवाजा, त्याच्यापाठी चौथा मग पाचवा, सहावा, आणि शेवटचा सातवा दरवाजा पाहण्यास मिळतो. हे सर्व दरवाजे अशा खुबीने एकावर एक निर्माण केले गेले आहेत की शत्रूला गड जिंकणे अशक्यच आहे. सर्वच दरवाजे आकर्षक आहेत. पाय-या उभ्या चढणीच्या व थकवणा-या आहेत. दरवाजाच्या दगडी कमानी लक्ष वेधून घेतात. शेवटचा सातवा दरवाजा पार करून आम्ही साल्हेर गडाच्या बालेकिल्ल्यात प्रवेश केला. गडावर सर्वत्र सुक्या गवताचे रान माजले होते. गडाला विस्तीर्ण गादी पठार लाभलेले आहे. उजव्या हाताला दगडात खोदलेले पाण्याचे सुंदर टाक आहे. येथेच आम्ही न्याहारी आटपून थोडा विसावा घेतला. गडावर बरेच ऐतिहासिक पुरावे पाहण्यास मिळतात. गडाच्या मधोमध उंच टेकडी आहे आणि त्या टेकडीच्या शिखरावर परशुरामाचे छोटे, पण सुंदर मंदिर आहे. आम्ही गडाच्या त्या शेवटच्या टोकावर जाण्यास निघालो. मळलेल्या पायवाटेवरून जाताना उजव्या हाताला पाण्याचे टाक पाहण्यास मिळते. त्याच्या शेजारी प्रशस्त यज्ञवेदी व एक छोटी आकर्षक दगडी मूर्ती पाहण्यास मिळाली. डाव्या हाताला चौकोनी आकाराचा घडीव बांधणीचा प्रशस्त तलाव पाहण्यास मिळतो. या तलावातील पाणी दर बारा वर्षानी दुधी होते. त्यावेळी गडावर मोठी जत्रा भरते. तलावाशेजारी इतरही पाण्याचे अनेक टाक समूह आहेत. तलावाच्या काठावर रेणुका मातेचे सुंदर पण उद्ध्वस्त मंदिर पाहण्यास मिळते. या टाक समूहाच्या थोडे पुढे डाव्या हाताला भव्य चौसोपी वाडा आहे. हा वाडा आज भग्न, ढासळलेला आहे. पण या वाडय़ाचे भव्य बुरूज व जोते याचे भव्यपण दर्शवतात. पाण्याचा तलाव व उद्ध्वस्त वाडा पाहून आम्ही गडाच्या अंतिम शिखराकडे निघालो. जराशी उंच चढण चढून आल्यावर डाव्या हाताला दत्तांचे छोटे शिल्प पाहण्यास मिळते. येथे पूर्वी मंदिर असावे असे वाटते. समोरच डोंगराच्या पोटात दोन लेण्या खोदून काढलेल्या आहेत. येथून पुढची वाट मात्र थेट शिखराकडे जाते. थोडीशी दमछाक करणारी ती वाट दहा मिनिटात आपल्याला गडाच्या अंतिम शिखराकडे घेऊन जाते. गडाच्या शिखरावर परशुरामाचे सुबक मंदिर आहे. हे गडावरचे अंतिम टोक होय. येथे पोहोचताच सारा थकवा नाहीसा झाला. दुपार असूनही भन्नाट गार वारा अंगाला झोंबत होता. येथून सालोटागडाचे अप्रतिम दृश्य दिसते. तसेच मुल्हेर, हरगड, धोडप, मांगी-तुंगी, न्हावी, रतनगड इत्यादी किल्ल्यांचे दर्शन होते. येथे विसावा घेऊन दुपारी ३ वाजता शिखर उतरून लेण्यांमध्ये आलो. येथे आम्ही दुपारचे जेवण घेऊन थोडा विसावा घेतला.
