जातीय हिंसाचार झालेल्या जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात सलग आठव्या दिवशीही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
जम्मू – राष्ट्रविरोधी घोषणांवरुन जातीय हिंसाचार झालेल्या जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात सलग आठव्या दिवशीही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी येथे दाखल झाले आहेत.
गोस्वामी आंतरराष्ट्रीय सीमेवरील परिस्थितीचाही आढावा घेणार आहेत. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी गुरुवारी काही वेळासाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली अशी माहिती किश्तवाडचे जिल्हाधिकारी बशीर अहमद खान यांनी दिली.
नऊ ऑगस्टला ईदच्या नमाज पठणानंतर राष्ट्रविरोधी घोषणा दिल्यावरुन दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला होता. हिंसक जमावाने मोठया प्रमाणावर सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान केले होते.
गुरुवारी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जम्मू भागातील काथुआ, सांबा, उधमपूर, रिसी आणि राजौरी जिल्ह्यातील संचारबंदी काही वेळासाठी शिथिल करण्यात आली होती. प्रशासनाने जम्मू भागातील शैक्षणिक संस्था सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल गोस्वामी त्यांच्या शिष्टमंडळासह शुक्रवारी सकाळी येथे दाखल झाले आहेत.