घाटमाथ्यावर पडलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या झळा सर्वच क्षेत्रावर दिसून येत आहेत. अशा दुष्काळी परिस्थितीमुळे इतर धान्यांसोबत फळफळावळ, भाजीपालाही महाग झाला आहे.
आचरा- घाटमाथ्यावर पडलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या झळा सर्वच क्षेत्रावर दिसून येत आहेत. अशा दुष्काळी परिस्थितीमुळे इतर धान्यांसोबत फळफळावळ, भाजीपालाही महाग झाला आहे.
एकीकडे या दुष्काळाचा दुष्परिणाम दिसत असताना काही प्रमाणात मुबलक पाणी असणा-या कोकणसारख्या भूप्रदेशातल्या शेतक-यांना हा दुष्काळ वरदानच ठरू शकतो. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजी मार्केटमध्ये भाजीफळांची घटलेली आवक आणि वाढलेले दर कोकणातील शेतक-यांच्या भाजीमालाला चांगला दर मिळवून देऊ शकतील.
याच परिस्थितीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने आचरा डोंगरेवाडी येथील युवक संदीप गोगटे याने आपल्या १७२ गुंठे क्षेत्रावर कलिंगडासोबत कारले, दोडकी, वाली, पडवळ यांची लागवड करून ती बाजारपेठेत विकण्यासाठी तत्पर बनला आहे.
आचरा-डोंगरेवाडी भाग हा खाडी किनारचा खारपड भाग म्हणून ओळखला जातो. या जमिनीवर पीक घेणे तसेच मोठया जिकरीचे; पण अपार मेहनत आणि सोबतीला कु टुंबातील व्यक्तींचा आधार या जीवावर दरवर्षी सोन पिकवित आहेत. दरवर्षी या जमिनीत ते क लिंगडाचे पीक घ्यायचे.
खारपड जमिनीमुळे कलिंगडाला प्राप्त होणारी वेगळी चव ग्राहकांना विशेष आकृष्ट करीत आहे. त्यामुळे त्यांच्याकडच्या कलिंगडांना चांगली मागणी मिळत होती. पण सर्वत्रच होणारी कलिंगडाची शेती, मोठया प्रमाणावर होणारी कलिंगडांची आवक यादृष्टीने विचार करून त्यांनी यावर्षी शेतात वेगळा प्रयोग करण्याचे ठरविले.
बाजाराचा सव्र्हे करताना दुष्काळी परिस्थितीमुळे भाजी बाजारात घटलेली भाज्यांची आवक आणि वाढलेले दर आपल्याला फायदेशीर ठरतील याचा विचार करून याचा फायदा उठविण्यासाठी त्यांनी कलिंगडाचे क्षेत्र कमी करत कारली, दोडकी, पडवळी याचे उत्पादन घेण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी चांगले उत्पादन देणा-या परदेशी वाणांचा वापर करण्याचे ठरविले.
याकामी त्यांना मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन रयत कृषी सेवा केंद्र जयसिंगपूरचे चंद्रकांत पाटील, गोविलकर सातारा, नामठाण्याचे विक्रम साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी कारली, दोडकी या सुधारित वाणांची निवड केली. कारल्यासाठी त्यांनी थायलंड जातीची तसेच ६२१४ अभिमन्यू यांची तर दोडक्यामध्ये नागा व्हरायटी, नामधारी व्हीएस ३, थायलंड या प्रकारची बियाणी वापरली.
सुरुवातीला डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात जमिनीची चांगली मशागत क रून लागवडीयोग्य बनविली. विक्रीचा काळ ओळखून साधारण २० डिसेंबरला त्यांनी लागवडीला सुरुवात केली. पाणी व्यवस्थापनासाठी मालवण येथील जैन कंपनीचे विक्रेते दादा पवार यांचे त्यांना मोठे सहकार्य मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचन केले आहे.
त्यांच्या शेतातील दिवस पहाटे साडेपाचलाच सुरू होतो. सुरुवातीला उठून पाणी लावणे हा त्यांचा नित्यक्रम. याकामी त्यांना त्यांचे वडील आणि काका यांचे विशेष सहकार्य मिळते. या लागवडीसाठी त्यांनी सेंद्रिय खतासोबत रासायनिक खतांचा मेळ घालून वापर केला आहे.
स्वत:च्या मालकीची असलेल्या गुरांच्या शेणाचा वापरही यासोबत असतोच. यामुळे त्याचा फायदा चांगला मिळत असल्याचे गोगटे सांगतात. वेलवर्गीय भाजीपाल्यांच्या आधारासाठी त्यांनी बांबूला तारांनी आधार देऊन पुण्यावरून क्रॉप सपोर्ट नेट लावला आहे. त्यामुळे वेलवर्गीय भाज्यांना पसरायला व्यवस्थित मिळत आहे.
या लागवडीबद्दल बोलताना संदीप गोगटे सांगतात, गेल्यावर्षी आपण १० गुंठे क्षेत्रावर या भाजीपाल्याची लागवड प्राथमिक स्तरावर घेतली होती. यातून चांगले म्हणजे ४० हजाराच्या आसपास फायदा मिळाला होता. तेव्हाच असा भाजीपाला लागवड करण्याचे त्यांच्या मनात होते. त्यातच दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाल्यांचे वाढलेले दर सिंधुदुर्गातील शेतक-यांना फायदेशीर ठरणारे असल्याने यावर्षी भाजीपाला लागवड करायचे असे ठरविले.
त्यादृष्टीने मार्गदर्शकांसह घरातील माणसांच्या पाठिंब्यावर आपण ही लागवड केली आहे. विक्री व्यवस्थापनासाठी आच-याच्या स्थानिक बाजारांसोबत पुणे, कोल्हापूर, सातारा या मार्केटवरही लक्ष केंद्रित केले आहे. आपणासोबत महिला,पुरुष मिळून १० स्थानिक कामगार काम करीत असून त्यांनाही रोजगार निर्माण करून दिला आहे.
सध्या लागवडीला ६० दिवस झाले असून ७० दिवसांनी जोरदार उत्पादन मिळू शकेल, अशी खात्रीही ते देतात. त्यांना या लागवडीसाठी बियाणे, औषधे, खते मिळून २ लाख ४० हजाराचा खर्च झाला आहे. इतर खर्च हा नेट बांबू यांचा असला तरीही काही वर्षे पुरणारी गुंतवणूक आहे. यातून खर्च वजा जाता चांगले उत्पन्न मिळण्याची आशा ते व्यक्त करतात.
सध्या जमिनीला मिळणारा भाव बघून जमीन विक्री करून केवळ नोकरीवर अवलंबून राहणा-या युवकांनी आपल्या जमिनीतून बाजाराचा विचार करून पिके घेतल्यास नोकरीची गरज लागणार नाही, असे ते सांगतात.