बरोबर चार वाजता गड उतरण्यास सुरुवात केली. गड उतरतेवेळी आम्ही सालोटय़ाच्या दिशेने गड उतरण्यास सुरुवात केली. येथून गड उतरण्याची वाट फरसबंदी आहे. डाव्या हाताला कंबरेएवढी तटबंदी आहे. डाव्या हाताला खाली खोल दरी पाहून छाती दडपून जाते. समोर भव्य सालोटय़ाचे नयनरम्य दर्शन होते. तर उजव्या हाताला शेवटपर्यंत डोंगर पोखरून एकाला एक लागून अनेक लेण्या खोदून काढलेल्या आहेत. यात काही पाण्याच्या टाक्या पण आहेत. गडाचे व सभोवतालच्या निर्सगाचे दर्शन घेत आम्ही गडाच्या पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. समोरच प्रवेशद्वाराच्या कातळ िभतीवर फारसी शब्दात शिलालेख पाहण्यास मिळतो. येथे गडावर एकापाठोपाठ एक असे तीन दरवाजे पाहण्यास मिळतात. दरवाजे अप्रतिम आहेत. काळय़ा कातळातच खोदून काढलेले आहेत. पाय-याही दगडात कोरून काढलेल्या आहेत. समोरच साल्हेरचा जोड किल्ला सालोटा लक्ष वेधून घेतो. सालोटा खूपच आकर्षक दिसतो. त्यावरून नजर हटत नाही. पुढची सगळी वाट उतरणीची आहे. काही अंतर खाली उतरून आम्ही साल्हेर, सालोटय़ाच्या खिंडीत येऊन पोहोचलो. येथून उजव्या हाताची एक अवघड वाट सालोटय़ाकडे गेलेली आहे. वेळेअभावी आम्हाला सालोटा पाहता आला नाही. कारण दिवस मावळू लागला होता. आसमंतात काळोख दाटू पाहत होता. साल्हेर गडाखाली जाणारी वाट ही काही ठिकाणी अवघड झाल्यासारखी वाटत होती. गड उतरून येईपर्यंत चांगलाच अंधार पडला होता. काळोखातच अडखळत, धडपडत एकदाचे सुखरूपपणे आम्ही गड उतरून गडाखालच्या वाघांबे गावात येऊन पोहोचलो. तेव्हा रात्रीचे आठ वाजायला आले होते. साल्हेरगड जसा देखणा व रांगडा आहे तसाच त्याचा इतिहासही आकर्षक आहे.
दुर्ग साल्हेर हा गिरीदुर्ग असून समुद्रसपाटीपासूनची उंची ५१४० फूट आहे. जवळचे ठिकाण नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणे आहे. या प्राचीन गडावर सन १३४०च्या दरम्यान बागलाणचा राजा मानदेव याचे राज्य होते. मोगलांच्या अफाट सामर्थ्यांपुढेही हा दुर्ग अजिंक्य राहिला होता. अकबर बादशहाच्या ‘आईनेअकबरी या बखरीत असे लिहून ठेवलेले आहे की साल्हेर, मुल्हेर या गडांनी मोगलांच्या वेढय़ाला बारा वष्रे दाद दिली नाही. पुढे शहाजादा औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार असताना बागलाणचा राज बहिर्जीने मोगलांना घाबरून न लढताच साल्हेर, मुल्हेर व अजून तेहतीस किल्ले व इतर ठाणी औरंगजेबाच्या हवाली केली. औरंगजेबाने साल्हेरचे नाव बदलून सुलतानगड ठेवले. पुढे सन १६७० मध्ये शिवाजी महाराज मुल्हेरगडाची पेठ लुटून मोरोपंत पेशव्यांसह वीस हजार सन्यानिशी साल्हेरला येऊन त्यांनी साल्हेरगडाला वेढा घातला. औरंगजेबाचा सरदार दाऊदखानाला वेढय़ाची माहिती मिळताच तो तडक साल्हेरला येण्यास निघाला. त्यांच्या मावळय़ांनी गडाला माळा लावून गड प्रवेश केला. गडप्रवेश होताच मराठे व मोगल सैन्य यांच्यात झटापट होऊन खासा मोगल किल्लेदार फतुल्लह खान ठार झाला. किल्लेदार ठार होताच गड महाराजांच्या ताब्यात आला. ३ डिसेंबर ते १ जानेवारी १६७१च्या दरम्यान सुलतानगडाचे पुन्हा साल्हेर नामकरण करण्यात आले. साल्हेर हातचा जाताच औरंगजेबाने बहादुरखान व दिलेरखान तसेच सोबत इखलासखान मियाना चंद्रावत व रायमकरंद इत्यादी वीरांना साल्हेर जिंकून घेण्यास पाठवले. १६७१ ला मोगलांचा साल्हेरला प्रचंड वेढा पडला. शिवाजी महाराजांना या वेढय़ाचे वृत्त कळताच त्यांनी तातडीने मोगल मुलखात असणारे सेनापती प्रतापराव गुजर व कोकणातून मोरोपंत पिंगळे यांना त्वरेने साल्हेरचा वेढा फोडण्यास पाठवले. दोघेही साल्हेरला त्वरेने पोहोचून मराठय़ांनी मोठे युद्ध केले. हा संग्राम एवढा प्रचंड झाला की येथे रक्ताचे पूर वाहिले. या लढाईत मोगलांची धूळदाण उडून महाराजांची फत्ते झाली. सन १६७२ शिवाजी महाराज असेपर्यंत हा गड स्वराज्यातच होता; पण पुढे संभाजीराजे छत्रपती होताच औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. औरंगजेबाने शहाजादा आझमला साल्हेर घेण्याची कामगिरी सांगितली. पण मोगलांना साल्हेर घेण्यासाठी लढाईच करावी लागली नाही. त्यावेळचा मोगल इतिहासकार खाफीखान म्हणतो. साल्हेरचा किल्लेदार याने काही रुपयांसाठी व इतर बक्षिसासाठी साल्हेर मोगलांना देऊन टाकला. पुढे सन १७६० मध्ये मोगलांच्या ताब्यातून हा गड पेशवाईत मराठय़ांच्या ताब्यात आला आणि अखेर सन १८१८मध्ये इतर गडांप्रमाणे हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.