कुणा एकेकाळी भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निम्मे क्रिकेटपटू मुंबईचे असायचे. सध्या तशी स्थिती नाही. गेल्या दोन दशकांत एखाद् दुसरा मुंबईकर क्रिकेटपटू भारताच्या संघात दिसला. राष्ट्रीय संघातील मुंबईच्या क्रिकेटपटूंच्या कमी झालेल्या संख्येचे नेमके कारण काय, असा प्रश्न समस्त मुंबईकरांना पडला आहे. मुंबईकरांमधील गुणवत्ता कमी झालीय की त्यांना कुणी ‘गॉडफादर’ नाही?
पुढील महिन्यात होणा-या ऑस्ट्रेलिया दौ-यातील वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारताच्या संघाची घोषणा नुकतीच झाली. कसोटीपटू अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने दोन्ही संघांत स्थान मिळवले तरी यंदा प्रचंड फॉर्मात असलेला फलंदाज श्रेयस अय्यर आणि मध्यमगती शार्दूल ठाकूरचा विचार झाला नाही, याचे वाईट वाटते. फारशी उल्लेखनीय कामगिरी नसूनही पंजाबचा मध्यमगती बरिंदर सरनला संघात स्थान देण्यात आले. हिमाचल प्रदेशचा ऋषी धवन, मनीष पांडे, गुरकीरत सिंगला संधी मिळाली. मग श्रेयस आणि शार्दूलला वेगळा न्याय का?
यंदाच्या रणजी मोसमात सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर आहेत, हे ठाऊक आहे का? अर्थात श्रेयस अय्यर. श्रेयसने ८ सामन्यांतील १३ डावांत ७१.५३च्या सरासरीने ९३० धावा फटकावल्यात. मोसमात एक हजार धावांचा पल्ला गाठण्याची त्याला संधी आहे. २१ वर्षीय श्रेयसने एका द्विशतकासह तीन शतके आणि चार अर्धशतके ठोकलीत. त्याच्या इतक्या सरासरीने (७१.५३) आणि ‘स्ट्राईकरेटने (९५.४८) यंदा कुठल्याही फलंदाजाला फलंदाजी करता आलेली नाही. धावा, सरासरी आणि स्ट्राईकरेटमध्ये श्रेयसच्या आसपास कुणीही नाही.
गेल्या वर्षी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलेल्या श्रेयसने सनसनाटी पदार्पण केले. पदार्पणात रणजीत १० सामन्यांत ५०.५६च्या सरासरीने त्याने ८०९ धावा जमवल्या. अन्य स्पर्धात १४ सामन्यांत ४३९ धावा केल्या. सातत्य राखलेल्या अय्यरने आजवर २२ सामन्यांत ५५.६५च्या सरासरीने १९४८ धावा केल्यात. त्यात पाच शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. केवळ रणजी स्पर्धा नव्हे तर विजय हजारे वनडे स्पर्धेतही त्याची बॅट तळपली आहे. एक अर्धशतक त्याने फटकावले. तसेच तीन सामन्यांत ३५हून अधिक धावा केल्यात. श्रेयसचा भन्नाट फॉर्म पाहता वनडे किंवा टी-२० संघात त्याला स्थान मिळणे अपेक्षित होते.
श्रेयससह मध्यमगती शार्दूल ठाकूरही राष्ट्रीय संघाचे दरवाजे ठोठावतोय. यंदा त्याला अचूक मारा करता आला नसला तरी ८ सामन्यांतील २९ विकेट मुंबईतर्फे सर्वाधिक आहेत. गत हंगाम शार्दूलसाठी भलताच यशस्वी ठरला. मुंबईला आणखी एक रणजी जेतेपद मिळवता आले तरी त्याने १० सामन्यांत २०.८१च्या सरासरीने सर्वाधिक ४८ विकेट टिपल्या.
तब्बल पाच वेळा त्याने प्रतिस्पध्र्याचा निम्मा संघ गारद केला. गेल्या वर्षी चमकदार कामगिरी करूनही निवडसमितीला शार्दूलची दखल घ्यावीशी वाटली नाही. माजी विजेत्या मुंबई संघाने रणजी स्पर्धेत गेल्या वर्षी उपांत्य फेरी गाठली. यंदा साखळीत एकही पराभव न स्वीकारता दिमाखात उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. सध्या सुरू असलेल्या हंगामात पहिल्यांदा बाद फेरी गाठण्याचा मान मुंबई संघाने मिळवला आहे. मुंबई संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीत श्रेयस आणि शार्दूलचा मोठा वाटा आहे.
प्रत्येक विभागातील क्रिकेटपटू निवडण्याच्या पद्धतीचा (कोटा पद्धत) श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूरला बसला असला तरी गुणवत्तेचे काय? बरिंदर सरन, ऋषी धवन, गुरकीरत सिंग, मनीष पांडे या नवोदितांच्या निवडीवर आक्षेप नाही. मात्र त्यांच्या निवडीमागे नेमके काय निकष लावले गेले, हेही निवडसमितीने जाहीर करावे.
मुंबईकडे सध्याही गुणवत्तापूर्ण क्रिकेटपटूंची संख्या नसली तरी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा (एमसीए) तितका दबदबा राहिलेला नाही. मुंबईसह महाराष्ट्रातील पदाधिकारीही मुंबईच्या क्रिकेटपटूंना निवडण्यासाठी दबाव टाकण्यात कमी पडतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष शशांक मनोहर (नागपूर) महाराष्ट्रवासी आहेत.
राजकारण आणि क्रीडा जगतातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्ती असलेली शरद पवार हे एमसीएच्या अध्यक्षपदी आहेत. इतकेच नव्हे तर निवडसमितीच्या अध्यक्षपदी असलेले माजी कसोटीपटू संदीप पाटील आणि भारतीय क्रिकेट संघाचे टीम डायरेक्टर रवी शास्त्रीही ‘मुंबईकर’ आहेत. क्रिकेट किंवा अन्य खेळात सध्या गुणवत्तेसह ‘गॉडफादर’ची गरज लागते. मुंबईच्या क्रिकेटपटूंना अशाच ‘गॉडफादर’ची आवश्यकता आहे. राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यादृष्टीने मुंबईच्या क्रिकेटपटूंना ‘गॉडफादर’ लाभेल, अशी अपेक्षा करू या.