मी जिवंत असेपर्यंत कोकणवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असा निर्धार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी येथील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला.
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात सत्ताधारी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व पदाधिका-यांकडून जिल्ह्याची लूटमार चालली आहे. ठेकेदारी, टक्केवारी वाढली आहे. रस्त्यांची कामे निकृष्ट होत आहेत. विकासाचा निधी नको त्या ठिकाणी खर्च होत आहे. आंबा, काजू उत्पादकांची दुरवस्था झाली आहे. जिल्ह्यात सुबत्ता सोडाच, परंतु, शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यांनी व खासदारांनी आणलेला नाणार येथील रिफायनरी प्रकल्प उभा राहिला तर, कोकणातील आंबा, काजू बागायती नष्ट होणार आहे. नाणार प्रकल्पाला आमचा विरोध हा राजकारणासाठी नाही. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोकेमिकल रिफायनरी याठिकाणी होऊ देणार नाही. मी जिवंत असेपर्यंत कोकणवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असा निर्धार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी येथील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला.
रत्नागिरीतील हॉटेल विवेकच्या मराठा मैदानावर झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार नारायण राणे बोलत होते. यावेळी पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, राजन देसाई, बाळा कसालकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष सचिन आचरेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
पक्षाचे प्रवक्ते नित्यानंद दळवी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी व्यासपीठावर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष अशोक सावंत आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेना, काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले.
रत्नागिरी आणि चिपळूण येथे झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याठिकाणची तुफान उपस्थिती पाहून आमच्या विरोधकांचा पोटशूळ उठेल. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा अन्य राजकीय पक्षांपेक्षा वेगळी भूमिका, वेगळी ध्येयधोरण घेऊन तुमच्यासमोर येत आहे. काँग्रेसने मला सहा महिन्यात मुख्यमंत्री करण्याचा दिलेला शब्द बारा वर्षात पाळला नाही. उलट तीन-तीन वेळा दिल्लीत बोलवून माझी मानहानी केली. माझा अपमान केला. म्हणून मी काँग्रेस सोडली. मी शिवसेनेतही होतो. सगळे पक्ष मी जवळून पाहिले आहेत. त्यांच्या कार्याची पद्धती पाहिली आहे. जनतेला आश्वासने द्यायची आणि निवडणुकांमध्ये वारेमाप घोषणा करायच्या आणि सत्ता आली की त्या सगळ्या विसरायच्या. असा प्रकार सर्वच राजकीय पक्ष करत असतात. म्हणूनच मी जनतेला जो शब्द देऊ तो पुरा करू, हे घोषवाक्य समोर ठेवून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. दिलेला शब्द पाळणारा अशी महाराष्ट्रात ओळख आहे. स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून जनतेला अपेक्षित विकास मिळायला हवा हे आपले कर्तव्य आहे.
खासदार नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा दरडोई उत्पन्नात पाचव्या क्रमांकावर आहे, तर रत्नागिरी जिल्हा २२ व्या क्रमांकावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती झाली, तेथील लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली. याचे कारण आम्ही त्याठिकाणी जे काम करतो त्याचमुळेच सिंधुदुर्गची प्रगती झाली. त्याउलट रत्नागिरी जिल्ह्याची आजची परिस्थिती काय आहे, याचा विचार सगळ्यांनी करायला हवा. परंतु, गेल्या २२ वर्षात शिवसेनेच्या हातात जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने दिलीत, त्या शिवसेनेने काही केले नाही. इथला आमदार ठेकेदार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे शिवसेनेचे पदाधिकारी ठेकेदार आहेत. ते निकृष्ट दर्जाची कामे करतात. त्यांना कोण जाब विचारणार? आज जाती, धर्मातील तरुण बेकार आहेत. तरुणांच्या हाताला रोजगार नाही. अनेक कुटुंबांना अन्न मिळत नाही. त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी सत्तेत असणा-यांनी प्रयत्न करायला हवेत. असे प्रयत्न शिवसेना करते काय, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
