मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरदार सुरू आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणातून जाणारा हा महामार्ग कसा आगळावेगळा आहे? या महामार्गामुळे मुंबई किती जवळ येईल आणि त्याचबरोबर रोजगाराच्या संधी कशा पद्धतीने निर्माण होतील. कोकणातील बेकार तरुण आर्थिकदृष्टय़ा कशा पद्धतीने सक्षम होईल. असे सारे गडकरी स्टाईलचे प्रेझेंटेशन कुडाळच्या महामार्ग चौपदरीकरण शुभारंभाच्या समारंभामध्ये आपल्या भाषणातून सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळातील एक अॅक्टिव मिनिस्टर म्हणून नितीन गडकरी यांचे नाव घेतले जाते. कोणतेही काम विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करणे ही त्यांची खासियत आहे. मुंबई, कोकण, गोवा असा हा चौपदरीकरणाचा महामार्गही कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी त्यांचे निश्चितच प्रयत्न सुरू आहेत; परंतु का कुणास ठाऊक? ज्या ठेकेदार कंपन्यांनी कोकणातील या महामार्ग चौपदरीकरणाचे काम घेतले आहे, त्या कंपन्यांनी कोकणच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास केला आहे का? कोकणात पडणारा पाऊस, त्याचे नवनिर्मित चौपदरीकरणाच्या रस्त्यांवर होणारे परिणाम या संबंधीचा अभ्यास अपुरा असावा, असे प्रथमदर्शनी तरी वाटू लागले आहे.
कोकणातील या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. अखंड कोकणवासीयांना मनापासून आनंदही झाला; परंतु पाऊस पडल्यावर मात्र या महामार्गावरून सर्वसामान्य जनतेला वाहन चालविणे सोडाच पण चालणेही मुश्कील झाले. कोणत्याही रस्त्याचे काम सुरू असताना थोडी अडचण होणार हे कोणीही गृहीत धरेल; परंतु या चौपदरीकरण महामार्गाचे काम करणा-या कंपन्यांकडून सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणण्याचेच काम सध्या सुरू आहे. वाहन कसे चालवावे? असा प्रश्न सर्वच वाहनचालकांना पडलेला असतो. महामार्गावर एवढे खड्डे पडलेले आहेत आणि अनेक ठिकाणी तर पाणी भरलेले असते. खड्डय़ात भरलेल्या पाण्यामुळे महामार्ग आणि खड्डे यावर कसरत करतच प्रवास करावा लागत आहे. लोकांची होणारी ही गैरसोय महामार्गाचे काम करणा-या बांधकाम कंपन्यांना किंवा या चौपदरीकरण महामार्ग ज्या बांधकाम अधिका-यांच्या अखत्यारित येतो, त्या अधिका-यांनाही यासंबंधीचे काहीही पडलेले नाही. जिल्ह्यातील प्रशासनालाही यासंबंधीची काही माहिती आहे किंवा नाही असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कोकणातून जाणारा हा चार पदरी महामार्ग कसा असणार आहे? त्याला उपमार्ग कुठून असणार आहेत? शहरात जाण्यासाठीचे रस्ते कसे आणि कोठून असणार आहेत? यासंबंधीची कोणतीही माहिती अद्यापपर्यंत लोकांपुढे आलेली नाही.
दुसरी बाब म्हणजे, आजही भूसंपादनाचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी भूसंपादन केले जात आहे, त्या ठिकाणीही प्रशासनाकडून जबरदस्तीनेच भूसंपादनाची कार्यवाही पार पाडली जात आहे. वळण काढण्याच्या नावाखाली अनेक ठिकाणी जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. या जमिनी संपादित करताना समोरच्या बाजूने जागा मोकळी असतानाही जाणीवपूर्वक शेतघरे, विहिरी यांचे नुकसान करून जागा संपादित केल्या जात आहेत. यासंबंधीही भूसंपादनाची जबाबदारी कोणाची आहे? किती जागा संपादित केली जात आहे, यासंबंधीची माहिती संबंधित शेतक-यांना दिली जात नाही. याकडे प्रशासनाचेही लक्ष नाही. गणेशोत्सवापूर्वी कोकणात येणा-या मुंबईकर चाकरमानी प्रवाशांना कोकणातील हा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असे खासदार, मंत्री या सत्ताधा-यांकडून वारंवार आश्वासित केले जाते; परंतु प्रत्यक्षात मात्र कार्यवाही काहीही होत नाही, हे सिद्ध झाले आहे. कोकणातील अनेक ठिकाणी दोन दिवसांपूर्वीच महामार्गावरील या चौपदरीकरणाच्या कामासंबंधी लोकांच्या असलेल्या तक्रारींमुळेच आंदोलन छेडले गेले. कुडाळात तर सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येत महामार्ग रोखून धरला. या मागच्या भावना राज्य सरकारने समजून घेण्याची गरज आहे. चौपदरीकरणाच्या या कामाला कोणाचाही विरोध नाही. मात्र ज्या पद्धतीने ठेकेदार कंपन्यांकडून काम सुरू आहे, त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणा-या नागरिकांना होणारा त्रास, याकडे केली जाणारी डोळेझाक याबद्दलच लोकांचा आक्षेप आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकही नाहीत. काही ठिकाणी तर अपघात होण्याची शक्यताच अधिक आहे. या सर्वच बाबतीत गंभीरतेने विचार करून शासनाने लक्ष घातले पाहिजे.