सर्वसामान्य माणसांना नजरेसमोर ठेवून, सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून आतापर्यंत विविध प्रकारची साहित्यनिर्मिती झालेली आहे. मात्र, व्यंगचित्रांच्या माध्यमातून सामान्यांना केंद्रस्थानी ठेवून गेली ५०-६० वर्षे सातत्याने आपल्या कुंचल्याची जादुई करामत दाखवण्याचे काम आर. के. लक्ष्मण यांनी केले. वयोमानामुळे सध्या ते व्यंगचित्र काढत नसले तरी त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांमुळे सर्वसामान्य भारतीय माणूस देशभर आणि जगभर पोहोचला आहे. लक्ष्मण यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला. त्यामुळे एका मोठय़ा राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक बदलाचे, घडामोडीचे ते साक्षीदार आहेत. १९५०पासून ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधून व्यंगचित्रे काढायला सुरुवात केलेल्या या व्यंगचित्रकाराने आपल्या मिश्कील, खुमासदार तर कधी बोच-या, उपरोधिक, धारधार टिप्पणीने समाजातील उणिवांवर, दोषांवर भाष्य केले. स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज, त्यांची मूल्ये, बदललेली मूल्यव्यवस्था, सामान्यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक शोषण यावर भाष्य करणारा कॉमनमॅन वास्तवातील कॉमनमॅनच्या मनातील टीकाटिप्पणी करत होता, कोपरखळी मारत होता, झटपट आणि तत्काळ प्रासंगिक प्रतिक्रिया देत होता. संताप, खदखद असो की, राजकारण्यांचा निर्बुद्धपणा त्यांनी तो त्यांच्या ‘यू सेड इट’ या सदरातून अतिशय मार्मिक पद्धतीने मांडला. दररोज पहिल्या पानावर येणा-या ‘यू सेड इट’ने सर्वसामान्यांपासून उच्चभ्रू अशा प्रत्येक स्तरातील व्यक्तीला आपलेसे केले होते. थोडे टक्कल, मिश्या, फुगीर नाकाचा-गालाचा, चौकटीचा कोट आणि हात पाठीमागे घेतलेला आणि विशेष म्हणजे भांबावलेल्या अवस्थेतला पन्नास-साठीकडे झुकलेला कॉमनमॅन नजरेत पडत असे. हा कॉमनमॅन हीच पुढे लक्ष्मण यांची ओळख बनली. या कॉमनमॅनने कितीही बोचरी आणि झणझणीत टीकाटिप्पणी केली तरी कोणाला दुखावले नाही. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सगळय़ाच परिस्थितींवर त्यांनी भाष्य केले. लक्ष्मण यांनी आज आपल्या कुंचल्यातून कोणते भाष्य केले आहे, हे पाहण्यासाठी सर्वसामान्य ते काम करत असलेले वर्तमानपत्र विकत घेत असत. त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची पुस्तके म्हणजे भारतीय समाजमनाचा एक ऐतिहासिक ठेवाच आहे. त्यांची अनेक पुस्तके आजही हातोहात खपतात. फक्त व्यंगचित्रकार इतकीच त्यांची ओळख नाही. निबंध, प्रवासवर्णने आणि लघुकथा या प्रांतातही त्यांनी मुशाफिरी केली आहे. त्यांचे मोठे भाऊ साहित्यिक आर. के. नारायण यांच्याकडून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. दोनशे शब्दांच्या बातमीने जे काम होत नाही ते काम एका छायाचित्राच्या माध्यमातून होते, असे म्हणतात. तेच काम लक्ष्मण यांनी आपल्या व्यंगचित्रांतून केले. त्यांना देशविदेशी पुरस्कार मिळाले आहेत. जर्नालिझम, लिटरेचर अँड क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्टबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने १९८४मध्ये गौरवण्यात आले. व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजातील उणिवा लोकांसमोर आणणारे ते जणू पत्रकारच आहेत, याची जणू ती पोचपावती होती. अलीकडेच त्यांनी ९३व्या वर्षात पदार्पण केले आहे. व्यंगचित्रांच्या माध्यमातून सखोल भाष्य करणारा कॉमनमॅनचा हा रचनाकार दीर्घायू होवो, हीच सदिच्छा!