शिवसेनेचे आमदार, खासदार आहेत. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आहेत. तसेच राज्याचे उद्योगमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांनी एकतरी उद्योग या जिल्ह्यात आणला का? पर्यावरणाला धोका होणार नाही, असे कारखाने या निसर्गरम्य परिसरात आणायला हवेत. परंतु, याठिकाणी शिवसेनेने काहीही केलेले नाही. महाराष्ट्रातील व कोकणातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोकण तर आमचा बालेकिल्लाच आहे. त्यामुळे कोकणातही यापुढे आम्ही विजयी होऊ, असा विश्वास येथील कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहून वाटतो, असे सांगून खा. राणे पुढे म्हणाले, सत्तेत शिवसेनेचे मंत्री आहेत. परंतु, त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही. मी मात्र कोणत्याही वेळी मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन मी मंत्री असताना माझ्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीचा अहवाल देवून पाळले. मराठा समाजाला १६ टक्के, तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मी द्यायला लावले. परंतु, शिवसेनेची सत्ता आल्यानंतर ते आरक्षण रद्द झाले. राजकारणात दिलेला शब्द आम्ही पाळला. जनतेचे हित पाहिले. म्हणून राजकर्ते आणि जनता मला मानसन्मान देते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनात मोठय़ा प्रमाणात जाळपोळ झाली, गाडय़ा फोडल्या गेल्या, लूटमार झाली आणि अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या. हे पाहिले आणि मी थेट दिल्लीवरून आलो व मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि हे कधी थांबणार, असे विचारले. मराठा समाज उद्ध्वस्त होत चालला आहे. या आंदोलनात गंभीर स्वरुपाचे गुन्हे समाजातील तरुणांवर दाखल होत आहेत. एखाद्या तरुणावर ३०७ कलम लावले तर त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. हे थांबवा, असे आवाहन मी मुख्यमंत्र्यांना केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर महिना भरातच मराठा समाजाला आरक्षण देऊ, अशी घोषणा केली.
खा. नारायण राणे पुढे म्हणाले, मी माझ्या राजकीय जीवनात कधीच जाती, पातीचे राजकारण केले नाही. मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली, वैश्यवाणी समाजाला ओबीसीमध्ये टाकण्यासाठी मीच प्रयत्न केले. कुणबी समाज बांधवांसाठी पेजे महामंडळाची शिफारस मी प्रथम केली. त्यामुळे आता नारायण राणेंना श्रेय मिळणार म्हणून शिवसेना जागी झाली असून, त्यांची नाटके सुरू झाली आहेत. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे, असे त्यांना कधीच वाटले नाही. सर्व जाती, धर्मामध्ये गरीब लोक आहेत. तळागाळातील गरीब समाजाला आर्थिक उन्नती करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. त्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे. मात्र, या प्रश्नावर कोणी राजकारण करू नये.
खा. नारायण राणे पुढे म्हणाले, आम्ही आमचे व्यवसाय सांभाळून राजकारण करतो. परंतु, शिवसेनेचे नेते मात्र पैसे मिळण्यासाठी राजकारण करतात. सत्तेसाठी पैसा व पैशासाठी सत्ता असा एककलमी कार्यक्रम त्यांचा सुरू आहे. म्हणून आता परिवर्तन घडवण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मी स्थापन केला आहे. जो आपला सर्वांचा पक्ष आहे, त्याला वाढवा. जगातील सिंगापूर, मलेशियातील क्वालांलापूर अशी अनेक शहरे आदर्श शहरे म्हणून नावारूपाला आली आहेत. मात्र, गेल्या २० वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शहरांची अवस्था वाईट झाली आहेत. गटारे वाहत आहेत, स्वच्छता नाही. कच-याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही. आम्ही मालवणमध्ये भुयारी गटार योजना राबवली. कुडाळ, कणकवलीत ही योजना मार्गावर आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद दिवाळखोरीत का?
खा. नारायण राणे म्हणाले की, आमच्या ताब्यात असलेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आर्थिकदृष्टय़ा सबल आहे. याठिकाणी आमचे पदाधिकारी चांगले काम करत आहेत. त्यामुळे विकास कामांचे अनेक पुरस्कार, राज्य व देशपातळीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने मिळवले आहेत. मात्र, शिवसेनेची सत्ता असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेची अवस्था दयनीय आहे. पुरस्कार सोडाच परंतु, कर्मचा-याला पगार द्यायला पैसे नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पुरस्कार मिळवते. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषद बदनाम का? ती दिवाळखोरीत का जाते, असा सवाल खा. नारायण राणे यांनी केला.
चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिल्यास प्रगती
खा. नारायण राणे म्हणाले, देश प्रगतीकडे जायचा असेल तर योग्य लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. चांगले काम करणारे लोकप्रतिनिधी असतील तरच विकास होतो. अमेरिका, जपान, इंग्लड या अनेक प्रगत देशात चांगले लोकप्रतिनिधी निवडून येतात. म्हणून ते देश प्रगतीपथावर गेले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर होत नाहीत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ध्येय धोरणे देशहिताची व समाजहिताला पोषक अशी आहेत. भावनेवर यापुढे मतदान करू नका. तर त्या लोकप्रतिनिधीची कर्तृत्व व त्याची गुणवत्ता काय हे पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. मी पोटतिडकीने बोलत आहे. केवळ राजकारण करण्यासाठी मी आलेलो नाही. आम्हाला एकवेळ संधी द्या. मग आम्ही काम, कार्य आणि विकास काय याची ओळख करून देवू. तुमचे ऋण फेडायला आमचा पक्ष कधीच कमी पडणार नाही.
