अन्नधान्याची वाढती महागाई विकासाची वाट अडवून असताना पडीक उपजाऊ जमीन हा सर्वात मोठा धोका आहे. भाऊबंदकी, खत आणि बियाण्यांचे वाढलेले दर, मजुरांची टंचाई आणि वाढलेली मजुरी, अनियमित पाऊस आणि सिंचनाच्या अपु-या सुविधा यामुळे कंटाळलेल्या शेतक-यांकडून एकूण शेतीकडे पाठ फिरवली जात आहे. सिंधुदुर्गमधील मालवण तालुक्यात सद्य:स्थितीत ६० हजार हेक्टर भातशेती पडीक ठेवली जात असल्याचे महसूल विभागाची नोंद सांगते. ही आकडेवारी राज्यातील भातपिकाची विदारक स्थितीच दर्शवते. मालवणपुरते बोलायचे झाल्यास कृषी विभागाने तालुकास्तरावर शेतक-यांना सुधारित भात बियाणी, खत आणि कीड व्यवस्थापन किंवा पर्यायी पिकांबाबत मार्गदर्शन करण्याची आत्यंतिक गरज आहे. थोडक्यात काय, तर या पडीक शेतजमिनीत पुन्हा कोंब फुटू दे!
मालवण- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर भातशेती केली जाते. येथील एकूण क्षेत्रफळाच्या ७४ हजार हेक्टर जमीन ही भातशेती लागवडीखाली होती. मात्र आता केवळ १० ते १४ हजार हेक्टर क्षेत्रफळात सध्या भातशेती पिकवली जात आहे. उर्वरित ६० हजार हेक्टर भातशेती पडीक असल्याचे महसूल विभागाच्या नोंदीत म्हटले आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शेतजमीन पडीक राहिल्याने अन्नधान्य उत्पादनाच्या मोठय़ा नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. यावर ताबडतोब उपाययोजना केली पाहिजे. ही जमीन पुन्हा लागवडीखाली आणली गेली पाहिजे. भले यावर भातशेती न करता नगदी पिके घेतली तरी चालेल.
शेतक-यांना सुधारित व संकरित बियाण्यांचा पुरवठा करून ही जमीन पुन्हा हिरवीगार करता येईल. जैविक खतांचा वापर करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहित केले पाहिजे, जेणेकरून कमी झालेला जमिनीतील कस वाढून उत्पादकता वाढेल. यासाठी माती परीक्षणासारखे उपक्रम हाती घ्यावे लागतील. मालवणमध्ये भातशेतीखालील जमिनीचे पाणथळ, भरडी आणि पाणी असलेली भरडी जमीन असे तीन प्रकार आहेत. सुधारित वाणापासून हेक्टरी ४० ते ५० क्विंटल तर संकरित वाणापासून हेक्टरी ७० ते ८० क्विंटल भात उत्पन्न मिळत आहे. यामुळे कमी मेहनतीत जास्त उत्पादन मिळत असल्यामुळे शेतक-यांनी अडचणीच्या शेतजमिनी पडीक ठेवण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भातशेती जमीन पडीक राहिल्यामुळे तालुक्याच्या एकूण कृषी उत्पादनाला त्याचा फटका बसत आहे. भातशेत जमिनीतील अनेक हेक्टर जमिनी शेतक-यांनी फळ बागायतीखाली आणल्या असल्या तरी हे प्रमाण फार अत्यल्प आहे. भातशेती करत नसल्यास या क्षेत्रावर अधिकाधिक फळलागवड व्हायला हवी. यातून शेतक-यांना चांगला आर्थिक स्रोत उपलब्ध होईल.
भातशेतीच पुढे सुरू ठेवायची असल्यास हवामान बदलाचा र्सवकष विचार करून शेतक-यांनी नियोजन आणि एकात्मिक शेती व्यवस्थापन शेतक-यांना फायद्याचे होईल. कृषी विभागाच्या अधिका-यांची मदत महत्त्वाची ठरेल. सर्वात आधी जमिनीची चाचणी करायला हवी. सध्या सुधारित व संकरित बियाण्यांमध्ये ९० ते ११० दिवस एवढय़ा अल्प कालावधीची बियाणी उपलब्ध आहेत. तसेच मध्यम कालावधीसाठी ११० ते १३० दिवसांची बियाणे उपलब्ध असून पाणथळ जमिनीखालील शेतजमिनीसाठी १३० ते १५० दिवसांची बियाणी उपलब्ध आहेत. महाबीज व खासगी बियाणे कंपनीच्या ८० ते ९० विविध कालावधीची बियाणे प्रेरणीसाठी उपलब्ध आहेत. आपली जमिनीच्या प्रकारानुसार बियाण्यांची निवड करावी.
पेरणीसाठी सुधारित जातीचे हेक्टरी ४० किलो बियाणे तर संकरित जातीचे १५ ते २० किलो बियाणे पुरेसे असते. सुधारित आणि संकरित भातबियाण्यांसाठी खतांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. कोकणातील जमिनीत नत्राचे प्रमाण जास्त असल्याने स्फुरदयुक्त व पलाशयुक्त खतांचा वापर आवश्यक आहे. केवळ गिरिया खताचा वापर टाळणे महत्त्वाचे आहे. युरिया (नत्रयुक्त) खताचा वापर केल्यामुळे पिकाची वाढ होते. खतांचा संतुलित वापर केला तरच चांगले उत्पादन मिळते. सुधारित जाती या कीड व रोगाला मोठय़ा प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी पीक संरक्षण प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि औषधांची प्रमाणबद्ध फवारणी महत्त्वाची आहे. तालुक्यात सध्या २० ते २५ हजार क्विंटल भात उत्पादन घेतले जात आहे. पडीक जमीन भातशेतीखाली आणल्यास या उत्पादनात भरघोस वाढ होऊ शकते. यापूर्वी अतिरिक्त उत्पादित झालेले भात विकण्यासाठी पर्याय उपलब्ध नव्हता. खासगीरीत्या भात खरेदी केले जायचे. त्याला योग्य मोबदला मिळत नव्हता. भात खरेदीसाठी सरकार हमीभाव देते. यामुळे सध्या चांगला भाव मिळत आहे.
तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग या दोन्ही विभागांच्या वतीने शेतक-यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजना शेतक-यांना शेतकी साहित्य पुरवण्यापासून अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणा-या आहेत. यासाठी शेतक-यांनी कृषी अधिकारी आपल्याकडे येतील, याची वाट न पाहता कृषी विभागापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लाभ घ्यायला हवा.