कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की, त्याच्यावर तरुणांच्या उडय़ा पडतात. सोशल नेटवर्किंग साईट्नी सध्या धुमाकुळ घातला आहे. त्यात आधी आघाडीवर असलेले ‘फेसबुक’ आता केव्हाच मागे पडले असून आता ‘व्हॉट्सअॅप’चा जमाना आहे. लहान मुलांपासून अगदी थोरामोठय़ापर्यंत सगळेच जण आता व्हॉट्सअॅप वापरतात. यावर अनेक मित्र एकत्र येऊन ग्रुप बनवतात. कधीकधी एकाच वर्गातील मित्रांचे अनेक ग्रुप असतात. कधी शाळेतील, कॉलेजमधील तर कधी कामावरील सहका-यांचा ग्रुप असतो. यातून संवाद अधिक होतो तर कधी कामाच्या, बिनकामाच्या गोष्टींची देवाण-घेवाण होते. वयात येणा-या आणि नुकतीच कॉलेजमध्ये जाऊ पाहणा-या मुलांना या सोशल नेटवर्किंग साईट्स कशा हाताळावा, याचे भान राहत नाही आणि त्यातून जीवघेणा धोका निर्माण होतो. मध्यंतरी मुंबईत ग्रुपचा प्रमुख असलेल्या अॅडमीनबरोबर वाद झाल्यानंतर अॅडमीनने त्या सहका-याला ग्रुपमधून बाहेर काढले. याचा राग आल्याने या सहका-याने अॅडमीन असलेल्या आपल्या मित्रावरच सु-याने वार केले होते. त्यात हा अॅडमीन गंभीर जखमी झाला. गप्पाटप्पा, मस्करी करता करता हातघाईवर हे तरुण जातात. असाच प्रकार कल्याणमधील अगरवाल कॉलेजमध्ये घडला असून यात विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत एका विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला आहे. हे दोन ग्रुप एकाच कॉलेजमधले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोन ग्रुपमधून त्यांच्या मैत्रिणींवरून व्हॉट्सअॅप युद्ध रंगले होते. परस्परांच्या मैत्रिणींची छेड त्यातून काढली जात होती आणि याचाच स्फोट होऊन या दोन गटात हाणामारी झाली. मुले कॉलेजमध्ये जातात आणि अभ्यासच करतात, असे त्यांच्या पालकांना वाटत असते; परंतु अभ्यासाव्यतिरिक्तही अनेक ठिकाणी ही मुले मित्रांबरोबर जात-येत असतात. त्यांच्यात अनेक गोष्टींचे आदानप्रदान होत असते. या व्हॉट्सअॅपमधील माहितीचीही देवाणघेवाण होते. यात काही जणांची टवाळकी केली जाते. ज्यांना ती मान्य होते ते ती हसतखेळत स्वीकारतात आणि ज्यांना ती सहन होत नाही, त्यांच्यात वाद निर्माण होतात. हे वाद निर्माण होण्याआधीच ते मिटवले गेले पाहिजेत. पण तेवढी समज मुलांमध्ये नसते. कल्याणमध्ये घडलेली घटनाही अशीच आहे. यात मारणारे आणि मरणाराही एका कॉलेजमधले, एकमेकांच्या ओळखीचे मुले होती. त्यामुळे झालेल्या दुर्दैवी घटनेत एक विद्यार्थी मारला गेला आणि काही जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस या प्रकरणी गुन्हे दाखल करतील त्यावेळी या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि या कॉलेजलाही त्याची किंमत चुकवावी लागेल. पालकांनी आपला मुलगा नाहक गमवला तर कॉलेजची बदनामी झाली. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे संवादाचा वेग वाढला आहे की, विसंवाद वाढला आहे, हे आता समजेनासे झाले आहे. संवादातील आपुलकी, आत्मीयता घटत चालली आहे. तंत्रज्ञानाने लोकांचे आयुष्य गतीमान झाले आहे; पण संवाद हरवला आहे. या व्हॉट्सअॅप या सोशल साईटचा काही दोष नसला तरी संवाद अधिकाधिक बिघडवण्याच्या कामी एक प्रकारे मदत या अॅपच्या माध्यमातून झाली. उपयोगासाठी असलेल्या माध्यमांचा दुरुपयोग झाला की, त्यातून कुप्रवृत्ती जन्म घेते आणि सगळय़ा गोष्टींचा विचका होतो. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे; पण तेही आपल्या व्यापात असतात. अशा वेळी असे स्मार्टफोन मुलांच्या हाती देतानाच त्याच्यातील धोके ओळखून मुलांना तसे समजावून सांगणे आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीसाठी हातघाईवर न येता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्नही झाला पाहिजे. प्रत्येक गोष्टींसाठी पालक, सोशल साईट किंवा प्रत्यक्षपणे मारहाण करणा-या मुलांनाही थेट दोषी धरता येणार आहे; पण अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी सर्वानी जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर अशा गोष्टींची धग कमी करता येईल.