विकासाचे पर्व सुरू करण्यासाठी संधी द्या : निलेश राणे
रत्नागिरी केवळ मतदारसंघ नाही तर माझे कुटूंब आहे. पराभवानंतरही इथल्या माणसांनी माझ्यावर निरपेक्ष प्रेम केले आहे. तीच माझी माणसे, माझे कार्यकर्ते, माझे सैन्य आहे. त्या सैन्याला सोबत घेऊन मी या जनतेच्या विकासासाठी सदैव कटीबध्द आहे. इथल्या जनतेने २२ वर्षे शिवसेनेवर विश्वास ठेवला, पण त्यांनी रत्नागिरीकरांना फसवले. आता फक्त पाच वर्षे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षावर विश्वास ठेवा, आम्ही विकासाचे नवे पर्व इथे सुरू करु, अशी ग्वाही माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हावासीयांना दिली.
‘देऊ शब्द तो खरा करू’ हे ब्रीद घेऊन स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा रत्नागिरीमधील पहिला मेळावा माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी पार पडला. यावेळी पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेच्या कार्यपध्दतीवर घणाघाती टीका केली. तुम्ही २२ वर्षे शिवसेनेला संधी दिलीत, आता तर आमदार, खासदार, पालकमंत्री त्यांचेच आहेत. तरीही इथला आंबा बागायतदार, मच्छीमार, व्यापारी, एस.टी. कामगार, सामान्य माणूस, समाजाचा प्रत्येक वर्ग आज दु:खी आहे, कारण त्यांच्यासाठी बोलणारा आवाज आज सभागृहात नाही. इथल्या नेत्यांनी स्वत:ला सुंदर केले, पण आपला जिल्हा सुंदर दिसण्यासाठी इतक्या वर्षात काहीच केले नाही. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्हा सर्वार्थाने विकासात पुढे असताना रत्नागिरी मात्र खूपच मागे आहे. म्हणूनच रत्नागिरीची चिंता वाटते. हा जिल्हा, जिल्हावासीय म्हणजे माझे कुटूंब आहे, त्याच्या उन्नतीसाठी आजही मी इथे कार्यरत आहे. इतकी वर्षे शिवसेनेवर विश्वास दाखविलात, त्यांनी तुमची फसवणूक केली. आता एक संधी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला द्या, पाच वर्षात जिल्ह्याचा कायापालट करतो.
ते म्हणाले केवळ रत्नागिरीमध्येच शिवसेना जास्त आहे. गेली २२ वर्षे तुम्ही सेनेवर विश्वास दाखविलात, पण त्या सेनेने तुम्हाला काय दिले? २०१४ मध्ये सत्तेत जाऊन बसले, मंत्रीपदे, पालकमंत्रीपद घेतले पण त्या बदल्यात जिल्ह्याचा विकास किती केला? कारखाने, आरोग्य सुविधा, रस्ते, रोजगार यातील या पक्षाने तुम्हाला काय दिले असा सवाल करताना निलेश राणे म्हणाले इथल्या आमदाराचे वडिल जिल्ह्यातले मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. पण आमदाराने स्वत: सुंदर दिसण्यासाठी पैसे खर्च केले, रत्नागिरी चांगली दिसावी यासाठी त्याने काय केले? हे चित्र बदलावे, रत्नागिरीनेही विकासाच्या दृष्टीने वाटचाल करावी यासाठी खासदार झाल्यापासून प्रयत्न केले. खासदारकीच्या काळात वृत्तपत्रांमध्ये कमी दिसलो असेन पण मतदारसंघातील प्रत्येक वाडीवस्तीत पोहोचण्याचा प्रयत्न केला. येणारा निधी सर्वात आधी मतदारसंघात वितरीत केला. तेव्हा कुठल्याही अधिका-याचा त्रास तुम्हाला नव्हता, पण आज आंबा बागायतदार, चिरेखाण, निवृत्ती कर्मचा-यांच्या संघटनांना कळून चुकले आहे की, आपला माणूस सभागृहात नसेल तर कुठलेही प्रश्न मार्गी लागू शकत नाही. ज्यांनी बाजू मांडू असे आश्वासन दिले तेच आज इथले मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पण ते सगळेच फक्त त्यांचा विचार करतात, त्यांना जनतेचे हिताचे काहीही पडलेले नाही. याची जाणीव सुरुवातीपासूनच पालकमंत्री रवींद्र वायकरांसोबत असलेल्या अशोक वालमना झाली. नाणार आणून या भूमीचे, जनतेचे नुकसान करण्याचा शिवसेनेचा डाव त्यांच्या लक्षात आला, म्हणूनच अशोक वालम सेनेच्या विरोधात उभे राहिले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून माझ्याविरुध्द लोकसभेच्या निवडणुकीत रान उठविणारे विनायक राऊत, राजन साळवी सत्ता आल्यानंतर १०० दिवसात जैतापूर रद्द करणार होते, पण आज जैतापूरचे काम सुरूच आहे, टर्बाईन झाले, भिंती, अंतर्गत रस्ते उभे राहिले आहेत, हा विरोधाभास निलेश राणे यांनी उपस्थितांसमोर मांडला. शिवसेनेचा हा खोटेपणा, दिखावूपणा जनतेसमोर उघड होतोय, म्हणूनच आज लोक, विविध संघटना पुन्हा राणे साहेबांकडे येत आहेत. तेच आपले प्रश्न सोडवतील हा विश्वास त्यांना आहे. नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध करेपर्यंत शिवसेनेने केवळ इथे बघ्याचीच भूमिका घेतली होती, पण आताही प्रकल्पाच्या विरोधात उतरणा-या शिवसेनेच्याच सरपंच, पदाधिका-यांनी जमिनीची दलाली केली आहे. नाणारला शिवसेना आणि उध्दव ठाकरेंचा विरोध हा केवळ दिखाऊपणा आहे, पण त्यांनी काहीही केले तरीही नाणार जाणार हे अटळ आहे अशी ग्वाही निलेश राणेंनी रत्नागिरीकरांना दिली.
राणे साहेबांबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलची उत्सुकता आज संपूर्ण राज्यात आहे, त्यांच्याच नावावर मिडीयामध्ये हेडलाईन येतात, नाणार असो किंवा मराठा आरक्षण असो आजही नारायण राणे यांच्याशिवाय हे प्रश्न मार्गी लागू शकत नाहीत. आपल्या माणसाची ही ताकद आहे, त्याच ताकदीवर इथला विकास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू इच्छीत आहोत. याचसाठी २०१४ नंतरही मी सातत्याने प्रयत्न करतोय, कष्ट घेतोय. इथला केवळ मराठा समाजच नव्हे, तर प्रत्येक समाज माझ्याजवळचा आहे, असे भावोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
पवार साहेबांनाही करावा लागतो राणे साहेबांना फोन
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधताना निलेश राणे म्हणाले गेली ५० वर्षे राणे साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. प्रत्येक पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यांच्याबद्दल राज्यातील प्रत्येक भागात आकर्षण, उत्सूकता आहे. प्रत्येकजण त्यांच्याजवळ जाण्याचा, बोलण्याचा, त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. तोच अभिमान समजतो. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रश्नांच्यावेळी मिडियालाही राणे साहेबांची भूमिका महत्त्वाची वाटते. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत बोलायला पवार साहेबांना राणे साहेबांनाच फोन करावा लागतो, यावरूनच तुमच्या नेत्याची ताकद ओळखा, त्यांनी तुमच्यासाठी हा पक्ष स्थापन केला आहे, त्यांचे हात बळकट करा, तुमच्या आयुष्यात नक्कीच परिवर्तन येईल.
..तरीही अजित पवार निवडून आले!
गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी धरणांबाबत वक्तव्य केले आणि त्यांच्यावर राज्यभर टीका झाली. त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. परंतु तरीही अजित पवार आपल्या मतदारसंघामध्ये ९० हजार मतांनी निवडून आले. कारण तिथल्या मतदाराला माहित आहे, आपला माणूस चुकला तरीही तो आपल्यासाठी कष्ट घेणार आहे. आपल्याच विकासासाठी प्रयत्न करणार आहे, म्हणूनच त्याला मोठा केला पाहिजे. आज मी पराभवानंतरीही सातत्याने तुमच्यासाठी प्रयत्न करतोय, पण तुमचे प्रश्न बाहेर मांडून उपयोग नाही, त्यासाठी सभागृहाचे व्यासपीठ हवे. ती ताकद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून मला द्या, असे आवाहन निलेश राणे यांनी यावेळी केले.